Wednesday, January 16, 2013

रोगांपासून वाचवा म्हशीच्या पारडांना


म्हशींच्या गोठ्यामध्ये शेण, मूत्र, सडलेला चारा इत्यादींमुळे सूक्ष्म जिवाणूंची झपाट्याने वाढ होते. त्यामुळे अनेक संक्रमणांचा आणि रोगराईचा धोका निर्माण होतो. म्हशीची पारडे आजारी पडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो. आजारामुळे त्यांचा मृत्यूदर वाढू शकतो. त्यामुळे डेअरीचे भवितव्य संकटात येते. हे प्रकार टाळण्यासाठी म्हशीच्या पारड्यांचे चोख व्यवस्थापन केले पाहिजे.
म्हशीच्या वासरांमध्ये (पारडे) पहिल्या सहा महिन्यांत आणि त्यातल्या त्यात वयाच्या पहिल्या तीन महिन्यांत मृत्यूदर जास्त असतो. याचे प्रमुख कारण असे आहे की, गोठ्यातील अस्वच्छतेमुळे अनेक रोगांचे संक्रमण होते आणि कृमींच्या त्रासामुळे मृत्यूदर वाढतो. जेव्हा पारडे गोठ्यात इतरत्र चाटतात तेव्हा त्यांच्या पोटात कृमी, त्यांची अंडी आणि इतर सूक्ष्म जिवाणू प्रवेश करून अनेक प्रकारची संक्रमणे आणि आजार निर्माण करतात. हे टाळण्यासाठी स्वच्छता बाळगावी.
गोठ्यात आणि आसपास पडलेले शेण, मूत्र, कचरा वगैरे ताबडतोब दूर करून तेथे पाणी ओतून स्वच्छता करावी. सर्व वासरांना एकाच घमेल्यात दूध पाजू नये. दुसर्‍या घमेल्याची गरम पाण्याने व्यवस्थित स्वच्छता करून त्यात दूध पाजावे. उरलेले दूध दुसर्‍या पारड्यास पाजू नये. कारण त्यात पहिल्या पारड्याची लाळ मिसळलेली असते व त्यामुळे संक्रमण होऊ शकते. बिनाजोडाची गोल आकाराची कोरडी आणि स्वच्छ घमेली कल्हई केलेली किंवा ऍल्युमिनियमची घमेली दूध पाजण्यासाठी वापरावी. रिकामी घमेली प्रथम थंड पाण्याने स्वच्छ धुवावी मग त्यात गरम पाणी आणि धुण्याच्या सोड्याचे मिश्रण घालून ती स्वच्छ घासावी आणि परत गरम पाण्याने स्वच्छ घासावी. शेवटी ती उन्हात लोखंडी रॅकमध्ये उपडी (उलट) घालून चांगली कोरडी होईपर्यंत तापवून सुकवावी. दूध पाजण्याआधी एक तास आधीपर्यंत पाड्यांच्या तोंडाला दोरीची मुसकी बांधावी, दूध पाजल्यानंतर स्वच्छ कापडाने त्यांचे तोंड कोरडे करावे आणि त्यांना एक चिमूटभर मीठ चाटवावे म्हणजे त्यांना इतरत्र चाटण्याची इच्छा कमी होईल. नंतर परत एक तासापर्यंत त्यांच्या तोंडाला पुन्हा मुसकी बांधावी. यामुळे त्यांच्या इतरत्र चाटण्याच्या सवयीला पायबंद बसतो आणि त्यांना संक्रमणांचा आणि कृमीचा त्रास कमीत कमी होतो.
नाळ बांधणे
म्हैस व्यायल्यानंतर पारड्याची नाळ त्याच्या शरीरापासून एक ते दीड इंच अंतरावर आयोडीन किंवा तत्सम जंतुनाशक औषधात बुडविलेल्या दाट दोर्‍याने घट्ट बांधून उरलेला खालचा लोंबकळणारा भाग स्वच्छ ब्लेडने कापून घ्यावा. जखम भरेपर्यंत रोज जंतूनाशक औषध लावावे. यामुळे अनेक संक्रमणांपासून पारड्याचे रक्षण होईल.
चीक पाजणे
नुकत्याच जन्म झालेल्या पारड्यास अर्ध्या तासाच्या आत तिच्या (मातेचा) चिक पाजावा. त्यात गॅमा ग्लोबीलीन नावाची प्रतिपिंडे भरपूर असल्यामुळे वासराची रोगप्रतिबंधक शक्ती वाढते. त्यामुळे मृत्यूदर कमी होतो.
कृमीनाशक औषधी पाजणे
पारडाच्या आतड्यात अनेक प्रकारची कृमी होऊ शकतात. ते पाड्यांचे रक्त शोषण करतात. त्यामुळे खाल्लेला चारा व दूध त्यांच्या अंगी लागत नाही. त्यांची शरीरवाढ खुंटते म्हणून त्यांना दर तीन महिन्यांतून एकदा अलबेन्डॅझॉलसारखे कृमीनाशक औषध पाजावे.
बाह्य परजीवींचा नाश
बाह्य परजीवी जसे उवा, गोचीड, गोमाशा, पिसू वगैरे पारडांना चावतात आणि त्यांचे रक्त शोषण करतात. त्यामुळे त्या बेचैन राहतात. त्यांचे खाण्या-पिण्याकडे नीट लक्ष राहत नाही आणि त्यांना दुय्यम आजार जसे थायलेरियॅसिस, लेप्टोस्पायरोसिस, बॅबेशिओसिस वगैरे होण्याची शक्यता निर्माण होते. त्यांची वाढ खुंटते. म्हणून हे सर्व टाळण्यासाठी त्यांना रोज खरारा करावा. (अंगावर ब्रश फिरवावा) त्यांना रोज पाण्याने आंघोळ घालावी. एवढे करूनही बाह्य परजीवींचा उपद्रव झाल्यास तर त्यांच्या नाशासाठी योग्य औषध जसे सायपरमेट्रीन एक मिलिलीटर किंवा डेल्टामेट्रीन दोन मिलिलीटर प्रति लिटर पाण्यात मिसळून वेगळ्या पंपाने वासरांच्या शरीरावर फवारावे.
लसीकरण
पारडांना पावसाळ्याआधी पशूंच्या डॉक्टरांकरवी तोंडखुरी, पायखुरी रोग, घटसर्प, काळपोई आणि फर्‍या वगैरे रोगांविरुद्धच्या लसी टोचून घ्याव्यात. म्हणजे त्यांच्यात प्रतिकारशक्ती निर्माण होऊन त्यापासून त्यांचे रोगांपासून संरक्षण होईल.
- डॉ. सुनील रोकडे,
प्रमुख शास्त्रज्ञ (पशुधन उत्पादन आणि व्यवस्थापन) कृषी विज्ञान केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, नागपूर

गाई- म्हशींमधील कासेच्या आजारावर करा उपचार

गाई, म्हशींना कास आणि सडाचे आजार झाल्यास त्यांच्या दूध उत्पादनावर परिणाम होतो. जनावरांचे आरोग्य खालावते. त्यामुळे व्यवस्थापन खर्च वाढत जातो. हे लक्षात घेऊन गाई, म्हशींच्या कासेची तपासणी करावी. आजाराची लक्षणे ओळखून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत. 

