Monday, September 22, 2014

शिराळा (जि. सांगली) येथील 35 शेतकरी करतात ऍझोलानिर्मिती

पशुपालनामध्ये सर्वांत महत्त्वाचा व मोठा खर्च हा पशुखाद्याचा असतो. हा खर्च मर्यादित ठेवताना जनावरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. अशा वेळी ऍझोलासारखे आरोग्यदायी पूरक खाद्य पशुखाद्यात फायदेशीर ठरते. शिराळा (जि. सांगली) येथील 35 पेक्षा अधिक शेतकरी ऍझोलानिर्मिती व सातत्यपूर्ण वापर करत आहेत. श्‍यामराव गावडे 
सांगली जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील शिराळा तालुक्‍यामध्ये शेती ही डोंगरकपारीमध्ये केली जाते. डोंगरावरील गवताचा लाभ घेत अनेक शेतकरी जोडीला पशुधन सांभाळतात. पशुधन जपण्यासाठी त्यांच्या खाद्य व्यवस्थेमध्ये ऍझोलासारख्या शैवाल वर्गीय वनस्पती वापर वाढविण्यासाठी तालुका पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे शिराळा तालुक्‍यात रेड, उपळावी, मांगले, बिऊर परिसरात 35 शेतकऱ्यांनी ऍझोलानिर्मितीची युनिट उभी केली आहेत. यांतील ऍझोलाचा वापर दुधाळ जनावरांच्या खाद्यामध्ये पूरक केला जात आहे. बियाणे म्हणून ऍझोला महाराष्ट्रासह कर्नाटकातील लोकांनी नेला आहे. 

अशी झाली सुरवात शिरवळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात पशुसंवर्धन विभागातील डॉ. शिवराज पवार हे प्रशिक्षणासाठी गेले होते. या प्रशिक्षणामध्ये ऍझोलाचे फायदे व त्याची निर्मिती या संदर्भात माहिती मिळाली. शिराळा तालुक्‍यामध्ये ऍझोलाचा पशुखाद्यात वापर वाढल्यास शेतकऱ्यांच्या लाभात वाढ होऊ शकते, या उद्देशाने विभागामार्फत ऍझोला निर्मिती व प्रसार सुरू केला. सुरवातीला शिरवळ येथून 200 रुपये प्रति किलोप्रमाणे ऍझोला बियाणे आणले. 

ऍझोला काय आहे... - ऍझोला ही पाण्यावर वाढणारी शैवालवर्गीय वनस्पती आहे. 
- झाडाच्या सावलीत, छपरात, बाहेर थोडीशी सावली करून ऍझोला वाढवता येते. 
- जनावरांच्या खाद्यामध्ये त्याचा पूरक म्हणून वापर करता येतो. तसेच भातशेतीमध्ये खत म्हणून गाडल्यास त्यातून नत्र उपलब्ध होते. 
- शुष्क ऍझोलामध्ये 25 ते 35 टक्के प्रथिने असून, खनिजांचे प्रमाण 10 ते 15 टक्के असते. अमिनो आम्ले 7 ते 10 टक्के असतात. हे जनावरांसाठी पचनाला हलके असून, अन्य चाऱ्यांच्या पचनाला मदत करते. 

अशी करता येते ऍझोला निर्मिती - घराच्या अंगणात, परसदारात साधारणपणे सावली असलेल्या ठिकाणी किमान नऊ फूट लांब व सहा फूट रुंद व नऊ इंच खोलीचा खड्डा करून घ्यावा. सावली नसल्यास 50 टक्के सावलीचे शेडनेटचे आच्छादन करून घ्यावे. 
- तळाची बाजू समपातळीत करावी. त्यातील प्लॅस्टिक फाटू नये या उद्देशाने खडे, दगड काढून घ्यावेत. त्यावर पॉलिथिनचा पेपर पसरावा. काठाकडील बाजूला दुमडून त्यावर छोटे दगड ठेवावेत. 
- खड्ड्यामध्ये पॉलिथिन पेपरवर चांगल्या चाळलेल्या मातीचा अडीच ते तीन इंचाचा एक थर द्यावा. 
- वरील सहा इंच उंचीपर्यंत पाण्याने तो खड्डा भरावा. 
- त्यामध्ये एक ते दोन किलो शेण, तीस ग्रॅम सिंगल सुपर फॉस्पेट यांचे मिश्रण खड्ड्यात ओतावे. 
- या पाण्यावर साधारण एक किलो ऍझोला बियाणे सोडावे. 
- ऍझोलाची वाढ होऊन साधारणपणे आठ ते दहा दिवसांत ऍझोलाने वाफा भरतो. 
- दररोज त्यातील ऍझोला काढून जनावरांच्या पशुखाद्यासोबत द्यावा. एका जनावराला साधारणपणे अर्धा ते एक किलो ऍझोला दिल्यास फायदा होतो. 
- ऍझोला निर्मितीमध्ये इएम सोल्युशन आणि खनिज मिश्रणाचा योग्य प्रमाणात वापर केल्यास अधिक फायदा होतो. 

