Tuesday, November 12, 2013

काशीद बंधूंची आदर्श शेती मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब

सातारा जिल्ह्यातील वाघेरी (ता. कराड) येथील विजय व सुरेश भीमराव काशीद या भावंडांनी कष्ट, प्रामाणिक प्रयत्न, आधुनिक तंत्रज्ञान व मुक्त गोठा पद्धतीचा वापर या बाबींच्या जोरावर दुग्ध व्यवसायात दखलपात्र मजल मारली आहे. त्यांची ही धडपड शेतीतील तरुण पिढीला प्रेरणादायक आहे. अमोल जाधव 

शेतीची पार्श्‍वभूमी 
कराड शहरापासून उत्तरेस साधारण तेरा किलोमीटर अंतरावर वाघेरी गाव आहे. गावच्या डोंगरकुशीत काशीद यांची वडिलार्जित साडेतीन एकर शेती आहे. सतरा गुंठ्यांत घासगवत, 10 गुंठ्यांत मका, 35 गुंठे क्षेत्रात कडवळ, वीस गुंठे क्षेत्रात उसाचे पीक आहे. उर्वरित क्षेत्रात कडधान्याची पिके घेतात. शेतालगत तीन गुंठ्यांत सुसज्ज असा मुक्त संचार पद्धतीचा गोठा आहे. गाईंना फिरण्यासाठी मुक्त मैदान, स्वतंत्र पाण्याची सोय, निवाऱ्यासाठी शेड, तसेच खाद्य उपयोगी साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र खोलीही तेथे आहे. होल्स्टिन फ्रिजीयन जातीच्या 11 गाई व पाच कालवडी आहेत. सर्व जनावरे सशक्त आहेत. 

व्यवसायाला सुरवात विजय काशीद यांचे शिक्षण दहावी झाले. त्यांनी सुरवातीला नोकरीसाठी खूप धडपड केली. मात्र यश मिळाले नाही. सन 2007 पूर्वी त्यांनी तीन वर्षे चालक (ड्रायव्हर) म्हणून नोकरी केली. नोकरीऐवजी शेती व्यवसायच चांगल्या प्रकारे करण्याच्या इराद्याने त्यांनी 2007 ला दुग्ध व्यवसाय करण्याचा मनोदय आखला. सुरवातीला भांडवल नव्हते. मात्र कष्ट करण्याची तयारी असल्याने दूध खरेदीदाराकडून पन्नास टक्के रक्कम उचलस्वरूपी व उर्वरित रक्कम स्वतःकडील गुंतवून 27 हजार पाचशे रुपये खर्चून कराडमधील जनावरांच्या बाजारातून गाई घेतल्या. त्यांचे संगोपन सुरू केल्यानंतर उत्पादित दूध विक्रीतून सुमारे चार ते पाच महिन्यांत खरेदीदाराकडील उचल फिटली. त्यानंतर त्याच पद्धतीने दुसरी गाय खरेदी केली. अशा पद्धतीने पुढे चार गाईंचे सुसूत्रपणे संगोपन केले. त्यांना बंधू सुरेश यांचीही बारावीच्या शिक्षणानंतर साथ मिळू लागली. 

गोठा व्यवस्थापन चोख ठेवले दोघा भावंडांनी चिकाटीने कष्ट करत काही महिन्यांतच अंगावरील उचलीचा बोजा कमी केला. तेथून पुढे रोखीने गाई खरेदी केल्या. सुरवातीला पाच गाईंचा गोठा बांधीव होता. गाईंना स्तनदाह व जखमा होऊ लागल्याने बैठकीसाठी मॅटची सोय केली. गाईंना मोकळ्या वातावरणात हिंडता यावे यासाठी दोन वर्षांपासून मुक्त संचार पद्धतीचा गोठा बांधला. सुमारे 25 फूट रुंद व 85 फूट लांबीच्या आवारात गाईंना मुक्तपणे फिरण्याची सोय आहे. उर्वरित 15 फूट रुंद व 85 फूट लांबीच्या क्षेत्रफळात शेड आहे. गोठा उभारणीसाठी सुमारे तीन लाख 75 हजार रुपये खर्च आला. यात दूध खरेदीदाराकडून उचल घेऊन टप्प्याटप्प्याने काम पूर्ण केले. दूध काढणीवेळी गाई शेडमध्ये येतात. तेथे त्यांना वैरणीची कुट्टी व खाद्य देतात. दूध काढणीनंतर गाई मुक्त संचार करतात. मुक्त गोठ्यामुळे शेण काढणी, पाणी पाजणे, गोठ्याच्या स्वच्छतेकामी लागणारे 40 टक्के श्रम कमी झाले आहेत. त्याचबरोबर व्यवस्थापन खर्चात बचत घडली. 

