Tuesday, November 12, 2013

आठ तरुणांनी यशस्वी केला दुग्ध व्यवसाय

एकत्र आलो अन दुग्धव्यवसायातून प्रगती झाली.. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सासोली, कुडासे (ता. दोडामार्ग) या गावांमधील आठ तरुणांनी एकमेकांना साहाय्य करीत धवलक्रांतीचे स्वप्न प्रत्यक्षात आणले आहे. परिसरातील बाजारपेठेचा अभ्यासकरीत टप्प्याटप्प्याने या युवकांनी दुग्धोत्पादनातून आर्थिक प्रगती साधली. गेल्या तीन वर्षांतील त्यांची ही प्रगती इतरांना प्रेरणा देणारी आहे. शिवप्रसाद देसाई 
सिंधुदुर्गातील सह्याद्रीच्या रांगामध्ये गोव्याच्या हद्दीला लागून असलेली सासोली आणि कुडासे ही नारळ, सुपारी बागायती असलेली गावे. या भागातील बहुसंख्य कुटुंबांचे भात, नारळ-सुपारीचे लागवड क्षेत्र मर्यादित असल्यामुळे मुंबई-गोव्यात नोकरी हा अर्थार्जनाचा मुख्य स्रोत. अशा या पारंपरिक मानसिकतेला छेद देत या गावातील मनोज गवस, अनिरुद्ध फाटक, सज्जन धाऊसकर, चिंतन सिद्धये, आनंद घाडी, समीर ठाकूर, रामकृष्ण ठाकूर आणि अरुण नाईक या तरुणांनी पशूपालनामध्ये स्वतःचे "करिअर' घडविले. आत्मविश्‍वास आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. 

आम्ही एकत्र आलो... सन 2010 मध्ये "लुपिन फाउंडेशन' या सेवाभावी संस्थेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन कार्यशाळा आयोजित केली होती. नोकरीच्या शोधात असलेले हे तरुण कार्यशाळेमध्ये सामील झाले. यातून त्यांना पशूपालनाचा मार्ग दिसला. प्रशिक्षणातून हे समविचारी तरुण एकत्र आले. त्यांच्या गावापासून गोवा राज्य पाच किलोमीटरवर असल्याने दुधाला चांगली बाजारपेठही उपलब्ध होती. याचा अंदाज घेऊन पहिल्या टप्प्यात प्रयोग म्हणून "नाबार्ड'च्या योजनेतून "लुपिन'च्या मार्गदर्शनाने एक - दोन होल्स्टिन फ्रिजियन गाई घेण्याचा निर्णय या तरुणांनी घेतला. गेल्या तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने या तरुणांच्या गोठ्यातील दोन गाईंची संख्या 13 ते 20 गाईंपर्यंत पोचली आहे. 

दुग्धव्यवसायातून साधली आर्थिक प्रगती... दुग्धव्यवसायाबाबत माहिती देताना सासोली गावातील मनोज रामचंद्र गवस म्हणाले, की घरची दोन एकर भातशेती, थोडी नारळ, सुपारीची झाडे आहेत. शेती सांभाळात पहिल्यादा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला; परंतु त्यामध्ये म्हणावा तसा नफा मिळत नव्हता. याच दरम्यान कार्यशाळेतून दुग्धव्यवसायाची माहिती मिळाली. बाजारपेठेचा अभ्यास करून सन 2010 मध्ये पहिल्यांदा एक जर्सी आणि एक होल्स्टिन फ्रिजीयन गाय जिल्हा बॅंकेच्या कर्ज योजनेतून खरेदी केली. या काळात परिसरातील प्रगतिशील शेतकऱ्यांशी संपर्क वाढविला. त्यांच्याकडून गाईंच्या व्यवस्थापनाची माहिती घेतली. गटातील मुलांच्या बरोबरीने चर्चा करून गाईंचे व्यवस्थापन ठेवले. पाच-सहा महिन्यांत दुग्धव्यवसायातून मिळणारा नफा पाहिल्यानंतर गाईंची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. गाईंना पुरेसा हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी दोन एकरांवर चारा पिकांची लागवड केली. 