कासेचे व सडाचे आजार हे प्रामुख्याने 1) कासेच्या व सडांच्या त्वचेचे आजार, 2) सडाच्या पोकळीमधील विकार आणि सडाच्या तोंडाचे आजार या प्रकारात विभागले जातात. कास, सडाचे रोजच्या रोज निरीक्षण करावे. सड, कासेवर हात फिरवल्यास सहजासहजी आजाराची लक्षणे दिसतात. निरीक्षण करताना सडांवर ताज्या अथवा जुन्या जखमा झाल्या आहेत का हे पाहावे. अधू झालेल्या सडाचे आकारमान, जाडी या गोष्टींची इतर सडांशी तुलना करून पाहावी. सडाच्या वरच्या भागावर जखमा नसतील, सूज नसेल तर सड दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये अथवा अंगठा व पहिले बोट यामध्ये रोल करून पाहावा. यामुळे सडांची अंतर्गत पोकळीमधील विकार दिसून येतात. शंका असल्यास मधून मधून कासेची, सडांची तसेच दुधाची तपासणी पशुवैद्यकाकडून करून घ्यावी. 

1) सडांची संख्या चारपेक्षा जास्त असणे -
गाई-म्हशींमध्ये मागच्या किंवा पुढच्या सडाच्या जोडीच्या मध्ये लहान आकाराचे सड वाढलेले असतात. अशा सडांची दूध देण्याची कार्यक्षमता जनावर व्यायल्यानंतर कळून येते. अशा सडांचा धारा काढताना अडथळा निर्माण होतो. शास्त्रीयदृष्ट्या असे आढळून आले आहे, की अशा सडांचा दूध उत्पादनावर कोणताही फायदा आढळून येत नाही. 
उपचार -
अशा सडांमधून दूध येत असल्यास उपचार नाही केला तरी चालतो. मात्र सडांमधून दूध येत नसेल आणि धार काढताना अडथळा निर्माण होत असेल तर ते सड पशुवैद्यकाकडून स्थानिक पद्धतीची भूल देऊन शस्त्रक्रिया करून काढून घ्यावे. ही शस्त्रक्रिया जनावराच्या भाकड काळामध्येच करावी. 

2) इजा होऊन सड फाटणे - 
सडांवर जखमा होणे, ओरखडणे हे गाई-म्हशींच्या तुलनेने शेळ्या-मेंढ्यांमध्ये जास्त आढळून येते. कारण त्यांच्या कासेचा आकार निमुळता असतो व सडांची लांबी जास्त असते. शेळ्यांमध्ये काटेरी झुडपांमधून चरताना कासेवर व सडांवर काटेरी जखमा होतात. गोठ्यामध्ये ओबडधोबड दगडगोटे असल्यास बसताना, उठताना कासेवर, सडांवर जखमा होतात. 
उपचार -
जखम जर त्वचेच्या वरच्या भागावर असेल तर स्वच्छ पाण्यामध्ये जंतुनाशकाचे द्रावण टाकून धुऊन घ्यावी. 
जखमेवरची सडलेली त्वचा व घाण काढून घ्यावी. जखमेवर चार ते पाच दिवस प्रतिजैविके असलेले मलम लावावे. 
जखम अतिखोल असल्यास ताबडतोब जखमेवर टाके घालून घ्यावेत. टाके घातलेल्या सडामधील दूध शक्‍यतो सायफन ट्यूब टाकून काढावे. जखम संपूर्ण बरी होईपर्यंत जखमेची स्वच्छता ठेवावी व प्रतिजैविकाचे इंजेक्‍शन द्यावे. 

3) सडांवर इजा होऊन अनैसर्गिक छिद्र पडणे (टीट फिस्टुला) -
काटेरी वनस्पतींमध्ये चरताना काट्यांची इजा होणे, तार कुंपणाची इजा होणे इत्यादी धारदार व टोकदार वस्तूच्या इजेमुळे सडांवर खोलवर जखम होऊन सडाला छिद्र पडते. 
लक्षणे - 
सडांवर कापल्यासारखी खोल जखम होते, सडांवर सूज येते, जखमेतून दूध गळती होते, जखम लहान असल्यास फक्त कास भरल्यानंतर व दूध काढताना गळती होते. जखम मोठी असल्यास नेहमी जखमेतून दूध गळती होत राहते. 
उपचार - 
जखम लहान असल्यास पोटॅशिअम परमॅंगनेटच्या खड्याने छिद्रावर दाब द्यावा व जखमेची मलमपट्टी करावी. 
छिद्राचा आकार मोठा असल्यास त्यावर शस्त्रक्रिया करून घेऊन छिद्र बंद करून घ्यावे. 
अशा प्रकारची शस्त्रक्रिया जनावराच्या भाकड काळामध्ये करून घेतल्यास फायदेशीर ठरते. मात्र दुभत्या जनावरांमध्ये तातडीचा उपाय म्हणून करावी लागते. 

4) एकमेकांना जुळलेले सड असणे - 
यामध्ये दोन किंवा अधिक सड कातडीच्या भागावर एकमेकांना जुळलेले असतात. 
उपचार - अशा सडांवर छोटीशी शस्त्रक्रिया करून एकमेकांपासून मोकळे करता येतात. 

5) कास, सडांवर चामखिळीसारख्या गाठी वाढणे -
यामध्ये सडांवर व कासेवर एक किंवा एकापेक्षा जास्त गाठी वाढलेल्या असतात. याचा प्रादुर्भाव पॅपिलोमा विषाणूंमुळे होतो. अशा गाठी संसर्गजन्य असतात. याचा प्रादुर्भाव गोठ्यातील दुसऱ्या जनावरांना होतो. काही गाठी जन्मजात असतात. 
लक्षणे - 
सडांवर किंवा कासेवर चामखिळीसारख्या गाठींची वाढ झालेली दिसून येते. याचा दूध उत्पादनावर जास्त कोणताही परिणाम होत नाही. 
गाठी तडकल्यानंतर फुटून कासेवर व सडांवर जखमा होतात व धार काढताना जनावरास वेदना होतात. धारा काढताना अडथळा निर्माण होतो. 
उपचार -
गाठी मोठ्या आकाराच्या असतील तर गाठीच्या तळाशी नायलॉनचा धागा घट्ट बांधून ठेवावा. कालांतराने रक्तपुरवठा बंद होऊन गाठ गळून पडते. छोट्या आकाराच्या जास्त गाठी असतील तर पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार मलम लावावे. 
मोठ्या आकाराच्या गाठी शस्त्रक्रिया करून घेऊन काढाव्यात. अशा गाठी काढून त्यापासून लस बनवून ती जनावरास कातडीखाली टोचली असता गाठी संपूर्णपणे नाहीशा होतात. पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ येथे लस तयार करून दिली जाते. 

6) सडामध्ये दुधाचे खडे तयार होणे -
दुधातील क्षाराचा थर जमा होऊन कालांतराने त्याचे खड्यात रूपांतर होते; परंतु अशा प्रकारचा आजार दुर्मिळ आहे. 
लक्षणे - दूध काढताना अडथळा निर्माण होतो, दुधाची धार सरळ येत नाही, सडांवर दाबून पाहिले असता खडे जाणवतात. 
उपचार - 
क्षाराचे खडे लहान असल्यास दुधावाटे आपोआप बाहेर पडतात. खडे मोठे असल्यास बाहेरून सड दाबल्यास लक्षात येते. 
असे खडे चिमट्याच्या साह्याने पशुवैद्यकाकडून फोडून घ्यावेत, दुधावाटे पिळल्यास खडे बाहेर पडतात. खडा फारच मोठा असल्यास शस्त्रक्रिया करून काढावा लागतो. 