दुग्धोत्पादन काशीद यांच्याकडील व्यायलेली गाय चार महिन्यांपर्यंत प्रति दिन 25 लिटर व गाभण कालावधीतील गाय चार ते सात महिन्यांच्या कालावधीपर्यंत 16 ते 17 लिटर दूध देते. प्रतिदिन एकूण सरासरी 110 लिटर दूध उत्पादित होते. प्रति लिटर सरासरी वीस रुपयांपर्यंत दर मिळतो. यातून दरमहा 66 हजारांपर्यंत उत्पन्न मिळते. त्यातील सुमारे पन्नास ते साठ टक्के व्यवस्थापन खर्च होतो. मुक्त संचार पद्धतीमुळे रोगराई निवारणासाठी होणाऱ्या खर्चात 70 ते 80 टक्‍क्‍यापर्यंत बचत झाली आहे. खाद्य, सुकी वैरण, टंचाईवेळी आणलेल्या ओल्या वैरणीसाठीही खर्च होतो. 

दोन वर्षांपासून पैदाशीच्या वासरांचे संगोपन केले आहे. तसेच तीन ते चार वेत झालेल्या गाईंची विक्रीही केली आहे. त्यापासून उत्पन्न जोडले आहे. वडील भीमराव काशीद, आई सौ. कमल यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन व आत्मविश्‍वास मिळतो. पुढील कालावधीत प्रति दिन 225 ते 250 लिटर उत्पादन करण्याचे नियोजन आहे.

दूध खरेदीदार शाश्‍वत असल्यास हा व्यवसाय फायद्यात राहतो. असे काशीद बंधूंचे म्हणणे आहे. त्यामुळे शाश्‍वत खरेदीदाराकडेच ते दूध विक्री करतात. गोठ्यात दूध काढणी यंत्र आहे. प्रति चार मिनिटास 14 लिटर दूध काढणी क्षमता असणारे हे यंत्र आहे. भारनियमनावेळी पर्यायी व्यवस्था आहे. कष्ट व प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करण्याकडे त्यांचा कल असतो. सूत्रबद्धपणे व्यवस्थापन सांभाळल्याने विना थांबा दर्जेदार दूध उत्पादन घेणे त्यांना शक्‍य झाले आहे. 

अनुभवी शेतकऱ्यांकडील गोठ्यांना भेटी देऊन व्यवसायातील बरे-वाईट अनुभव जाणून घेतल्यानंतर त्यानुसार व्यवसाय सांभाळल्यामुळेही प्रगती साधता आली. पहाटे पाच ते सात व सायंकाळी साडेपाच ते सात या वेळेत गोठ्यातील व्यवस्थापन, तसेच वैरण काढणीची कामे काशीद बंधू स्वतः सांभाळतात. त्यातून मजुरीचा खर्च कमी केला आहे. 

गाईंना चाऱ्याबरोबर गोळी खाद्य, सरकी पेंड आदींचा वापर होतो. मुक्त गोठा पद्धत असल्याने रोगराईचे प्रमाण नगण्य आहे. जनावरांत कृत्रीम रेतन तंत्र वापरण्याच्या दृष्टीने पशुवैद्यक गोठ्यावर येतात. 

नैसर्गिक अपघाताने गाईंचा मृत्यू झाल्यास होणारे नुकसान टाळण्यासाठी गाईंचे विमा संरक्षणही घेतले आहे. 