असे आहे गाईंचे व्यवस्थापन - 1) गाईंच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी 30 मीटर लांब आणि 10 फूट रुंदीचा हवेशीर गोठा बांधला. गाईंना चारा कुट्टी खाता येईल आणि पाणी पिता येईल अशी गव्हाण बांधली. गोठा धुतलेले पाणी, गोमूत्र वाहून जाण्यासाठी कडेला नाली बांधली. नालीतून हे पाणी गोठ्याबाहेरील खड्यात जमा होते. ही शेण, गोमूत्राची स्लरी शेतकऱ्यांना विकली जाते. 
2) खाद्य साठवणुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली. सहा महिने पुरेल ऐवढे भात पिंजार, कडबा साठविला जातो. चारा कुट्टीसाठी यंत्र आहे. 
3) सध्या गोठ्यात 16 होल्स्टिन फ्रिजियन आणि चार जर्सी गाई आहेत. त्यातील 15 गाई दुधावर आहेत. 
4) सकाळी चार वाजता गाई आणि गोठा धुऊन गाईंना पशुखाद्य दिले जाते, यंत्राने धारा काढल्या जातात. त्यानंतर चारा कुट्टी दिली जाते. चारा संपल्यानंतर गव्हाण साफ करून पाणी पाजले जाते. त्यानंतर गाई रवंथ करतात. 
5) एक होल्स्टिन फ्रिजियन गाय दिवसाला 18 लिटर तर जर्सी गाय 12 लिटर दूध देते. दुधाळ गाईंना दररोज सकाळ- संध्याकाळ मिळून पाच किलो पशुखाद्य आणि सरासरी 20 किलो सुक्का आणि हिरवा चारा कुट्टी करून दिला जातो. 
6) संध्याकाळी सहा नंतर पुन्हा गाई धुऊन धारा काढल्या जातात. चारा, पाणी दिले जाते. 
7) गाईंना पशुतज्ज्ञांच्याकडून शिफारशीनुसार लसीकरण, कृत्रिम रेतन केले जाते. गाईंचे आरोग्य चांगले असल्याने दुग्धोत्पादनात सातत्य आहे. 
8) गवस स्वतः गाईंचे व्यवस्थापन ठेवतात. मदतीला दोन मजूर आहेत. 
9) आता गोठ्यातच कालवडी तयार केल्या जातात. प्रत्येक गाईंचे आरोग्य आणि दुग्धोत्पादनाची नोंद ठेवली जाते. 
10) सध्या दररोज सकाळ, संध्याकाळ मिळून 150 लिटर दूध गोव्यातील कुमयामळे या गावातील डेअरीला दिले जाते. स्वतःच्या गाडीतून दूध डेअरीला पोचविले जाते. दुधाला सरासरी 22 रुपये दर मिळतो आहे. रोजचे पशुखाद्य, मजुरी, चारा, वाहतूक असा खर्च वजा जाता 1500 रुपये शिल्लक राहतात. सध्या पशुखाद्य, जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापन खर्चात वाढ होत आहे. 
11) गवस शेणखताचा वापर स्वतःच्या भातशेती, आंबा, काजू बागेसाठी करतात. पीक उत्पादनवाढीसाठी याचा फायदा झाला आहे. उरलेले शेणखत परिसरातील शेतकऱ्यांना विकले जाते. दर वर्षी दहा हजार रुपये शेणखतातून मिळतात. 

संपर्कः मनोज गवस - 9673866603 

गटचर्चेतून प्रगती... दुग्धव्यवसायातील प्रगतीबाबत मनोज गवस म्हणाले, की आम्ही आठ जण जनावरांच्या व्यवस्थापनाबाबत चर्चा करतो. एकत्रित चारा, पशुखाद्य खरेदी केले जाते. एकमेकांच्या सल्ल्याने गाई, म्हशींची खरेदी करतो. कोल्हापूर जिल्ह्यातील पशुपालकांच्या गोठ्याला भेटी देऊन व्यवस्थापन समजाऊन घेतो. जमा- खर्चाची नोंद करतो. त्यानुसार काटेकोर नियोजन केले जाते. पशुतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाते. आम्ही सुधारित पद्धतीने गोठे बांधले आहेत. पहिल्यांदा लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता; परंतु हेच लोक आता आमच्याकडे प्रशिक्षणाला येतात. 