7) सडाच्या पोकळीमध्ये पडद्याची जाळी वाढणे (टीट स्पायडर) - 
यामध्ये सडाच्या अंतर्गत पोकळीमध्ये पडदा वाढलेला असतो. त्यामुळे दूध येण्यास अडथळा निर्माण होतो. हा विकार आनुवंशिक असू शकतो. सडांची अंतर्गत वाढ संपूर्णपणे झालेली नसते. सडांवर इजा होणे, गाठ वाढणे तसेच जंतुसंसर्गामुळे होऊ शकतो. 
दूध काढण्याची अयोग्य पद्धतीमुळे हा आजार होतो. 
लक्षणे - सडातून दूध येण्यास अडथळा निर्माण होतो. अडथळ्याच्या वरच्या भागावर दूध साकळलेले असते. खालच्या भागावर पोकळी असल्याचा भास होतो. काही वेळेस सडातून दूध पूर्णपणे बंद होते 
उपचार -
पडदा लहान असेल तर हडसन स्पायरल टीट नावाच्या हत्याराने काढता येतो. अडथळा मोठा असेल तर शस्त्रक्रिया करून काढावा लागतो. जनावराच्या भाकड काळामध्येच शस्त्रक्रिया करून घ्यावी. 

8) सडाच्या पोकळीमध्ये गाठ वाढणे (टीट सिर्स्टन) -
यामध्ये सडाच्या पोकळीमध्ये अनियमित आकाराची गाठ वाढलेली असते. त्यामुळे सडामधून दूध येण्यास अडथळा निर्माण होतो. दुभत्या जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणावर हा आजार दिसतो. अयोग्य पद्धतीने दूध काढल्याने हा आजार होतो. वारंवार सडांना होणाऱ्या इजा यासाठी कारणीभूत ठरतात. 
लक्षणे - आजाराची सुरवात सडाच्या एका भागावर होते, पूर्ण सडामध्ये गाठ पसरते. गाठीचा आकार तिचे स्वरूप व मूळ कारणावर अवलंबून असतो. गाठ जर सडाच्या टोकावर असेल तर आजार बरा होण्याची शक्‍यता वाढते, मात्र गाठ खूप आतल्या भागात असेल तर उपचार करणे त्रासदायक होते. गाठीमुळे दुधाची धार नीट येत नाही. 
उपचार -
गाठ लहान असेल तर छोट्या शस्त्रक्रियेने टीट ट्यूमर एक्‍सट्राक्‍टर काढून ठीक करता येते. गाठ मोठी असल्यास मोठी शस्त्रक्रिया करून काढून घ्यावी लागते. 

9) सडाच्या तोंडाचे आकुंचन होणे (कॉन्ट्राक्‍टेड स्पिंक्‍टर) - 
सडाच्या तोंडाचे आकुंचन होऊन दूध येण्यास त्रास होतो. सडाच्या तोंडावर इजा होणे, विकार आनुवंशिक असू शकतो, अतिरिक्त गाठीची तोंडाशी झालेली वाढ ही या आजाराची कारणे आहेत. 

10) कास दाह -
दूध काढण्याची अयोग्य पद्धतीमुळे कासदाह होतो. धार काढताना दूध सहजासहजी बाहेर येत नाही. सडांवर खूप दाब द्यावा लागतो 
दुधाची धार बारीक येते व सरळ येत नाही. पूर्ण दूध काढण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो. 
उपचार - 
सूज नसेल तर सड स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. सडाचे निर्जंतुकीकरण करावे. सडाच्या तोंडाच्या छिद्रामध्ये टीट प्लग हळुवारपणे आत सरकवावा. पाच ते सहा दिवसांसाठी प्लग तसाच ठेवावा, त्यामुळे तोंडाचे प्रसारण होते. विकार बरा न झाल्यास पशुवैद्यकाकडून शस्त्रक्रिया करून घ्यावी. 

11) सडाचे तोंड मोठे होणे -
सडाच्या तोंडावर तीव्र इजा झाल्याने त्या छिद्राचा आकार मोठा झालेला असतो. त्यामुळे सतत दूध गळत राहते. 
या आजारामुळे सडातून सतत दूध गळत राहते, कासदाह होतो. 
उपचार - 
सडाच्या तोंडाशी लहान आकाराच्या सुईने ल्युगॉल्स आयोडीन टोचले असता सडाच्या तोंडाचे आकुंचन होते. 

12) सडाचे तोंड बंद होणे (ब्लाईड टीट) - 
या आजाराचे कारण आनुवंशिक असू शकते. सडाच्या तोंडावर तीव्र इजा होणे, पैलारू कालवडीमध्ये सडांची वाढ नीट झालेली नसणे या कारणाने हा आजार होतो.
आजाराची लक्षणे म्हणजे अशा सडांवर तोंडाशी छिद्र नसते, सडामध्ये दूध असते मात्र दूध बाहेर येत नाही 
उपचार -
पशुवैद्यकाकडून सुईच्या साह्याने सडास छिद्र करून घ्यावे. जखम बरी होईपर्यंत जखमेवर मलम लावावे. 

... असे आहेत कास, सडांचे आजार -
1) चारपेक्षा जास्त सड असणे, एकमेकांना चिकटलेले सड, जुळलेले सड 
2) सडाच्या बाह्य भागावरील जखमा. 
3) सडांना अनैसर्गिक छिद्र पडणे, फिस्टुला तयार होणे 
4) सडांवर आणि कासेवर चामखिळीसारख्या गाठी वाढणे, सडावरच्या कातडीवर चिरा पडणे 

सडाच्या पोकळीमधील आजार -
1) पोकळीमधील अंतर्गत झालेली गाठीची वाढ 
2) मुतखड्याप्रमाणे दुधाचे खडे तयार होणे 
3) सडाच्या पोकळीमध्ये पडद्याची वाढ होणे 
4) सडांची पोकळी पूर्णतः अथवा अर्धवट बंद होणे 

सडाच्या तोंडाचे आजार - 
1) सडाच्या तोंडाचे आकुंचन पावणे, सडाच्या तोंडाचे छिद्र मोठे होणे 
2) सडाच्या तोंडाचे छिद्र फाटणे, सडाचे तोंड बंद होणे 

संपर्क - डॉ. शाहीर गायकवाड - 9004226664 
(लेखक पशुवैद्यकीय शल्यचिकित्सा विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यक महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

Sunday, January 13, 2013

दुग्ध व्यवसायातील कष्टाने दिली आर्थिक प्रगतीची संधी...

सातारा जिल्ह्यातील मसूर (ता. कऱ्हाड) येथील किशोर जगदाळे यांनी शेतीच्या बरोबरीने दुग्ध व्यवसायातही चांगला जम बसविला आहे. पशू व्यवस्थापनातील बारकावे लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने त्यांनी म्हशींची संख्या वाढवत नेत दुग्ध व्यवसाय किफायतशीर केला आहे. दुग्ध व्यवसायातील त्यांचे अनुभव मार्गदर्शक आहेत. 