दूध विक्री व खाद्यदराच्या हिशेबाने व्यवस्थापन नियंत्रित ठेवतात. 

साडेतीन एकर शेती व्यवस्थापनाकडेही लक्ष दिले जाते. ऊस, घासगवत, मका, कडवळ व कडधान्ये ही पिके घेतात. शेणाचे उत्कृष्ट पद्धतीचे भुकटीस्वरूपी खत तयार होते. ते पिकांसाठी वापरले जाते. 

नोकरीच्या मागे न लागता एखाद्या कठीण प्रसंगालाही धाडसाने सामोरे जात व्यवसाय कायमस्वरूपी टिकविण्याच्या हेतूने काशीद बंधूंची धडपड सुरू आहे. काहीही झाले तरी भांडवल उशाला असल्याने ते डगमगत नाहीत. 

कष्टाची आणखी बाजू सांगायची तर काशीद यांच्या गोठ्याकडे येणारा मार्ग शेतातून आहे. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या वाहनांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अशावेळी काशीद बंधू सायकलीला दुधाच्या किटल्या अडकवून अर्धा किलोमीटर अंतर दूध वाहतूक करतात. त्याच पद्धतीने खाद्याचीही वाहतूक करतात. दरमहा दोन ट्रेलर शेणखत मिळते. वर्षाकाठी पंधरा ट्रेलर शेणखत विकून त्यामधील रकमेतून सुकी वैरण विकत आणतात. उर्वरित शेणखत शेतात वापरतात. 

संपर्क - विजय काशीद, 9011921272 
सुरेश काशीद, 9921572634

आठ तरुणांनी यशस्वी केला दुग्ध व्यवसाय

एकत्र आलो अन दुग्धव्यवसायातून प्रगती झाली.. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सासोली, कुडासे (ता. दोडामार्ग) या गावांमधील आठ तरुणांनी एकमेकांना साहाय्य करीत धवलक्रांतीचे स्वप्न प्रत्यक्षात आणले आहे. परिसरातील बाजारपेठेचा अभ्यासकरीत टप्प्याटप्प्याने या युवकांनी दुग्धोत्पादनातून आर्थिक प्रगती साधली. गेल्या तीन वर्षांतील त्यांची ही प्रगती इतरांना प्रेरणा देणारी आहे. शिवप्रसाद देसाई 
सिंधुदुर्गातील सह्याद्रीच्या रांगामध्ये गोव्याच्या हद्दीला लागून असलेली सासोली आणि कुडासे ही नारळ, सुपारी बागायती असलेली गावे. या भागातील बहुसंख्य कुटुंबांचे भात, नारळ-सुपारीचे लागवड क्षेत्र मर्यादित असल्यामुळे मुंबई-गोव्यात नोकरी हा अर्थार्जनाचा मुख्य स्रोत. अशा या पारंपरिक मानसिकतेला छेद देत या गावातील मनोज गवस, अनिरुद्ध फाटक, सज्जन धाऊसकर, चिंतन सिद्धये, आनंद घाडी, समीर ठाकूर, रामकृष्ण ठाकूर आणि अरुण नाईक या तरुणांनी पशूपालनामध्ये स्वतःचे "करिअर' घडविले. आत्मविश्‍वास आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. 

आम्ही एकत्र आलो... सन 2010 मध्ये "लुपिन फाउंडेशन' या सेवाभावी संस्थेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन कार्यशाळा आयोजित केली होती. नोकरीच्या शोधात असलेले हे तरुण कार्यशाळेमध्ये सामील झाले. यातून त्यांना पशूपालनाचा मार्ग दिसला. प्रशिक्षणातून हे समविचारी तरुण एकत्र आले. त्यांच्या गावापासून गोवा राज्य पाच किलोमीटरवर असल्याने दुधाला चांगली बाजारपेठही उपलब्ध होती. याचा अंदाज घेऊन पहिल्या टप्प्यात प्रयोग म्हणून "नाबार्ड'च्या योजनेतून "लुपिन'च्या मार्गदर्शनाने एक - दोन होल्स्टिन फ्रिजियन गाई घेण्याचा निर्णय या तरुणांनी घेतला. गेल्या तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने या तरुणांच्या गोठ्यातील दोन गाईंची संख्या 13 ते 20 गाईंपर्यंत पोचली आहे. 