* पशुसंवर्धन विभागाचे सहकार्य शिराळा तालुका पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने सुरवातीला शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून ऍझोलानिर्मितीकडे वळवले. कामधेनू योजनेतून प्लॅस्टिक कागदखरेदीसाठी पैसे दिले. 
- पशूधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. सुहास देशपांडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. शिवराज पवार यांनी ऍझोलानिर्मिती व वापरासंदर्भात वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 
- आता शेतकरी स्वतः तयार होत असून, ऍझोलावाढीतील विविध टप्प्यांतील कामे स्वतः करत आहेत. शिराळा तालुक्‍यात रेड, उपळावी, मांगले, बिउर, परिसरात 25 हून अधिक शेतकऱ्यांनी ऍझोलानिर्मितीची युनिट साकारली आहेत. 

* ऍझोलाचा कर्नाटकातही प्रसार - शिराळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांची ऍझोलानिर्मितीची माहिती ऐकून कर्नाटकातील उगार येथील शेतकरी दीपक शिंदे यांनी येथील बियाणे नेले आहे. कर्नाटकात ऍझोला तयार केला आहे. 
- रेड हे गाव रस्त्यालगत असल्याने महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनीही ऍझोलाचे बियाणे नेले आहे. शिराळा परिसरातील शेतकरी बियाणे म्हणून ऍझोला देताना मोफत देतात. 

यांना झाला फायदा 1) एक वर्षापूर्वी ऍझोलानिर्मिती सुरू केली. शेतात झाडाच्या सावलीत खड्डा केला आहे. माझ्याकडे चार जनावरे असून, त्यांतील दुभत्या जनावरांसाठी ऍझोला पूरक खाद्य म्हणून वापरतो. फॅटमध्ये फरक पडला आहे. तसेच दुधामध्येही अर्धा ते एक लिटरची वाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना मी बियाण्यासाठी ऍझोला दिला आहे. 
- दिनकर निवृत्ती पाटील ( मो 9657811615) 

2) सध्या माझ्याकडे नऊ जनावरे आहेत. ऍझोलाचे एक युनिट आहे. मात्र, ते कमी पडत असल्याने वाढविण्याचा विचार आहे. ऍझोला पूरक खाद्यामुळे जनावरे माजावर येण्यासही मोठी मदत होते. त्यात फक्त पाणी बदलणे, शेण व फॉस्फेटचे मिश्रण टाकणे, ही कामे करावी लागतात. 
- अशोक राजाराम पाटील (मो. 9887428545) 

3) मी खड्डा न काढता अंगणातील स्लॅबवर विटा व पॉलिथीन पेपरच्या साह्याने हे युनिट केले आहे. आमच्याकडे आठ जनावरे आहेत. पाण्यातून चाळणीने ऍझोला काढून जनावरांच्या खाद्यात मिसळला जातो. ऍझोला फायदेशीर वाटत आहे. 
- सूरज दिलीप पाटील 

ऍझोलाचे फायदे -निर्मितीखर्च 9 बाय 6 खड्ड्यासाठी अंदाजे पाचशे रुपये. 
- जनावरांना पूरक खाद्य म्हणून उपयोगी. पचनास हलके. 
- दूध देणाऱ्या जनावरात दुधात अर्धा ते एक लिटरची वाढ. 
- जनावरे माजावर येण्याचे प्रमाण चांगले. 
- दूध उत्पादनखर्चात 10 टक्‍क्‍यांनी बचत. 