सातारा जिल्ह्यातील मसूर (ता. कऱ्हाड) येथील किशोर निवृत्ती जगदाळे सात वर्षांपूर्वी स्थानिक बॅंकेत पिग्मी एजंट म्हणून काम करत होते. यासाठी त्यांना मसूर गावासह कोरेगाव तालुक्‍यातील गावांमध्ये रोजची सुमारे 30 किलोमीटरची फिरती व्हायची. त्यातून महिन्याकाठी चार हजारांचा मोबदला मिळायचा; परंतु स्वतःची शेती विकसित करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. नोकरीच्या फिरतीमधून त्यांना शेतीमधील पीक बदल आणि दुग्ध व्यवसायाची माहिती लोकांकडून मिळत गेली. या माहितीतून त्यांनी सन 2003 पासून वडिलोपार्जित शेतीच्याबरोबरीने टप्प्याटप्प्याने दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. एकाचवेळी 10 ते 15 म्हशी खरेदी न करता पहिल्यांदा एका म्हशीपासून त्यांनी दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. पुढे आर्थिक जोखमीचा अंदाज घेत त्यांनी एकीच्या दोन, दोनच्या चार, चारच्या आठ या सूत्राने गोठ्यात म्हशी वाढविल्या. म्हशींपासून मिळणारे शेण न विकता चांगल्या पद्धतीने शेणखत तयार करून स्वतःच्या शेतीला वापरले, त्यामुळे जमिनीचा कसही सुधारला, त्यामुळे पीक उत्पादनही वाढले. गेल्या सात वर्षांत दुग्ध व्यवसायात प्रगती करताना त्यांनी खपेल एवढ्या दुधाची घरातूनच हातविक्री केली. या दुग्ध व्यवसायातून आता त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्थिरावले आहे. 

टप्प्याटप्प्याने वाढविल्या म्हशी - 
शेती आणि दुग्धोत्पादनाबाबत श्री. जगदाळे म्हणाले, की माझ्याकडे वडिलोपार्जित साडेचार एकर शेती आहे. शेतीच्या बरोबरीने घरी दोन बैल, दोन म्हशी आणि एक गाय होती. त्यामुळे जनावरांच्या व्यवस्थापनाची माहिती होती. शेतीच्या बरोबरीने दुग्ध व्यवसाय करायचा असल्याने भांडवलाचा प्रश्‍न होता. हाती घेतलेला व्यवसाय टिकावा आणि वाढावा या हेतूने सुधारित तंत्रज्ञानाची माहिती घेतली. दुग्ध व्यवसायाला सुरवात करताना मुऱ्हा आणि मेहसाणा जातीच्या दोन म्हशी विकत घेतल्या. त्याबरोबरीने वडिलांनी सांभाळलेल्या म्हशींचेदेखील चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केले. गोठ्यातच रेडक्‍यांचे चांगले नियोजन केले. पुढील टप्प्यात गोठ्यात चांगल्या म्हशी ठेवण्याच्यादृष्टीने भांडवल गोळा करून चार मुऱ्हा म्हशी विकत घेतल्या. जनावरांच्या बाजारात खरेदीचा अनुभव नसल्याने पहिल्यांदा म्हैस खरेदीमध्ये फसवणूक झाली, त्यामुळे दूध उत्पादन घटले; परंतु न डगमगता अभ्यासू पशुपालक, पशुतज्ज्ञ तसेच दै. "ऍग्रोवन'मध्ये आलेल्या पशुपालनासंबंधी लेखांच्या वाचनातून म्हशींचे व्यवस्थापन सुधरविले. या अभ्यासाचा व्यवसायात उपयोग केल्याने पुढे म्हशींची निवड करताना फसगत झाली नाही. म्हैस खरेदीसाठी कोणतेही कर्ज न घेता एकीच्या दोन, दोनच्या चार, चारच्या आठ म्हशींच्या पैदाशीतून गोठ्याचा विस्तार वाढवला. शेती तसेच पशुपालनाचा व्याप वाढल्याने नोकरी सोडून दिली. सध्या माझ्याकडे मुऱ्हा जातीच्या 11, मेहसाणा जातीची एक आणि मुऱ्हा जातीचा संकर केलेल्या तीन म्हशी अशा एकूण 15 म्हशी, चार रेडक्‍या, एक मुऱ्हा जातीचा रेडा आहे. 

म्हशींचे व्यवस्थापन -
म्हशींच्या व्यवस्थापनाबाबत श्री. जगदाळे म्हणाले, की सुरवातीपासून स्वभांडवल उभारणीच्या मूलमंत्राचा उपयोग मला चांगला झाला, त्यामुळे केवळ गोठ्याच्या नूतनीकरणासाठी बॅंकेचे 65 हजारांचे साहाय्य घ्यावे लागले. त्यातून तीन टप्प्यांत गोठा व मजुरांना निवाऱ्याची सोय केली आहे. बॅंकेची नोकरी सोडल्याने मला अडीच लाख रुपये इतका फंड मिळाला, त्यातून ट्रॅक्‍टरची खरेदी केली. वैरणीसाठी कुट्टी मशिन घेतले आहे. गोठ्यातील व्यवस्थापनासाठी दोन मजूर आहेत. गोठ्याची इमारत राहत्या घराइतकी सुसज्ज ठेवली आहे. तीन टप्प्यांत 44 फूट बाय 44 फूट आकाराचा गोठा बांधला आहे. गोठ्यात दोन फूट रुंद आणि तीन फूट उंचीची गव्हाण आहे. गव्हाणीपासून मलमूत्राच्या नाल्यापर्यंत साधारण 14 फुटांचे अंतर राखले आहे. दोन म्हशींतील अंतर पाच फुटांचे राखून दावण केली आहे. 

गोठ्यातील व्यवस्थापन पहाटे साडेचारला सुरू होते. शेण बाजूला केल्यानंतर प्रत्येक म्हशीला वीस किलो ओला व वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी दिली जाते. दूध उत्पादनानुसार म्हशींना पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार पशुखाद्य मिश्रण दिले जाते. रेडकांना वयानुसार चारा व पशुखाद्य देतो. चाऱ्याच्या बरोबरीने गहू भुश्‍श्‍याचा वापर करतो. सकाळी सहा वाजेपर्यंत दूध काढणी पूर्ण होते. त्यानंतर म्हशींना गव्हाणीत पाणी पिण्यासाठी दिले जाते. जनावरांच्या पाण्यासाठी शेतातील विहिरीतून दोन हजार फूट पाइपलाइनने बांधीव टाकीत पाणी सोडले आहे. त्या टाकीतील पाणी योग्य उतार देऊन सायफन पद्धतीने गव्हाणीत सोडले जाते. सकाळी दूध काढल्यानंतर जनावरे व गोठा स्वच्छ केला जातो. दुपारी साडेतीनच्या दरम्यान मजूर गोठा स्वच्छ करतात. चार वाजता ठरलेल्या प्रमाणानुसार चारा व खाद्यमिश्रण दिले जाते. त्यानंतर पाचपर्यंत दूध काढणी पूर्ण होते. 

एका मुऱ्हा म्हशीपासून प्रति दिन सरासरी 12 लिटर, मुऱ्हा संकर असलेल्या एका म्हशीपासून दहा लिटर आणि मेहसाणा म्हशीपासून प्रति दिन 12 लिटर दूध मिळते. म्हशींच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी खासगी पशुवैद्यकाचा सल्ला घेतला जातो. वेळेवर लसीकरण केले जाते, तसेच योग्यवेळीच रेतन केले जाते. 