दुग्धव्यवसायातून साधली आर्थिक प्रगती... दुग्धव्यवसायाबाबत माहिती देताना सासोली गावातील मनोज रामचंद्र गवस म्हणाले, की घरची दोन एकर भातशेती, थोडी नारळ, सुपारीची झाडे आहेत. शेती सांभाळात पहिल्यादा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला; परंतु त्यामध्ये म्हणावा तसा नफा मिळत नव्हता. याच दरम्यान कार्यशाळेतून दुग्धव्यवसायाची माहिती मिळाली. बाजारपेठेचा अभ्यास करून सन 2010 मध्ये पहिल्यांदा एक जर्सी आणि एक होल्स्टिन फ्रिजीयन गाय जिल्हा बॅंकेच्या कर्ज योजनेतून खरेदी केली. या काळात परिसरातील प्रगतिशील शेतकऱ्यांशी संपर्क वाढविला. त्यांच्याकडून गाईंच्या व्यवस्थापनाची माहिती घेतली. गटातील मुलांच्या बरोबरीने चर्चा करून गाईंचे व्यवस्थापन ठेवले. पाच-सहा महिन्यांत दुग्धव्यवसायातून मिळणारा नफा पाहिल्यानंतर गाईंची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. गाईंना पुरेसा हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी दोन एकरांवर चारा पिकांची लागवड केली. 

असे आहे गाईंचे व्यवस्थापन - 1) गाईंच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी 30 मीटर लांब आणि 10 फूट रुंदीचा हवेशीर गोठा बांधला. गाईंना चारा कुट्टी खाता येईल आणि पाणी पिता येईल अशी गव्हाण बांधली. गोठा धुतलेले पाणी, गोमूत्र वाहून जाण्यासाठी कडेला नाली बांधली. नालीतून हे पाणी गोठ्याबाहेरील खड्यात जमा होते. ही शेण, गोमूत्राची स्लरी शेतकऱ्यांना विकली जाते. 
2) खाद्य साठवणुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली. सहा महिने पुरेल ऐवढे भात पिंजार, कडबा साठविला जातो. चारा कुट्टीसाठी यंत्र आहे. 
3) सध्या गोठ्यात 16 होल्स्टिन फ्रिजियन आणि चार जर्सी गाई आहेत. त्यातील 15 गाई दुधावर आहेत. 
4) सकाळी चार वाजता गाई आणि गोठा धुऊन गाईंना पशुखाद्य दिले जाते, यंत्राने धारा काढल्या जातात. त्यानंतर चारा कुट्टी दिली जाते. चारा संपल्यानंतर गव्हाण साफ करून पाणी पाजले जाते. त्यानंतर गाई रवंथ करतात. 
5) एक होल्स्टिन फ्रिजियन गाय दिवसाला 18 लिटर तर जर्सी गाय 12 लिटर दूध देते. दुधाळ गाईंना दररोज सकाळ- संध्याकाळ मिळून पाच किलो पशुखाद्य आणि सरासरी 20 किलो सुक्का आणि हिरवा चारा कुट्टी करून दिला जातो. 
6) संध्याकाळी सहा नंतर पुन्हा गाई धुऊन धारा काढल्या जातात. चारा, पाणी दिले जाते. 
7) गाईंना पशुतज्ज्ञांच्याकडून शिफारशीनुसार लसीकरण, कृत्रिम रेतन केले जाते. गाईंचे आरोग्य चांगले असल्याने दुग्धोत्पादनात सातत्य आहे. 
8) गवस स्वतः गाईंचे व्यवस्थापन ठेवतात. मदतीला दोन मजूर आहेत. 
9) आता गोठ्यातच कालवडी तयार केल्या जातात. प्रत्येक गाईंचे आरोग्य आणि दुग्धोत्पादनाची नोंद ठेवली जाते. 
10) सध्या दररोज सकाळ, संध्याकाळ मिळून 150 लिटर दूध गोव्यातील कुमयामळे या गावातील डेअरीला दिले जाते. स्वतःच्या गाडीतून दूध डेअरीला पोचविले जाते. दुधाला सरासरी 22 रुपये दर मिळतो आहे. रोजचे पशुखाद्य, मजुरी, चारा, वाहतूक असा खर्च वजा जाता 1500 रुपये शिल्लक राहतात. सध्या पशुखाद्य, जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापन खर्चात वाढ होत आहे. 
11) गवस शेणखताचा वापर स्वतःच्या भातशेती, आंबा, काजू बागेसाठी करतात. पीक उत्पादनवाढीसाठी याचा फायदा झाला आहे. उरलेले शेणखत परिसरातील शेतकऱ्यांना विकले जाते. दर वर्षी दहा हजार रुपये शेणखतातून मिळतात. 