या अडचणी येऊ शकतात - उन्हाळ्यात कडक उन्हामुळे ऍझोलाचा रंग हिरवट तांबडा किंवा विटकरी होतो. त्याच्या वाढीवर परिणाम होतो. तसेच गारव्याला कुत्रे व अन्य प्राणी येऊन बसतात. त्यांच्यासाठी बाजूने खांब रोवून दोरी अथवा कापड लावून घ्यावे. 
- झाडाखाली खड्डा केला असल्यास पालापाचोळा पडून कुजल्याने ऍझोला खराब होऊ शकतो. त्यासाठी वरून आच्छादन आवश्‍यक. 
- शेण उपलब्ध उपलब्ध आहे, म्हणून अधिक वापर होतो. त्यामुळे अमोनिया निर्माण होऊन त्याचा वास ऍझोलाला येतो. योग्य प्रमाणातच शेणखत टाकावे. 
- पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यामध्ये बाहेरून पाणी येऊन ऍझोला वाहून जाऊ शकतो. अधिक पावसाच्या ठिकाणी अधिक उंचावर करावे किंवा विटाच्या साह्याने 9 इंची टाकी करावी. 

डॉ. सुहास देशपांडे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) - 9423267309 
- डॉ. शिवराज पवार, पशुधन विकास अधिकारी - 9665507510

Monday, February 17, 2014

संकरीत गायींचे देखबाल

वासरांचे संगोपन- 
वासरांच्या संगोपनाची सुरवात ते गर्भावस्थेत असल्यापासूनच होते. गाय गाभण असताना शेवटच्या तीन महिन्यांत गर्भाची वाढ विशेष होत असते. या दिवसांत गाईंना 10-15 कि. ग्रॅ. हिरवी वैरण, 5-7 कि.ग्रॅ. वाळलेली वैरण व 2.0-2-5 कि.ग्रॅ. अंबोण द्यावे. याबरोबर रोजचे 50 ग्रॅम क्षार मिश्रण द्यावे.
गाईंची प्रसूती स्वच्छ गोठ्यात होईल हे पाहावे. प्रसूतीनंतर वासराला स्वच्छ करावे. त्याच्या नाकपुड्या, तोंड व कान यात असलेला चिकट पदार्थ बोटाने काढून टाकावा. श्‍वासोच्छ्वास व रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी त्याची छाती व अंग चोळून काढावे. स्वच्छ कोरड्या गोणपाटावर ठेवून वासराला गाईच्या पुढे ठेवावे म्हणजे गाय स्वतः चाटून साफ करेल. 

वासराची नाळ शरीरापासून दोन इंच अंतरावर स्वच्छ कात्रीने कापून दोऱ्याने बांधावी व त्याला टिंक्‍चर आयोडीन लावावे. नाळेप्रमाणे वासराचे खूर पण काढावे. 
वासरू जन्मल्यानंतर 30 मिनिटांत पायावर उभे राहते. पहिले दूध म्हणजे चीक ताबडतोब दिला पाहिजे. चिकामध्ये वासरांना रोगप्रतिकारक शक्ती देणारे ऍन्टीबॉडीज असतात व प्रथिने व अन्य उपयोगी सत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. असे असल्याने पहिले तीन दिवस वासरांना चार वेळेस कासेला लावून दूध द्या. प्रत्येक वेळी पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लावू नये. जास्त दूध प्यायल्याने वासरांना त्रास होतो. 

थंडी, ऊन, वारा, पाऊस यांपासून वासराचे रक्षण करा. तिसऱ्या आठवड्यापासून वासराला अंबोण खायला उद्युक्त करावे. अंबोणवर दूध टाकून खायला द्यावे म्हणजे हळूहळू सवय लागेल. वासरांना कोवळे, कोरडे गवतदेखील तिसऱ्या आठवड्यापासून सुरू करावे. 

वासरांना पुढीलप्रमाणे दूध द्यावे ः 
45 दिवस वजनाला 10 टक्के दूध पाजावे. 
45 ते 60 दिवस वजनाला 8 टक्के दूध पाजावे. 
60 ते 90 दिवस वजनाला 5 टक्के दूध पाजावे. 

तीन महिन्यांनंतर दूध बंद करावे आणि वासरांसाठी मिळणारे अंबोण द्यावे व कोवळी, पालेदार, उत्तम प्रतीची वैरण द्यावी. 
वासरांना वेगळ्या गोठ्यात ठेवा व वासरांची गर्दी होऊ देऊ नये, तसेच गोठ्यात कोंदट व दमट वातावरण नसावे, कारण अशा वातावरणात माश्‍या, डास, गोचीड व गोमाश्‍यांची वाढ झपाट्याने होते. 