सद्य:स्थितीत प्रति दिन सरासरी 100 ते 120 लिटर दूध उत्पादन होते. त्यापैकी खपेल एवढ्या दुधाची घरातूनच हातविक्री होते. दुधाची गुणवत्ता चांगली असल्याने रतीब आणि ठरलेली गिऱ्हाईके घरी येऊन दूध खरेदी करतात. हातविक्रीच्या दुधातून नफ्याची अपेक्षा न ठेवता बाजारभावापेक्षा दोन रुपये कमी दराने विक्रीचे धोरण ठेवले आहे, त्यामुळे दुधाला चांगली मागणी असते. सध्या प्रति दिन 40 लिटर दुधाची हातविक्री होते. दुधाच्या हातविक्रीचे काम पत्नी सौ. वंदना, मुले श्‍वेता व शुभम पाहतात. हातविक्रीतून उरलेले दूध गावातील खासगी डेअरीस दिले जाते. डेअरीमध्ये फॅटच्या हिशेबाने दर मिळत असल्याने चांगला नफा मिळतो. शेतातील व्यवस्थापनासाठी वडिलांची मदत होते. 

चाऱ्याचे नियोजन - 
साडेचार एकरांपैकी गोठा, वैरण ठेवण्यासाठी आणि दळणवळणासाठी 10 गुंठे जागा ठेवली आहे. उरलेल्या क्षेत्रात उसाबरोबर सोयाबीन, भुईमूग, चारापिकांची लागवड केली जाते. चाराटंचाईच्या काळात काही गुंठ्यांतील उसाचा वापर चाऱ्यासाठी केला जातो. काही वेळेस चाऱ्यासाठी ऊस विकत घेतला जातो. परिसरातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन आणि गव्हाचे सुमारे 25 ट्रेलर भुसकट गोळा करून ठेवले आहे. गरजेनुसार कडबा विकत घेतला जातो. जवळच्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर सुमारे सहा महिने दररोज साधारण पाचशे रुपयांचे ऊसवाढे चाराकुट्टीसाठी विकत घेतले जातात. म्हशींना चारा कुट्टी करून दिला जातो. 

गेल्या सात वर्षांत दूध व्यवसायातून श्री. जगदाळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळाले. दिवसेंदिवस वाढलेले खतांचे दर व मजुरीवर मात करीत त्यांनी स्वकष्टातून शेती समृद्ध करण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे. स्वतःच्या शेतीबरोबर दुसऱ्याची दोन एकर शेती त्यांनी निम्म्या हिश्‍श्‍याने कसण्यास घेतली आहे. या वर्षी त्यांनी दीड एकरावर हळदीची लागवड केली आहे. सव्वा दोन एकर ऊस लागवडीतून 125 टन उत्पादन मिळते. गोठ्यामुळे त्यांच्याकडे शेणखत मोठ्या प्रमाणात तयार होते; परंतु या शेणखताची त्यांनी आतापर्यंत एकदाही विक्री केलेली नाही. सर्व शेणखत ते स्वतःच्या शेतीसाठी वापरतात. यामुळे जमिनीचा पोत सुधारून पीक उत्पादन वाढले आहे. 

श्री. जगदाळे यांची दुग्ध व्यवसायातील उलाढाल.... 
जून 2011 ते डिसेंबरअखेरची मिळकत ः 
1) 8400 लिटर दुधाच्या हातविक्रीतून ः दोन लाख 68 हजार 800 रुपये (दर प्रति लिटर 32 रुपये). 
2) डेअरीला 14 हजार 700 लिटर दुधाच्या विक्रीतून ः चार लाख 11 हजार 600 रुपये (दर प्रति लिटर सरासरी 28 रुपये). 
3) आतापर्यंत एकूण व्यवस्थापन खर्च ः तीन लाख 83 हजार 400 रुपये (प्रति दिन सरासरी 1800 रुपये). 

संपर्क - श्री. जगदाळे - 9850813601

रेडकू संगोपनातून शाश्‍वत केला दुग्ध व्यवसाय

कोल्हापूर जिल्ह्यातील तिटवे (ता. राधानगरी) येथील सागर किल्लेदार यांना शेती आणि दुग्ध व्यवसायाची आवड असल्याने शिक्षणानंतर थेट शेतीमध्ये लक्ष घातले. योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी दुग्ध व्यवसायात स्वतःचे वेगळेपण जपले आहे. रेडकांच्या संगोपनातूच दुग्ध व्यवसायातील नफ्याचे गणित वाढविता येते असा त्यांचा अनुभव आहे. 
राजेंद्र घोरपडे 

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीच्या बरोबरीने दुग्ध व्ववसायातही स्वतःचे वेगळेपण जपले आहे. कारण दुधाच्या रतीबातून आर्थिक चक्र सुरू राहात. अशा या शेतकऱ्यांपैकीच एक आहेत सागर किल्लेदार. टप्प्याटप्प्याने अभ्यासातून त्यांनी दुग्ध व्यवसाय वाढविला आहे. दुग्ध व्यवसायातील खाचाखोचा समजावून घेण्यासाठी राज्यभरातील पशुपालक त्यांच्याकडे प्रशिक्षणाला येतात. 

राधानगरी तालुक्‍यातील तिटवे गावात सागर किल्लेदार यांची शेती आहे. या शेतीबाबत माहिती देताना श्री. किल्लेदार म्हणाले, की आमचे एकत्र 30 जणांचे कुटुंब आहे. संपूर्ण कुटुंबाची 48 एकर शेती असून त्याचे तीन भाग आहेत. पहिल्या भागात उसाची लागवड, दुसऱ्या भागात जनावरांसाठी वर्षभर चारा उपलब्धतेसाठी विविध चारा पिकांची लागवड आणि तिसऱ्या टप्प्यात भाजीपाला लागवड असते. दुग्ध व्यवसाय माझ्याबरोबरीने पत्नी वंदना, बंधू जितेंद्र आणि त्यांची पत्नी नंदा यांचा सहभाग आहे