संपर्कः मनोज गवस - 9673866603 

गटचर्चेतून प्रगती... दुग्धव्यवसायातील प्रगतीबाबत मनोज गवस म्हणाले, की आम्ही आठ जण जनावरांच्या व्यवस्थापनाबाबत चर्चा करतो. एकत्रित चारा, पशुखाद्य खरेदी केले जाते. एकमेकांच्या सल्ल्याने गाई, म्हशींची खरेदी करतो. कोल्हापूर जिल्ह्यातील पशुपालकांच्या गोठ्याला भेटी देऊन व्यवस्थापन समजाऊन घेतो. जमा- खर्चाची नोंद करतो. त्यानुसार काटेकोर नियोजन केले जाते. पशुतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाते. आम्ही सुधारित पद्धतीने गोठे बांधले आहेत. पहिल्यांदा लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता; परंतु हेच लोक आता आमच्याकडे प्रशिक्षणाला येतात. 

ऍग्रोवन ठरला मार्गदर्शक... या तरुणांनी ऍग्रोवनमधील पशुपालनाविषयीचे तांत्रिक लेख, यशोगाथांचा संग्रह केला आहे. त्यातून पशुव्यवस्थापनाच्या टिप्स मिळतात. प्रत्येकाने सुधारित पद्धतीने चारा लागवड केली आहे. काहींनी कराराने जमिनी घेऊन चारा लागवड केली. दोघा जणांनी शेळीपालनाला सुरवात केली आहे. गांडूळ खत प्रकल्प उभारण्याचे प्रत्येकाचे नियोजन आहे. 

अनुभवाचे बोल... कृषी शिक्षणाचा पुरेपूर वापर... 
सासोलीचा रोहित गवस हा कृषी पदविकाधारक आहे. त्याच्या गोठ्यात 10 संकरित गाई आणि पाच कालवडी आहेत. आंबा, काजू बागायतीच्या बरोबरीने दोन एकर चारा पिके आणि केळी लागवड त्याने केली आहे. शेती आणि पशुपालनातील नवीन माहिती गटातील तरुणांना तो सातत्याने देत असतो. 
रोहित गवस - 7798644057 

पॅकिंग करून दुधाची विक्री अनिरुद्ध फाटक याच्याकडे सध्या दहा जर्सी गायी आणि तीन म्हशी आहेत. दीड एकर शेती आहे. यामध्ये चारा पिकांची लागवड केली आहे. बाजारपेठेचा विचार करून म्हशीचे दूध अर्धा लिटर, पाव लिटरच्या पिशवीत पॅकिंग करून विकतो. चाळीस रुपये लिटर या दराने म्हशीच्या दुधाची विक्री होते. गाईचे दूध डेअरीला दिले जाते. येत्या काळात परिसरातील बागायतदारांना शेणखत, गांडूळ खत तयार करून विकण्याचे त्याचे नियोजन आहे. 
अनिरुद्ध फाटक - 9850550819 