गोठ्यात पिण्याचे पाणी सतत उपलब्ध असावे, तसेच गोठ्यात मलमूत्र, घाण, कचरा वगैरे साठू देऊ नये. 
वासरांना पोटातील जंतासाठी महिन्यातून एक दिवस या प्रमाणे पहिल्या सहा महिन्यांपर्यंत जंताचे औषध पाजावे. सूक्ष्म जिवाणू, विषाणूजन्य रोगांपासून रक्षण करण्याकरता वासरांचे लसीकरण करून द्यावे. 

वासरांच्या गोठ्यात लहान-लहान कप्पे करून वयानुसार वेगवेगळी ठेवावीत. सर्व वासरे एकत्र ठेवल्यास मोठी धडधाकट वासरे लहान वासरांना अंबोण खाऊ देत नाहीत.

गाभण गायींची काळजी-
गर्भधारणा झाल्यापासून सहा महिने गर्भाची वाढ हळूहळू होत असते. या काळात गाय दूधही देत असते. त्यामुळे गाईस योग्य तो आहार नियमितपणे द्यावा म्हणजे त्याचा उपयोग गर्भालाही होतो. गर्भावस्थेच्या शेवटच्या तीन महिन्यांत म्हणजे 7 वा, 8 वा, 9 वा महिना या काळात गर्भाचे वजन पहिल्या सहा महिन्यांच्या साधारणपणे दुप्पट वाढते.
असे असल्याने या तीन महिन्यांत गाईंना शरीरनिभाव व गर्भवृद्धीसाठी रोजचे दोन किलोग्रॅम आंबोण द्यावे व क्षार कमतरता दूर करण्यासाठी रोजचे 50 ग्रॅम क्षार मिश्रण द्यावे. सात महिने पूर्ण झाल्यावर गाय आटवावी व कासेत स्तनदाहविरोधी प्रतिजैविक औषध सोडावे, म्हणजे कास निरोगी राहील. सहा महिन्यांनंतर गाभण गाईस चरण्याची वेळ कमी करावी. 

दिवसातून 2 ते 4 तास मोकळे चरण्यास एकट्याच गाईस सोडावे.गर्भावस्थेत गर्भाला गोलकृमीचा आजार होऊ शकतो. म्हणून सातव्या व आठव्या महिन्यांत गाभण गाईला गोलकृमीनाशक औषध पाजावे. 

कालवडींना गर्भावस्थेच्या शेवटच्या महिन्यात कासेला मालिश करावे, म्हणजे विण्यानंतर दूध काढायच्या क्रियेचा त्यांना सराव होईल. कालवडींना दुभत्या गाईंच्या गोठ्यात ठेवावे, म्हणजे दोहनकाळच्या वेळेत होणाऱ्या हालचालींचीही त्यांना सवय होते. 

प्रसूतिपूर्वी शेवटच्या एक-दोन दिवसांमध्ये गाभण गाईवर 24 तास लक्ष राहील अशा ठिकाणी बांधावे व सतत काळजीपूर्वक निरीक्षण करावे. काही अनियमित लक्षण दिसल्यास त्वरित उपाययोजना करावी. 

गाभण जनावरांना आरामशीरपणे बसण्यासाठी व उभे राहण्यासाठी पुरेशी जागा असावी. ऊन, वारा, पाऊस यांपासून अशा जनावरांचे संरक्षण करणे अत्यंत निकडीचे आहे. गाभण जनावर ज्या ठिकाणी बांधले जाते, ती जागा स्वच्छ, निर्जंतुक केलेली असावी. गोठ्यातील जमीन निसरडी असू नये.

दुभत्या जनावरांची जोपासना करताना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष निगा ठेवणे जरुरीचे असते. यासाठी जनावरांचे गोठे शास्त्रोक्त पद्धतीने बांधलेले असावेत. दुधाळ जनावरे व्याल्यापासून 60 ते 90 दिवसांत फळविली गेली पाहिजेत.
त्यामुळे 305 दिवसांचा दुधाचा काळ मिळेल व दोन वेतांतील अंतर 12 ते 14 महिन्यांचे राहील. गाय व्याल्यानंतर 3 महिन्यांनी गर्भधारणा झाली पाहिजे. त्यासाठी वीर्यदान झालेली जनावरे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासून घ्यावीत आणि गाभण असल्याची खात्री करावी. दुधाळ जनावरांना खरारा करावा. दिवसातून तीन वेळा पाणी पाजावे. ओला व सुका चारा योग्य प्रमाणात व योग्य वेळी द्यावा. 

