Sunday, January 13, 2013

दूध व्यवसायाने दिले आर्थिक स्थैर्य

सांगली जिल्ह्यातील बोरगाव (ता. वाळवा) येथील संभाजी जगन्नाथ कोळेकर यांनी शेती नसूनही जिद्दीने दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. श्री. कोळेकर यांनी गाईंच्या व्यवस्थापनासाठी सुधारित गोठा बांधला आहेच, त्याचबरोबरीने दूध काढण्यासाठी यंत्राचा वापर त्यांनी सुरू केला आहे. नव्याने सुरू करणाऱ्या दूध व्यावसायिकांसाठी त्यांचा हा प्रयत्न निश्‍चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.

सांगली जिल्ह्यातील बोरगाव (ता. वाळवा) हा तसा बागायती पट्टा. ऊस आणि दुग्ध व्यवसायाची चांगली भरभराट या भागात झाली आहे. अनेक पट्टीचे ऊस उत्पादक या तालुका परिसरात पाहण्यास मिळतात. संभाजी कोळेकर हे बोरगाव येथील राहणारे. त्यांच्या कुटुंबीयांकडे स्वतःची शेती नसल्याने रोजची शेतमजुरी ही ठरलेली. नाही म्हणायला घरच्या दोन म्हशी होत्या. साहजिकच श्री. कोळेकर यांच्या मनात जनावरांच्या संगोपनाची आवड निर्माण झाली होतीच. त्यामुळे दहावीचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी दुग्ध व्यवसायाकडे लक्ष देण्यास सुरवात केली.
याविषयी आपले अनुभव सांगताना श्री. कोळेकर म्हणाले, की साधारणपणे सन 2005 पासून मी प्रथम दोन म्हशी आणि एका गाईपासून दूध व्यवसायाला सुरवात केली. इतर शेतकऱ्यांचे अनुभव तसेच पशुवैद्यकांचा सल्ला आणि स्वतःचे कष्ट यातून त्यातील बारकावे समजत गेले. त्यानंतर गावातील अहिल्यादेवी दूध संस्थेच्या सहकार्याने होल्स्टीन फ्रिजियन जातीच्या तीन गाईंची खरेदी केली. योग्य व्यवस्थापन आणि घरच्यांची साथ मिळाल्याने चांगला फायदा मिळण्यास सुरवात झाली. त्यामुळे होणाऱ्या नफ्यातून व्यवसाय वाढविण्याच्यादृष्टीने राजारामबापू दूध उत्पादक संघाच्या योजनेतून सांगोला आणि बंगळूर येथून होल्स्टीन फ्रिजियन गाईंची खरेदी केली. सध्या माझ्याकडे बारा होल्स्टीन फ्रिजियन गाई आहेत. 

सुधारित गोठा :
गाईंची संख्या वाढल्याने श्री. कोळेकर यांनी सुधारित गोठा बांधला. गोठा बांधण्यापूर्वी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील प्रयोगशील दुग्ध व्यावसायिकांच्या गोठ्याला भेटी देऊन त्यांनी रचना समजून घेऊन बारा गाई आणि त्यांच्या वासरांच्या व्यवस्थापनाच्यादृष्टीने गोठा बांधला. कायम स्वरूपी पाणीपुरवठ्याच्यादृष्टीने एक कूपनलिका घेतली आहे. कूपनलिकेचे पाणी टाकीत साठवून गोठ्यात पोचवले जाते. गोठ्याच्या रचनेबाबत श्री. कोळेकर म्हणाले, की डोक्‍याकडे डोके या पद्धतीने गोठ्याची रचना केली आहे. त्यामुळे गाईंना खाद्य देणे सोपे जाते. गव्हाणी पुरेशा उंचीच्या केल्या आहेत. त्यामुळे गाईंना चारा आणि पाणी योग्य पद्धतीने देता येते. तसेच शेण, मूत्र गोळा करणेही सोपे जाते. गोठा योग्य पद्धतीने साफ करता येतो. गोठ्यामध्ये गाईंना बसताना, उठताना पायाला, सडाला जखमा होण्याची शक्‍यता असते, काही वेळा पाय सुजतात. यावर उपाय म्हणून रबरी मॅट गाईंना बसण्यासाठी टाकल्या आहेत. त्यामुळे गाईंच्या पायाला आराम मिळतो. गाई गोठ्यात घसरत नाहीत. पुरेशा पाणी व्यवस्थापनासाठी टाकी बांधली आहे. संकरित गाईंना उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा त्रास होतो, त्यामुळे दूध उत्पादनावर त्याचा परिणाम लगेच होतो. त्यामुळे वरचेवर त्यांना थंड पाण्याने धुवावे लागते. हे लक्षात घेऊन गोठ्यामध्ये प्रत्येक गाईवर पुरेसे पाणी फवारले जाईल या पद्धतीने तुषार सिंचन यंत्रणा बसविली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत रोज दुपारी एक, दोन तास हा संच सुरू ठेवला जातो. त्यामुळे गोठ्यातील तापमान थंड राहते. गोठा बांधणी आणि उपाययोजनांसाठी सुमारे दीड लाख खर्च झाला आहे.