केवळ उसाच्या उत्पादनात समाधानी न राहता पूरक व्यवसायाच्यादृष्टीने मी विचार सुरू केला. परिसरातील शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांशी चर्चा करून पशुपालनाच्या दिशेने नियोजन सुरू केले. पहिल्यांदा 20 गावठी म्हशींच्या संगोपनातून दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. पहिल्यांदा पारंपरिक पद्धतीनेच इतर शेतकऱ्यांसारखे म्हशींचे संगोपन ठेवले होते. त्यामुळे अवघे 20 लिटरच दुधाचे उत्पादन मिळत होते. दुधाचे उत्पादन आणि व्यवस्थापनाच्या खर्चाचा ताळेबंद बसत नव्हता. त्यामुळे दुग्ध व्यवसायातील व्यवस्थापनात बदल करायचे ठरविले. त्यासाठी पुन्हा प्रयोगशील पशुपालक तसेच गोकुळ दूध संघांच्या तज्ज्ञांशी चर्चा केली. याच दरम्यान 2005 मध्ये उत्तर प्रदेशातील सलोन येथील पशू प्रजनन केंद्रामध्ये प्रशिक्षणाची संधी मिळाली. तेथील जनावरांच्या व्यवस्थापनातील सुधारित तंत्र समजले आणि व्यवसायाची दिशाच बदलली. गावी आल्यावर गावठी म्हशी विकून मुऱ्हा जातीच्या म्हशीचे संगोपन सुरू केले. जिंद (हरियाना) येथून जातिवंत तीन मुऱ्हा म्हशी आणून सुरवात केली. पुढे 18, त्यानंतर 32 म्हशी वाढविल्या आता गोठ्यात 40 मुऱ्हा म्हशी आहेत. तसेच गाभ गेलेल्या 35 रेड्या आणि व्यायला झालेल्या 11 रेड्या आहेत. योग्य व्यवस्थापन असेल तर निश्‍चितपणे मुऱ्हा म्हशी एक वेतात साधारणपणे दोन हजार लिटर ते अडीच हजार लिटर दूध देतात. सन 2009 मध्ये गोकुळ दूध संघातील तज्ज्ञ पी. आर. पाटील, व्ही. डी. पाटील, प्रशांत पाटील यांच्यासमवेत लुधियाना, सुरतगड, हिस्सार, कर्नाल, इज्जतनगर येथील संशोधन केंद्रांना भेटी देऊन पशुसंवर्धनातील नवीन तंत्रज्ञान जाणून घेतले. पशुपालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे गोठ्यातच जातिवंत म्हैस सांभाळून पुढे रेडकांचे योग्य व्यवस्थापन केले तरच हा व्यवसाय फायदेशीर ठरतो. रेडकांचे संगोपन हा व्यवसायाचा मूळ गाभा आहे. जातिवंत म्हैस, पाणी व्यवस्थापन, वैरण आणि पशुखाद्य नियोजन, वेळेवर जंतनिर्मूलन, खनिज मिश्रण, वेळोवेळी लसीकरण, कृत्रिम रेतन आणि रेडकांचे संगोपन ही दुग्ध व्यवसायातील महत्त्वाची सूत्रे आहेत. 

...असे आहे वासरांचे संगोपन 
आज पशुपालक केवळ दूध देणाऱ्या गाई, म्हशीकडे लक्ष देतो. खरे तर गाभण म्हैस त्याचबरोबरीने जन्मलेल्या रेडकाचेही खाद्य व्यवस्थापन महत्त्वाचे असते. या व्यवस्थापनावरच पुढील काळातील दूध उत्पादनाचे गणित अवलंबून असते. रेडकांच्या संगोपनाबाबत श्री. किल्लेदार सांगतात, की गाभण म्हशीला योग्य प्रमाणात हिरवा आणि सुकलेला चारा दिला पाहिजे, त्यामध्ये एकदल आणि द्विदल चाऱ्याचे संतुलन हवे. तसेच शरीराच्या वाढीसाठी खनिज मिश्रण, पशुखाद्याचाही योग्य पुरवठा हवा. कारण गाभण काळात शेवटचे तीन महिने रेडकाच्या वाढीसाठी महत्त्वाचे असतात. केवळ उसाचे वाढे आणि सुक्‍या वैरणीवर म्हशीचे योग्य पोषण होत नाही. म्हैस विल्यानंतर रेडकाला स्वच्छ करावे, त्याच्या शरीरावरून हात फिरवावा, म्हणजे त्याचे रक्ताभिसरण चांगले होते. महत्त्वाचे म्हणजे अर्ध्या तासाच्या आत रेडकाला सव्वा लिटर चीक पाजलाच पाहिजे. अर्ध्या तासानंतर पाजलेला चीक वासराला पचत नाही. दिवसभरात रेडकाच्या वजनाच्या दहा टक्के चीक तीन वेळा विभागून पाजावा. त्यातूनच वासराची पचनसंस्था सुरळीत राहते. रेडकू जन्मताच अर्ध्या तासाच्या काळात नाळ दोन इंचाने कापून एका इंचावर बांधली जाते आणि त्या ठिकाणी जंतुनाशक लावले जाते. पुढील दिवसात दुधात काही प्रमाणात पाणी मिसळून देतो. परंतु ते पचते की नाही हे पाहावे लागते. रेडकास अकराव्या दिवसापासून मिल्क रिप्लेसर, काफ स्टार्टर सुरू करतो. याचे प्रमाणदेखील रेडकाच्या पचनशक्तीवर ठरवावे. सहा महिन्यांपर्यंत मिल्क रिप्लेसर तर एक वर्षापर्यंत काफ स्टार्टर देण्यात येते. पंधरा ते वीस दिवसांनंतर वजनाच्या प्रमाणात वैरण दिली जाते. चौथ्या महिन्यापासून खनिज मिश्रण देण्यास सुरवात होते आणि एक वर्षानंतर पशुखाद्य सुरू करतो. वाढीच्या काळात सकस हिरवा चारा आणि सुकी वैरण दिली जाते. मिल्क रिप्लेसर, काफ स्टार्टर खनिज मिश्रण आणि पशुखाद्य देताना पशुतज्ज्ञांचा सल्ला आणि आपले व्यवस्थापन हे फार महत्त्वाचे आहे. 

साधारणपणे माझ्याकडे 25 ते 35 महिन्यांच्या काळात रेडी गाभ जाते. जनावरांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी वर्षातून किमान दोन वेळा सर्व म्हशींना जंतनाशक दिले जाते. वेळोवेळी पशू तज्ज्ञांकडून म्हशी, रेडकांची तपासणी आणि वेळापत्रकाप्रमाणे लसीकरणही केले जाते. यामुळे आरोग्य चांगले राहते. कुपोषित म्हशी पुढे गाभण राहण्यात अडचण येते. तेथून पुढे नुकसान होते. 

रेडकांसाठी स्वतंत्र गोठा 
श्री. किल्लेदार यांनी रेडकांच्या संगोपनासाठी स्वतंत्र गोठे तयार केले आहेत. पहिल्या गोठ्यात एक ते तीन महिन्यांच्या रेडकांचे संगोपन होते. दुसऱ्या गोठ्यात तीन ते एक वर्षापर्यंतच्या रेडकांचे संगोपन होते. तिसऱ्या गोठ्यात जी वासरे अशक्‍त आहेत, ज्यांची वाढ कमी आहे, अशा रेडकांचे स्वतंत्र संगोपन केले जाते. रेडकांना फिरण्यासाठी मुक्त संचार गोठा स्वतंत्र बांधण्यात आला आहे. 18 ते 30 महिन्यांपर्यंतची रेडके एका वेगळ्या जागेत मुक्त संचारासाठी सोडण्यात येतात. मुक्त गोठ्यात सोडलेल्या रेडकांचे वजन गोठ्यात बांधून असलेल्या रेडकांपेक्षा दररोज 200 ग्रॅमने वाढलेले दिसून आले आहे. सन 2005 पासून श्री. किल्लेदार रेडकांचे संगोपन करीत आहेत. त्यातून त्यांनी गोठ्यात 70 रेड्या तयार केल्या आहेत. व्यवस्थापनापूर्वी मरतूक जवळपास 40 टक्के होती. पण आता एक टक्काही मरतूक नाही. साधारणपणे 28 ते 38 किलो वजनाच्या रेडकाची पैदास चांगली होते. दररोज किमान 200 ग्रॅमपर्यंत वजन वाढते. पूर्वी रेड्या लवकर माजावर येत नव्हती. आता 26 ते 30 महिन्यांत गाभ राहतात. 