गाभण म्हशींना पाण्याने रोज धुवावे. दिवसातून तीन वेळा स्वच्छ आणि थंड पाणी पाजावे. दिवसातून दोन वेळा सारख्या प्रमाणात आंबोण (खुराक) द्यावे. आंबोण, सुका चारा व हिरवा चारा हा जनावरांच्या वजनाच्या अडीच टक्के शुष्क प्रमाणात असावा. एक किलो आंबोण शरीर पोषणासाठी आणि दीड किलो आंबोण गर्भारपणाच्या काळात, असे एकूण अडीच किलो आंबोण गाभण गाईला द्यावे; तसेच पाच ते सात किलो सुका चारा, पंधरा ते 20 किलो हिरवा चारा द्यावा. 

यात 6 ते 7 किलो प्रथिनयुक्त चारा असावा. गाईचा गाभण काळ नऊ महिने, नऊ दिवस असतो; तर म्हशीचा गाभण काळ दहा महिने 10 दिवस इतका असतो. शेवटच्या गाभण दिवसांत विशेष काळजी घ्यावी. विण्यापूर्वी कासेला सूज आल्यास कास पिळून काढावी आणि कासेला पुढील सडाकडून जांघेकडे चोळावे किंवा जनावरांना थोडा व्यायाम द्यावा म्हणजे सूज कमी होईल. परंतु अशी कास गरम पाण्याने कधीही शेकू नये. 

गाय व्यायल्यानंतर गाईचे मागील पुठ्ठ चांगले शेकून काढावेत तसेच शेपटी, मागील पाय आणि कास स्वच्छ कोमट पाण्याने धुवावी. त्यानंतर तिला कोमट पाणी प्यायला द्यावे, तसेच सुका चारा खायला द्यावा. गाईला थंड पाणी किंवा ओला चारा देऊ नये. त्यामुळे वार पडायला वेळ लागतो. वार 7-8 तासांत पूर्ण पडली पाहिजे. व्याल्यानंतर एका तासात जनावरांची कास पिळून चीक काढावा व तो वासराला योग्य प्रमाणात पाजावा. चीक लवकर काढल्याने जनावरांची ओटी हलकी होते आणि जनावर वार फेकण्यावर आपले लक्ष केंद्रित करते. वार पडल्यानंतर गर्भाशयात चार फ्युरियाच्या गोळ्या भराव्यात ज्यामुळे गर्भाशयातील सर्व घाण बाहेर पडण्यास मदत होते. 

जनावर व्याल्यानंतर एक किलो बाजरी, अर्धा किलो मेथी, पाव किलो गूळ, 100 ग्रॅम गोडेतेल, 100 ग्रॅम खोबरे, 50 ग्रॅम मीठ, ओवा, बाळंतशेप आणि शेपू प्रत्येकी 20 ग्रॅम वापरून खिचडी शिजवावी आणि ही खिचडी दिवसातून दोन वेळा आंबवणात मिसळून द्यावी. गाईच्या दूध काढण्याच्या वेळा नियमित असाव्यात. 

दुभत्या व गाभण गाईचे संगोपन ः सामान्य गाईच्या शरीर पोषणासाठी लागणाऱ्या खाद्याव्यतिरिक्त दुभत्या गाईंना दूध उत्पादनाच्या 40 ते 50 टक्के जादा खुराक द्यावा. गाई धुऊन स्वच्छ ठेवाव्यात. कोणताही रोग झाल्यास त्यावर ताबडतोब उपचार करावेत. गाभण गाईंना गाभण काळातील शेवटच्या दोन ते अडीच महिन्यांत दीड ते अडीच किलो समतोल आहार द्यावा. विण्याच्या अगोदर 7 ते 8 दिवसांपासून पचनास सोपे व हलके खाद्य खाऊ घालावे. दररोज दोन तास फिरण्याचा व्यायाम द्यावा. प्रसूतीच्यावेळी अडचण येत असल्यास ताबडतोब पशुवैद्यकीय मदत घ्यावी. व्याल्यानंतर गाईची वार संपूर्ण पडली आहे याची खात्री करून ती त्वरित पुरून नष्ट करावी
जनावरांना नियमित खरारा करावा, नियमित अंघोळ घालावी. गोचीड हाताने प्रत्यक्ष काढून त्यांना जाळून टाकावे.
मोकाट पद्धतीऐवजी बंदिस्त गोपालनाचा अंगीकार करावा. 
गोठ्यांची व जनावरांची स्वच्छता राखावी. गोठ्यात अडगळ नको. गोठ्यातील जमीन, गव्हाण, खांब, भिंती इ. ठिकाणी फटी, खाचा, खोचा, छिद्रे नकोत. 
पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार गोचीड प्रतिबंधक कीटकनाशकांचा दक्षतापूर्वक वापर करावा. 