चाऱ्याचे नियोजन :
श्री. कोळेकर यांची स्वतःची जमीन नसल्याने जनावरांसाठीचा चारा विकतच घ्यावा लागतो. यासाठी ते परिसरातील शेतकऱ्यांकडून वैरणीसाठी उभा ऊस गुंठ्याच्या हिशेबाने विकत घेतात. यासाठी शेतकऱ्यांना गुंठ्याला 1500 ते 2000 रुपये द्यावे लागतात. साखर कारखाना सुरू झाला, की ते ऊस तोडणी कामगारांकडून वाढे विकत घेतात. गेल्या वर्षी मात्र त्यांनी वीस गुंठे जमीन विकत घेऊन त्यामध्ये हत्ती गवताची लागवड केली आहे. ही लागवड टप्प्याटप्प्याने केली असल्याने वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होत आहे. उसाचे वाढे आणि हत्ती गवत योग्य प्रमाणात दररोज सकाळी सहा वाजता आणि दुपारी चार वाजता गाईंना दिले जाते. 

चाऱ्याच्या बरोबरीने गाईच्या दुधाच्या प्रमाणानुसार गोळी खाद्य, सरकी पेंड, गहू भुसा, मक्‍याचा भुसा तसेच खनिज मिश्रण दिले जाते. सरासरी सकाळ -संध्याकाळ धरून रोज सहा ते आठ किलो खाद्य मिश्रण दिले जाते. खाद्य स्वतः खरेदी करत असल्याने गुणवत्ता राखली जाते. दूध उत्पादन, गाईचे वय हे लक्षात घेऊन योग्य पद्धतीने चारा आणि खाद्य मिश्रण देणे गरजेचे आहे, असे श्री. कोळेकर सांगतात. 

दूध उत्पादन :
सध्या 12 पैकी सात गाई दुधावर आहेत. या गाईंच्या दूध उत्पादनाबाबत श्री. कोळेकर म्हणाले, की एका होल्स्टीन फ्रिजियन गाईंपासून दररोज 25 लिटर दूध मिळते. सकाळी आठ वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता धार काढली जाते. पूर्वी घरातील चौघेही सदस्य धार काढायचो, यासाठी सव्वा तास वेळ जायचा. त्यामुळे आता दूध काढणी यंत्र घेतले आहे. या यंत्रामुळे एकावेळी दोन गाईंचे दूध काढता येते. सर्व गाईंची दूध काढणी अर्ध्या तासात पूर्ण होते. यंत्राच्या वापराने एकच व्यक्ती दूध काढण्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळे आई, वडील आणि भाऊ शेतीच्या कामाला मोकळे होतात. दररोज 160 लिटर दूध डेअरीला घातले जाते. वर्षभर दूध उत्पादनात सातत्य राहण्यासाठी गाईंच्या रेतनाचे नियोजन पशुवैद्यकाच्या सल्ल्याने केले आहे. त्यामुळे दूध उत्पादनाची सरासरी राखता येते. 
-  संभाजी कोळेकर, 9730711935

No comments:

Post a Comment