ऍग्रोवन ठरला मार्गदर्शक... या तरुणांनी ऍग्रोवनमधील पशुपालनाविषयीचे तांत्रिक लेख, यशोगाथांचा संग्रह केला आहे. त्यातून पशुव्यवस्थापनाच्या टिप्स मिळतात. प्रत्येकाने सुधारित पद्धतीने चारा लागवड केली आहे. काहींनी कराराने जमिनी घेऊन चारा लागवड केली. दोघा जणांनी शेळीपालनाला सुरवात केली आहे. गांडूळ खत प्रकल्प उभारण्याचे प्रत्येकाचे नियोजन आहे. 

अनुभवाचे बोल... कृषी शिक्षणाचा पुरेपूर वापर... 
सासोलीचा रोहित गवस हा कृषी पदविकाधारक आहे. त्याच्या गोठ्यात 10 संकरित गाई आणि पाच कालवडी आहेत. आंबा, काजू बागायतीच्या बरोबरीने दोन एकर चारा पिके आणि केळी लागवड त्याने केली आहे. शेती आणि पशुपालनातील नवीन माहिती गटातील तरुणांना तो सातत्याने देत असतो. 
रोहित गवस - 7798644057 

पॅकिंग करून दुधाची विक्री अनिरुद्ध फाटक याच्याकडे सध्या दहा जर्सी गायी आणि तीन म्हशी आहेत. दीड एकर शेती आहे. यामध्ये चारा पिकांची लागवड केली आहे. बाजारपेठेचा विचार करून म्हशीचे दूध अर्धा लिटर, पाव लिटरच्या पिशवीत पॅकिंग करून विकतो. चाळीस रुपये लिटर या दराने म्हशीच्या दुधाची विक्री होते. गाईचे दूध डेअरीला दिले जाते. येत्या काळात परिसरातील बागायतदारांना शेणखत, गांडूळ खत तयार करून विकण्याचे त्याचे नियोजन आहे. 
अनिरुद्ध फाटक - 9850550819 

म्हैसपालन ठरले फायद्याचे... चिंतन सिद्धये या तरुणाने कला शाखेतून पदवी आणि नंतर संगणक क्षेत्रातील पदविका मिळविली. नोकरी न करता वडिलोपार्जित शेती-बागायतीत तो रमला. शेतीला जोडधंदा म्हणून त्याने म्हैसपालन सुरू केले. सध्याच्या त्याच्या गोठ्यात 12 म्हशी आहेत. वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी चारा पिकांची लागवड केली आहे. पशुपालन व्यवसाय शेतीप्रगतीला फायदेशीर ठरला आहे. 
चिंतन सिद्धये - 9764231509 

सुधारित व्यवस्थापनाकडे... सज्जन धाऊसकर हे सुमारे 15 वर्षांपासून दुग्धव्यवसायात आहेत. या तरुणांच्याकडून सुधारित तंत्राची माहिती त्यांनी आता होल्स्टिन फ्रिजियन आणि जर्सी संकरित गायी घेऊन दुग्धव्यवसाय वाढविला आहे. 
सज्जन धाऊसकर-8275381476 

अनुकरणातून दुग्धव्यवसायात प्रगती... अरुण नाईक मालवाहू रिक्षा व्यवसाय करतात. थोडीफार शेतीही आहे. या तरुणांनी केलेला यशस्वी व्यवसाय पाहून त्यानेही यात उतरण्याचा निर्णय घेतला. त्याच्याकडे सध्या सहा जर्सी गायी आहेत. शेतीला पशुपालनाची जोड दिली आहे. 

इतरांनी केले अनुकरण... कुडासे-वानोशीवाडी हे आनंद घाडी यांचे गाव. नारळ-सुपारी हा येथील उत्पन्नाचा प्रमुख स्रोत. त्यांनी पशुसंवर्धन व्यवसाय निवडला आणि यशस्वीही केला. सध्या त्यांच्या गोठ्यात 14 होल्स्टिन फ्रिजियन आणि जर्सी गाई आहेत. त्यांचे अनुकरण गावातील तरुणांनी केले आहे.

No comments:

Post a Comment