गोचीड प्रतिबंधक कीटकनाशकांच्या फवाऱ्याने गोठ्याचा परिसर, जमीन, भिंती फवारून घ्याव्यात, फटी, खाचा, खोचा, छिद्रे नष्ट करावीत. 
गोठ्याभोवती दलदल नको, झाडे, झुडपे नकोत, जेणे करून गोचिडांच्या पुनरुत्पादनास मदत होईल. गोठ्याभोवती 1-1.5 इंचाचा पाण्याचा पाट असावा. 
उंदीर, घूस यांसारख्या प्राण्यांचा बंदोबस्त करावा. सहायकांमार्फत तसेच इतर साधनांमार्फत गोचिडांचे संक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी. 

गोचीडनाशक वापरताना घ्यावयाची काळजी ः 
वरील गोचीडनाशके वापरताना डॉक्‍टरांचे मार्गदर्शन व उत्पादक कंपनीच्या सूचना काळजीपूर्वक अमलात आणाव्यात. 

एकच एक औषध नेहमी वापरण्याऐवजी विविध प्रकारची औषधे वापरावीत जेणे करून प्रभावी गोचीड निर्मूलन साध्य करता येईल. 
कीटकनाशक फवारणी वारा असताना, किंवा पावसाळ्यात करू नये. 

जखमेच्या ठिकाणी फवारणी करू नये. 
औषधे विषारी असल्यामुळे विषबाधा होणार नाही याची काळजी घ्यावी. 
विषबाधेचे लक्षण दिसल्यास प्रथम भरपूर पाण्याने जनावरास अंघोळ घालावी व तत्काळ पशुवैद्यकांची मदत घ्यावी. 

अशा रीतीने व्यापक उपद्रव मूल्य असणाऱ्या व पशुसंवर्धनातील उत्पन्नाच्या 15 टक्केपर्यंत उत्पन्नाच्या नुकसानीस कारणीभूत ठरणाऱ्या गोचिडांच्या नियंत्रणास व निर्मूलनास सातत्यपूर्ण व प्रामाणिक प्रयत्नांची नितांत आवश्‍यकता आहे.

व्यावसायिक दूध उत्पादनाच्या दृष्टीने होलस्टिन फ्रिजीयन, जर्सी या जातींना मागणी आहे. होलस्टिन फ्रिजीयन ही जात एका वेतात 6,000 लिटर दूध देते. दुधामध्ये स्निग्धता 3.5 टक्के असते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केलेली फुले त्रिवेणी ही जात आपल्या वातावरणात दूध उत्पादनाच्या दृष्टीने चांगली आहे. 

ही संकरित गाय अधिक दूध उत्पादन, अधिक फॅट, उत्तम रोगप्रतिकारक शक्ती असणारी जात आहे. या जातीचे वितातील सरासरी दुग्धोत्पादन 3,000 ते 3,500 लिटर असून, दुधातील फॅटचे प्रमाण 3.8 ते 4.2 टक्के आहे. 

फुले त्रिवेणी वळूचे गोठीत वीर्य गोसंशोधन व विकास प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर (दूरध्वनी क्र. 02426 - 243361) यांच्याशी संपर्क साधावा. या प्रकल्पावर गो व्यवस्थापनाबाबत माहिती मिळू शकेल.