...असे आहे चाऱ्याचे नियोजन 
म्हशींची संख्या मोठी असल्याने श्री. किल्लेदार यांनी बारा एकरावर चारा पिकांची लागवड केली आहे. यामध्ये 
मका (तीन एकर), ज्वारी (पाच एकर), बाजरा (1.5 एकर), लुसर्न गवत (एक एकर), बरसीम (एक एकर) अशी लागवड आहे. त्यामुळे वर्षभर हिरव्या गवताची उपलब्धता राहते. एका म्हशीला दररोज चार ते पाच किलो सुकी वैरण आणि 20 ते 25 किलो ओली वैरण दिली जाते. यामध्ये मका, कडवळ, बाजरी, मारवेल 14 ते 17 किलो आणि लुसर्न, बरसीम, चवळी चारा सहा ते आठ किलो असे प्रमाण ठेवले जाते. पशुखाद्य शरीर पोषणास एक किलो आणि एक लिटर दुधास 350 ते 400 ग्रॅम दिले जाते. खनिज मिश्रण किमान 50 ते 60 ग्रॅम दिले जाते. खनिज मिश्रण आणि पशुखाद्य हे पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच द्यावे. त्यामुळे अतिरिक्त खर्च होणार नाही. 

जनावरांच्या खाद्यात हिंग, जिरे, ओवा, सुंठ, गूळ, धन्याचाही योग्य प्रमाणात वापर केला जातो. दररोज जनावरांना पुरेसे स्वच्छ पाणी पुरविणे आवश्‍यक आहे. जनावरांना चारा कुट्टी करून दिला जातो. 

गोठा व्यवस्थापन 
श्री. किल्लेदार यांनी एकूण चार गोठे बांधले आहेत. दहा गुंठ्यांमध्ये दोन गोठे मुक्त निवारा पद्धतीचे आहेत. तर पाच गुंठ्यांवर बंदिस्त दोन गोठे बांधण्यात आले आहेत. गोठ्यामध्ये योग्य आकाराची गव्हाण आहे. दररोज साफसफाई केली जाते. त्यामुळे जनावरे स्वच्छ राहतात. मुक्त संचार गोठ्याबाबत श्री. किल्लेदार म्हणाले, की या पद्धतीमुळे म्हशी तसेच रेडकांना चांगला व्यायाम मिळतो. फिरल्यामुळे पायांना सूज येत नाही. ताण कमी होतो. म्हशी गरजेनुसार चारा खातात, पाणी पितात. शांतपणे बसून रवंथ करीत राहते. यामुळे दूध उत्पादनात वाढ होतो. कासदाह, गोचिडांचा त्रास, खुरांच्या जखमा होत नाहीत. 
म्हशींना अंग घासण्याची सवय असते. यासाठी गोठ्यात दोन खांब उभे केले आहेत. त्या खांबांना म्हशी अंग घासतात. त्यामुळे त्यांच्या शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहण्यास मदत होते. एका वेतामध्ये एक म्हैस साधारण दोन हजार ते 2500 लिटर दूध देते. दुधाच्या 40 टक्के पशुखाद्य लागते. साधारणपणे 100 रुपयांच्या दूध विक्रीत 40 रुपये वैरणीचा खर्च होतो. बाकीचा सर्व नफा राहतो. 
गोठ्यात उपलब्ध झालेल्या शेणाचा वापर दोन गोबर गॅससाठी केला जातो. गोबर गॅसमधून बाहेर पडणारी स्लरी थेट शेतात सोडण्यात येते. त्याचा पीकवाढीसाठी फायदा झाला आहे. 

किल्लेदारांचा गोठा हे प्रशिक्षण केंद्र 
सन 2009 मध्ये श्री. किल्लेदार यांनी गोकुळ दूध संघाच्या सहकार्याने प्रशिक्षण केंद्र सुरू केले. प्रत्यक्ष गोठ्यातच एका शेतकऱ्याने, शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या भाषेत समजावून सांगणारे प्रशिक्षण केंद्र म्हणून आज किल्लेदारांच्या गोठ्याची ख्याती आहे. या ठिकाणी गोठा व्यवस्थापन, जनावरांचे व्यवस्थापन, वैरण व पशुखाद्य व्यवस्थापन, वासरू संगोपन, मुक्त निवारा पद्धती, वैरण कुट्टी यंत्र, सायलेज (मूरघास) माहिती, धार काढण्याचे यंत्राबाबत माहिती दिली जाते. आदर्श गोठा व्यवस्थापन मार्गदर्शन हा दोन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत 42 हजार पशुपालकांनी श्री. किल्लेदार यांच्याकडे पशुपालनाचे धडे गिरविले आहेत

समजून घ्या जनावरांमधील ऋतुचक्राचे टप्पे

गाय, म्हैस, शेळीच्या मासिक ऋतुचक्राचे इस्ट्रस, मेटॅइस्ट्रस, डायइस्ट्रस, प्रोइस्ट्रस असे चार टप्पे पडतात. त्याप्रमाणे जनावरांच्या शरीरात बदल होऊन लक्षणे दिसून येतात. ती लक्षात घेऊन, त्यानुसार जनावरांचा माज ओळखून माजावरील जनावरांना वळू दाखविणे, प्राथमिक व्यवस्थापनामध्ये हिरवा चाऱ्याचे नियोजन, वैरण, पाणी, वेताच्या वेळी घ्यावयाची काळजी याबाबत दक्ष राहणे आवश्‍यक आहे.
डॉ. मंजूषा पाटील (हासे), डॉ. पंकज हासे 

दूध उद्योग किफायतशीर होण्यासाठी आपली दुभती जनावरे नियमितपणे माजावर येऊन गाभण राहायला हवीत, तसेच वेळच्या वेळी व्यायला हवीत. गाई-म्हशी व्याल्यानंतर 90 ते 120 दिवसांत त्या माजावर येऊन, भरवून गाभण राहिल्या पाहिजेत. याहून जितका विलंब लागेल तितका अनुत्पादन, भाकड काळात गाई - म्हशींच्या पालन - पोषणाचा आणि पर्यायाने दूध उत्पादनाचा खर्च वाढतो. दूध व्यवसायातील नफा अशा दीर्घकाळ भाकड राहणाऱ्या गाई - म्हशीच खाऊन टाकतात. या विलंबाची सुमारे चाळीस टक्के जबाबदारी माज बरोबर न ओळखणे या एकाच कारणाकडे असते. वर्षाकाठी एक वासरू मिळालेच पाहिजे यासाठी प्राथमिक व्यवस्थापनामध्ये जनावरांचा हिरवा चारा, वैरण, पाणी, दुभत्या व भाकड जनावरांचे प्रमाण, वेताच्या वेळी घ्यावयाची काळजी, जनावरांचा माज ओळखणे, माजावरील जनावरांना वळू दाखविणे, त्या फळल्यावर दोन ते अडीच महिन्यांत त्या गाभण नसतील तर कारणमीमांसा करून, उपाय करून, त्या फळवून घेणे इत्यादी गोष्टींचा समावेश असावा. जनावरांचे ऋतुचक्र 
गाय, म्हैस, शेळीच्या मासिक पाळीचे ऋतुचक्राचे चार टप्पे पडतात. त्याप्रमाणे जनावरांच्या शरीरात बदल होऊन लक्षणे दिसून येतात. 
1) इस्ट्रस, 2) मेटॅइस्ट्रस, 3) डायइस्ट्रस, 4) प्रोइस्ट्रस 