म्हैसपालन ठरले फायद्याचे... चिंतन सिद्धये या तरुणाने कला शाखेतून पदवी आणि नंतर संगणक क्षेत्रातील पदविका मिळविली. नोकरी न करता वडिलोपार्जित शेती-बागायतीत तो रमला. शेतीला जोडधंदा म्हणून त्याने म्हैसपालन सुरू केले. सध्याच्या त्याच्या गोठ्यात 12 म्हशी आहेत. वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी चारा पिकांची लागवड केली आहे. पशुपालन व्यवसाय शेतीप्रगतीला फायदेशीर ठरला आहे. 
चिंतन सिद्धये - 9764231509 

सुधारित व्यवस्थापनाकडे... सज्जन धाऊसकर हे सुमारे 15 वर्षांपासून दुग्धव्यवसायात आहेत. या तरुणांच्याकडून सुधारित तंत्राची माहिती त्यांनी आता होल्स्टिन फ्रिजियन आणि जर्सी संकरित गायी घेऊन दुग्धव्यवसाय वाढविला आहे. 
सज्जन धाऊसकर-8275381476 

अनुकरणातून दुग्धव्यवसायात प्रगती... अरुण नाईक मालवाहू रिक्षा व्यवसाय करतात. थोडीफार शेतीही आहे. या तरुणांनी केलेला यशस्वी व्यवसाय पाहून त्यानेही यात उतरण्याचा निर्णय घेतला. त्याच्याकडे सध्या सहा जर्सी गायी आहेत. शेतीला पशुपालनाची जोड दिली आहे. 

इतरांनी केले अनुकरण... कुडासे-वानोशीवाडी हे आनंद घाडी यांचे गाव. नारळ-सुपारी हा येथील उत्पन्नाचा प्रमुख स्रोत. त्यांनी पशुसंवर्धन व्यवसाय निवडला आणि यशस्वीही केला. सध्या त्यांच्या गोठ्यात 14 होल्स्टिन फ्रिजियन आणि जर्सी गाई आहेत. त्यांचे अनुकरण गावातील तरुणांनी केले आहे.

सस्ते यांना आदर्शवादी आधुनिक "डेअरी फार्म'

सातारा जिल्ह्यातील निंबळक (ता. फलटण) येथील हिरालाल हणमंत सस्ते यांनी नोकरी सोडून दुग्ध व्यवसायाचा मार्ग पत्करला. पारंपरिक पद्धतीतील गोठा व्यवस्थापनात नफा व खर्चाचा मेळ घालताना त्यांची चांगलीच दमछाक व्हायची. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी मुक्त संचार गोठा पद्धती, त्याचबरोबर चारा व खुराकाचे सूत्रबद्ध नियोजन केले. एक व्यक्ती-एक गोठा ही संकल्पनाही साकारल्याने आजमितीला हा व्यवसाय नफ्यात आणण्यात त्यांना यश मिळाले आहे. अमोल जाधव 
फलटणपासून पूर्वेला सुमारे 17 किलोमीटरवर ऊस बागायत पट्ट्यात निंबळक गाव आहे. येथील हिरालाल सस्ते एका फार्मास्युटिकल कंपनीत जिल्ह्यातील पाटण तालुक्‍यात मार्केटिंग क्षेत्रात नोकरीस होते. तेथे दोन वर्षे नोकरी केली. कुटुंब विभक्त झाल्यानंतर नोकरी सोडून वाट्याला आलेली शेतीच त्यांनी कसण्यास सुरवात केली. वडील श्री. हणमंत व बंधू राहुल यांच्या समवेत ते सध्या शेती व दुग्ध व्यवसाय सांभाळतात. वडिलोपार्जित सात एकर काळी कसदार स्वरूपाची त्यांची शेती असून, साडेतीन एकरांत ऊस, दोन एकरांवर डाळिंब आहे. दहा गुंठ्यांत डीएचएन-6 चारा पीक, 10 गुंठे मेथी घास, दहा गुंठे मारवेल व 20 गुंठ्यांत मका आहे. या क्षेत्रातून उपलब्ध होणाऱ्या चाऱ्याचा उपयोग सुमारे दहा गाई, चार कालवडी व एका म्हशीसाठी होतो. 