दुधाळ जनावरांची निगा ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी गोठे हे शास्त्रोक्त पद्धतीने बांधलेले असावेत. दुधाळ जनावरे व्यायल्यानंतर 60 ते 90 दिवसांत फळवली पाहिजेत, त्यामुळे 305 दिवसांचा दुधाचा काळ मिळेल व दोन वेतांतील अंतर 12 ते 14 महिन्यांचे राहील. गाय व्यायल्यानंतर 3 महिन्यांनी गर्भधारणा झाली पाहिजे. 
त्यासाठी वीर्यदान झालेली जनावरे पशुवैद्यक अधिकाऱ्यांकडून तपासून घ्यावीत आणि गाभण असल्याची खात्री करून घ्यावी. दुधाळ जनावरांना खरारा करावा. दिवसातून तीन वेळा पाणी पाजावे. ओला व सुका चारा योग्य प्रमाणात योग्य वेळी द्यावा. गाभण म्हशींना रोज पाण्याने धुवावे. दिवसातून दोन वेळा सारख्या प्रमाणात आंबोण द्यावे. आंबोण, सुका चारा, हिरवा चारा हा जनावरांच्या वजनाच्या अडीच टक्के शुष्क प्रमाणात असावा. गाभण गाईला 1 किलो आंबोण शरीर पोषणासाठी आणि दीड किलो आंबोण गर्भारपणाच्या काळात द्यावे. तसेच पाच ते सात किलो सुका चारा व 20 किलो हिरवा चारा द्यावा. 

विण्यापूर्वी कासेला सूज आल्यास कास पिळून काढावी व कासेला पुढील सडाकडून जांघेकडे चोळावे किंवा जनावरांना थोडा व्यायाम द्यावा म्हणजे सूज कमी होईल. गाय व्यायल्यानंतर शेपटी मागील पाय, कास स्वच्छ कोमट पाण्याने धुवावी. त्यानंतर तिला कोमट पाणी प्यायला द्यावे. तसेच सुका चारा खायला द्यावा. गाईला थंड पाणी किंवा ओला चारा देऊ नये, त्यामुळे वार पडायला वेळ लागतो. वार 7 ते 8 तासांत पडली पाहिजे. व्यायल्यानंतर एका तासात जनावरांची कास पिळून चीक काढावा व तो वासराला योग्य प्रमाणात पाजावा. जनावर व्यायल्यानंतर एक किलो बाजरी, अर्धा किलो मेथी, पाव किलो गूळ, 100 ग्रॅम गोडेतेल, 100 ग्रॅम खोबरे, 50 ग्रॅम मीठ, ओवा, बाळंतशेप आणि शेपू प्रत्येकी 20 ग्रॅम वापरून खिचडी शिजवावी आणि ही खिचडी दिवसातून दोन वेळा आंबोणातून द्यावी. गाईचे दूध काढण्याच्या वेळा नियमित असाव्यात.
गोठा बांधताना गोठ्यासाठी किती खर्च झाला आहे, हे महत्त्वाचे नसून त्या गोठ्यामध्ये जनावरांचे संवर्धन किती प्रमाणात शास्त्रीय पद्धतीने करणे शक्‍य होईल व जनावरांना काय काय सुविधा आहेत हे महत्त्वाचे आहे. उत्तम गोठ्यासाठी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत. 
गोठा कमी खर्चाचा असावा. 
गोठ्यात जनावरांना चारा खाण्यासाठी उत्तम गव्हाण असावी. 


गव्हाणीची उंची अशी असावी, की त्यामुळे जनावरास सहज चारा, खाद्य खाता येईल. त्यामध्ये शेण अगर मूत्र जाणार नाही. तसेच जनावरांना गव्हाणीत पाय ठेवता येणार नाही. गव्हाण स्वच्छ करणे सोपे जाईल. 
गोठ्यामध्ये पावसाचे पाणी येणार नाही, चिखल होणार नाही, पाणी व मूत्र यांचा ताबडतोब निचरा होईल अशी रचना असावी. 
जनावरांना गोठ्यामध्ये सहज सुलभतेने बसणे व उभे राहणे शक्‍य होईल एवढी जागा असावी. 
जनावर गोठ्यात बांधल्यावर त्यांचे पाऊस, ऊन व वारा यांपासून संरक्षण झाले पाहिजे. 
गोठे हवेशीर असावेत. त्यात चांगले वायुविजन होईल, असे बांधकाम असावे. 
गोठ्यामध्ये जनावरांना पुरेसे, स्वच्छ, थंड पाणी पिण्याची सोय असावी.