1) इस्ट्रस - 
गाई - म्हशींकडे पुरेसे आणि फारसे बारकाईने लक्ष न देणे आणि माजाच्या लक्षणांची तपशीलवार माहिती नसणे यामुळे त्या माजावर आल्याचे लक्षात येत नाही. याकरिता गाय किंवा म्हैस माजावर आल्यावर नुसत्या निरीक्षणाने ती ओळखण्याची काही सोपी लक्षणे पुढीलप्रमाणे ः 
1) गाय अथवा म्हैस माजावर आल्यावर जास्त उत्तेजित असल्यामुळे त्यांचे खाण्या-पिण्यावरील लक्ष उडते व भूक मंदावते. 2) जनावर गोठ्यामध्ये शांत बसून रवंथ करण्याऐवजी जास्त वेळ उभे राहण्यास बघते. 3) वारंवार लघवी करण्याची भावना दिसून येते; परंतु थोडी थोडी लघवी सारखी केली जाते. 4) दूध उत्पादनात तात्पुरती घट दिसून येते. 5) माजावर आलेल्या गाई वारंवार विशिष्ट स्वरात हंबरतात. 6) माजावरील गाई अस्वस्थ असतात, इतर गाई उभ्या असतील, तर त्या सैरावैरा फिरतात. 7) शेपूट वारंवार वरती करतात. 8) पाठीचा कणा थोडासा बाकदार होतो. 9) बाह्य योनीमार्गातील पांढरा भाग लालसर गुलाबी, लक्षात येण्याजोगा झालेला दिसतो. 10) योनीमार्गातून अंड्यातील पांढऱ्या बलकासारखा चिकट स्राव लोंबतो, जो पाण्यासारखा स्वच्छ दिसतो; परंतु घट्ट व चिकट असल्याने शेपटी, पृष्ठभाग माखवतो; तसेच योनीमार्गाबाहेर तारेप्रमाणे लोंबतो. हा स्राव वासरहित, चिकट व स्वच्छ असावा; तो पांढरट, तांबूस किंवा पूसारखा नसावा, तसा असल्यास पशुवैद्यकाकडून तपासून घ्यावा. 12) माजावर आलेले जनावर कळपातील इतर गाई स्वतःवर उडत असताना स्तब्ध राहते. 

2) मेटॅइस्ट्रस  
हा काळ गाईच्या माजाच्या काळानंतर तीन ते चार दिवसांचा असतो. या काळात इस्ट्रोजन संप्रेरकाची पातळी कमी होऊन कॉर्पस ल्युटेयम हा नियंत्रक वाढीस लागतो. या कालवडीमध्ये 50 टक्के गाईंमध्ये योनीमार्गातून थोडा लालसर, रक्तमिश्रित पातळ स्राव वाहताना दिसतो. यामध्ये दोन ते चार दिवस अगोदर गाय माजावर येऊन गेलेली असते, म्हणजे मागील पाळीनंतर 16 ते 19 दिवसांनी गाय माजावर आलेली असते. 

3) डायइस्ट्रस हा काळ गाईमध्ये 12 ते 15 दिवसांचा असू शकतो. या काळात सुरवातीला कॉर्पस ल्युटेयमच्या वाढीस सुरवात होऊन प्रोजेस्टेरॉन हा संप्रेरक वाहत असतो. त्याचबरोबर शेवटच्या काळात कमी होतो. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पाहिल्यास कॉर्पस ल्युटेयममध्ये फारसा बदल दिसत नाही. 

4) प्रोइस्ट्रस या काळात प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांबरोबर कॉर्पस ल्युटेयम कमी झालेला असतो. या काळात बीजांडातून रक्तप्रवाह जोराने वाहायला लागतो. डिंबकोशाची झपाट्याने वाढ होत असते, हा काळ एक ते तीन दिवसांचा असून, माजाच्या काळात एफ एस व एल या संप्रेरकामुळे शरीरात अनेक बदल घडत असतात. सुरवातीला एखाद-दुसरा डिंबकोश वाढलेला दिसतो. त्याचा व्यास 16 एम.एम.पर्यंत असू शकतो. पुढे त्यापैकी एखादा पूर्ण वाढतो, या वेळी या कोशाचा व्यास 20 एम.एम.पर्यंत वाढलेला दिसतो. माजाच्या शेवटी 10 ते 14 तासांनंतर डिंबकोशाचे पातळ आवरण फुटून त्यातून डिंबपेशी बाहेर पडते. ही डिंबपेशी नरसाळ्यासारख्या बीजांडावरील बीजधारकेतून बीजवाहक नलिकेत सरकत येते. त्या ठिकाणी शुक्राणूशी मिलन झाल्यास फलधारणा होते. तेथे शुक्राणू उपस्थित नसल्यास संप्रेरकास स्रावाबरोबर डिंबपेशी योनीमार्गातून बाहेर फेकली जाते, अशा तऱ्हेने 20 ते 21 दिवसांचे गाईचे एक ऋतुचक्र पूर्ण होते. 

माज ओळखण्याच्या पद्धती 
1) दररोज सकाळी व सायंकाळी जनावरांचे निरीक्षण केल्यास माजावर आलेली जनावरे लक्षात येतात. 
2) नसबंदीत वळूचा वापरही आपण माजावर असलेल्या गाई शोधण्यासाठी करू शकतो. माजावर असलेल्या जनावरांच्या जननेंद्रियात काही रसायने निर्माण होतात, जी फक्त वळूच ओळखू शकतो व वळू माजावर असलेल्या जनावरांकडे आकर्षिला जातो. प्रक्षेत्रावर किंवा जिथे जनावरांची संख्या अधिक आहे, अशा ठिकाणी या पद्धतीचा वापर जास्त प्रमाणात होतो. 3) शेपटीच्या वरच्या बाजूस रंग लावल्यास अशा गाई इतर गाई उडाल्यास रंग पसरतो व त्यामुळे माजावर असलेली गाय ओळखण्यास मदत होते. 4) संप्रेरके देऊन तयार केलेली गायसुद्धा नसबंदीत वळूऐवजी माज ओळखण्यासाठी वापरली जाऊ शकते. 5) प्रशिक्षित कुत्र्यांचा वापरही जनावरांतील माज ओळखण्यासाठी केला जातो. 6) निरणातील विद्युतरोध जर मोजला, तर जनावरे माजावर आल्याचे समजते. आधुनिक प्रगत विज्ञानाने हा शोध लावला आहे. निरणातील विद्युतरोध हा माजाच्या इतर वेळीपेक्षा कमी असतो, असे दिसून आले आहे. 7) संप्रेरकांच्या चाचणीतून दूध परीक्षणाद्वारे जनावरांचा माज ओळखता येतो. 8) माजावर असलेले जनावर मानसिकरीत्या अस्वस्थ असते, त्यामुळे त्यांच्या पावलांच्या हालचाली वाढत असतात. त्यांच्या नोंदीवरून आपण जनावरांतील माज ओळखू शकतो. अशा प्रकारे जनावर माजावर असल्याची खात्री एकदा पटल्यास सकाळी माजावर आलेली जनावरे सायंकाळी व सायंकाळी माजावर आलेली जनावरे दुसऱ्या दिवशी सकाळी सिद्ध वळूकडून अथवा कृत्रिम रेतन पद्धतीनेच भरवावी, म्हणजे ती गाभण राहण्याची शक्‍यता वाढते. असे केल्यास वर्षाकाठी एक वासरू मिळू शकते.