पूर्वीची परिस्थिती हिरालाल नोकरीत व्यस्त असतानाच्या काळात त्यांच्याकडे पारंपरिक स्वरूपाच्या गोठ्यात सुमारे 22 जनावरांचा सांभाळ व्हायचा. नोकरीनंतर हिरालाल यांनी भाजीपाला शेती सुरू केली, परंतु पुरेशा मजुरांअभावी ते ऊस शेतीकडे वळले. पूर्वी उसाचे एकरी 60 ते 65 टन उत्पादन मिळायचे. सेंद्रिय खतांचा वापर, पाण्याचे योग्य नियोजन यातून उत्पादनात किमान 20 ते 30 टक्के वाढ झाली. याच कालावधीत दुग्ध व्यवसायात ते पूर्ण ताकदीने उतरले. त्या वेळी गोठ्यात 50 ते 60 टक्के प्रमाणात सुमारे 22 संकरित गाई (होलस्टीन फ्रिजियन) होत्या. त्यातून दुधाचे अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन त्यांनी गायींची पैदास सुरू केली. त्याच वेळी टप्प्याटप्प्याने जुन्या गाईदेखील विकल्या. 

केलेले बदल 1) दुग्ध व्यवसायाचे मूल्यवर्धन करताना दोन वर्षांपासून मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब केला. 
2) 55 बाय 40 फूट अंतरात गोठा. मध्यभागी गाईंना अंग घासण्यासाठी लाकडी खांब. 
3) बांबूच्या वापरातून अल्प खर्चात गोठा उभारणे शक्‍य झाले. 
4) ओल्या चाऱ्याची बचत करण्यासाठी गोठ्यालगत प्रायोगिक तत्त्वावर हायड्रोपोनिक तंत्रावर आधारित, मक्‍यावर आधारित बीजांकुर खाद्यनिर्मिती पद्धत विकसित केली. त्यासाठी 15 बाय 10 फूट आकारात शेड आहे. 
- यात वाळलेला मका कोमट पाण्यात बारा तास भिजवला जातो. त्यानंतर पोत्यात बारा तास ठेवतात. त्यानंतर प्रति ट्रेमध्ये एक ते दीड किलो या प्रमाणात ठेवला जातो. ट्रेवर दर तीन तासांनंतर दीड मिनिट तुषार सिंचन प्रणाली सुरू ठेवून पाणी फवारले जाते. सुमारे आठ दिवसांनंतर तयार झालेले बीजांकुररूपी खाद्य गाईंना दिले जाते. प्रति किलो मक्‍यापासून 14 ते 15 किलो खाद्य प्राप्त होते. हा प्रयत्न प्रायोगिक तत्त्वावर असून, पुढील कालावधीत हे प्रमाण आणखी वाढवले जाणार आहे. 

- 12 बाय 10 फूट व 21 बाय 10 फूट अशा दोन आकारांतील तीन बेडवर ऍझोलानिर्मितीही केली जाते. 

दर सहा महिन्यांनी लसीकरण केले जाते. 

गोठ्यातील दैनंदिन व्यवस्थापन सूत्रबद्ध 1) सकाळी दूध काढणीनंतर प्रति गाय 15 किलो मक्‍याचे बीजांकुर खाण्यास दिले जातात. ऍझोला प्रति गाय एक पावशेर ते अर्धा किलोपर्यंत दिले जाते. संध्याकाळी दूध काढणीनंतर कडवळ, मेथी घास, मका व गवताची कुट्टी एकत्रित करून प्रति गाय 15 किलोप्रमाणे दिली जाते. 
2) गोठ्यात 24 तास पाण्याची सोय व्हावी यासाठी जागोजागी पाण्याच्या टाक्‍या आहेत. 
3) ऍझोलाच्या वाढत्या प्रमाणानुसार अन्य खुराकाचे प्रमाणही कमी करत आणले आहे. खुराकासाठी शेतातील उत्पादित मक्‍याचा वापर केला जातो. दर पंधरा दिवसाला 150 किलो मक्‍याचा घरातील चक्कीद्वारा भरडा केला जातो. गाईंना दररोजच्या खुराकात सरकी पेंड, सोयाबीन भरडा, मिनरल मिक्‍श्चर, मीठ एकत्रित मिसळून दिले जाते. 
व्यायलेली, गाभण, कालवड याप्रमाणे खाद्याचे प्रमाण बदलले जाते. 
4) दूधकाढणी यंत्राचा वापर होतो. 

हे झाले फायदे 1) हायड्रोपोनिक तत्त्वावरील बीजांकुर व ऍझोलाच्या वापरामुळे गाईंना ओला चारा नियंत्रितपणे देता आला. यामुळे याचा फायदा असा झाला, की मोठ्या संख्येतील गाईंच्या वैरण व्यवस्थापनासाठी आरक्षित होणाऱ्या दोन ते तीन एकरांऐवजी एका एकरातील चारा लागवडीद्वारा गाईंचा सांभाळ शक्‍य झाला. 
2) मका भरडा घरी करत असल्यामुळे खुराकातील खर्चात प्रति किलो 3 ते 4 रुपयांची बचत होते. 
3) मुक्त संचार पद्धतीमुळे गाईंचे आरोग्य तंदुरुस्त राहिले. आजारांचे प्रमाण कमी झाले. परिणामी, औषध व्यवस्थापनात सुमारे 70 टक्के बचत झाली. 
4) पूर्वीच्या उत्पादित दुधाचे फॅट 3.8 ते 3.9 व एसएनएफ 8.5 ते 8.6 होते. सुधारित पद्धतीतून फॅट आजघडीला 4.5 ते 4.7 व एसएनएफ 9 पर्यंत पोचले आहे.

अर्थशास्त्र थोडक्‍यात - सध्या सुमारे दहा गायी आहेत. सुमारे सहा ते सात गायींपासून (प्रति गाय प्रति दिन 20 ते 22 लिटर) दररोज सुमारे 140 ते 160 लिटर दूध मिळते. 
- दुधाची विक्री फलटण येथील एका डेअरीला केली जाते. प्रति लिटर 24 ते 27 रुपये दर मिळतो. मुक्त संचार पद्धत, हायड्रोपोनिक व ऍझोला पद्धत अवलंबल्यामुळे डेअरीकडून प्रति लिटर 3 ते 10 रुपये या प्रमाणात प्रोत्साहनपर वाढवूनही दिले जातात. 
- खुराक, वीजबिल, औषध व्यवस्थापन या कामी महिन्याकाठी प्रति गाय सुमारे बारा हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. निविष्ठांच्या खर्चानुसार तो वाढतोही. 
- वर्षाला काही कालवडींची विक्रीही होते. त्यातून तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. 
- 14 ते 15 ट्रेलर शेणखतावर प्रक्रिया करून त्याचा वापर शेतीत होतो. यामुळे उसाचे एकरी उत्पादन वाढवता आले. 

दृश्‍य परिणाम समोर आले 1) सुधारित तंत्रज्ञान वापरल्याने नफ्याचे प्रमाण वाढले. वडील, बंधूही व्यवस्थापन पाहतात. त्यामुळे बाहेरील मजुरांची गरज कमी झाली. 
2) एक व्यक्ती-एक गोठा संकल्पना वाढीस लागली. 
3) पूर्वी वडिलोपार्जित साडेतीन एकर शेती होती. शेती व पूरक व्यवसायातील उत्पन्नातून नवीन साडेतीन एकर शेती खरेदी केली. पाइपलाइनद्वारा पाण्याची सुविधा निर्माण झाली. 

नोकरीपेक्षा शेती व शेतीपूरक व्यवसाय केव्हाही चांगला, असे हिरालाल यांचे इतरांना सांगणे आहे. त्यांचे बंधू राहुल गेल्या वर्षी चॉकलेट कंपनीत नोकरीस होते. घरच्या दुग्ध व्यवसायात आशावाद निर्माण झाल्यानंतर नोकरी सोडून तेही शेतीत उतरले. दुग्ध व्यवसायात सातत्याने घडणारे बदल त्यांना परिसरातील संबंधित डेअरीच्या माध्यमातून समजतात. तेथील विषयतज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. 

संपर्क - हिरालाल सस्ते - 9881487275.