Sunday, January 13, 2013

रेडकू संगोपनातून शाश्‍वत केला दुग्ध व्यवसाय

कोल्हापूर जिल्ह्यातील तिटवे (ता. राधानगरी) येथील सागर किल्लेदार यांना शेती आणि दुग्ध व्यवसायाची आवड असल्याने शिक्षणानंतर थेट शेतीमध्ये लक्ष घातले. योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी दुग्ध व्यवसायात स्वतःचे वेगळेपण जपले आहे. रेडकांच्या संगोपनातूच दुग्ध व्यवसायातील नफ्याचे गणित वाढविता येते असा त्यांचा अनुभव आहे. 
राजेंद्र घोरपडे 

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीच्या बरोबरीने दुग्ध व्ववसायातही स्वतःचे वेगळेपण जपले आहे. कारण दुधाच्या रतीबातून आर्थिक चक्र सुरू राहात. अशा या शेतकऱ्यांपैकीच एक आहेत सागर किल्लेदार. टप्प्याटप्प्याने अभ्यासातून त्यांनी दुग्ध व्यवसाय वाढविला आहे. दुग्ध व्यवसायातील खाचाखोचा समजावून घेण्यासाठी राज्यभरातील पशुपालक त्यांच्याकडे प्रशिक्षणाला येतात. 

राधानगरी तालुक्‍यातील तिटवे गावात सागर किल्लेदार यांची शेती आहे. या शेतीबाबत माहिती देताना श्री. किल्लेदार म्हणाले, की आमचे एकत्र 30 जणांचे कुटुंब आहे. संपूर्ण कुटुंबाची 48 एकर शेती असून त्याचे तीन भाग आहेत. पहिल्या भागात उसाची लागवड, दुसऱ्या भागात जनावरांसाठी वर्षभर चारा उपलब्धतेसाठी विविध चारा पिकांची लागवड आणि तिसऱ्या टप्प्यात भाजीपाला लागवड असते. दुग्ध व्यवसाय माझ्याबरोबरीने पत्नी वंदना, बंधू जितेंद्र आणि त्यांची पत्नी नंदा यांचा सहभाग आहे

केवळ उसाच्या उत्पादनात समाधानी न राहता पूरक व्यवसायाच्यादृष्टीने मी विचार सुरू केला. परिसरातील शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांशी चर्चा करून पशुपालनाच्या दिशेने नियोजन सुरू केले. पहिल्यांदा 20 गावठी म्हशींच्या संगोपनातून दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. पहिल्यांदा पारंपरिक पद्धतीनेच इतर शेतकऱ्यांसारखे म्हशींचे संगोपन ठेवले होते. त्यामुळे अवघे 20 लिटरच दुधाचे उत्पादन मिळत होते. दुधाचे उत्पादन आणि व्यवस्थापनाच्या खर्चाचा ताळेबंद बसत नव्हता. त्यामुळे दुग्ध व्यवसायातील व्यवस्थापनात बदल करायचे ठरविले. त्यासाठी पुन्हा प्रयोगशील पशुपालक तसेच गोकुळ दूध संघांच्या तज्ज्ञांशी चर्चा केली. याच दरम्यान 2005 मध्ये उत्तर प्रदेशातील सलोन येथील पशू प्रजनन केंद्रामध्ये प्रशिक्षणाची संधी मिळाली. तेथील जनावरांच्या व्यवस्थापनातील सुधारित तंत्र समजले आणि व्यवसायाची दिशाच बदलली. गावी आल्यावर गावठी म्हशी विकून मुऱ्हा जातीच्या म्हशीचे संगोपन सुरू केले. जिंद (हरियाना) येथून जातिवंत तीन मुऱ्हा म्हशी आणून सुरवात केली. पुढे 18, त्यानंतर 32 म्हशी वाढविल्या आता गोठ्यात 40 मुऱ्हा म्हशी आहेत. तसेच गाभ गेलेल्या 35 रेड्या आणि व्यायला झालेल्या 11 रेड्या आहेत. योग्य व्यवस्थापन असेल तर निश्‍चितपणे मुऱ्हा म्हशी एक वेतात साधारणपणे दोन हजार लिटर ते अडीच हजार लिटर दूध देतात. सन 2009 मध्ये गोकुळ दूध संघातील तज्ज्ञ पी. आर. पाटील, व्ही. डी. पाटील, प्रशांत पाटील यांच्यासमवेत लुधियाना, सुरतगड, हिस्सार, कर्नाल, इज्जतनगर येथील संशोधन केंद्रांना भेटी देऊन पशुसंवर्धनातील नवीन तंत्रज्ञान जाणून घेतले. पशुपालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे गोठ्यातच जातिवंत म्हैस सांभाळून पुढे रेडकांचे योग्य व्यवस्थापन केले तरच हा व्यवसाय फायदेशीर ठरतो. रेडकांचे संगोपन हा व्यवसायाचा मूळ गाभा आहे. जातिवंत म्हैस, पाणी व्यवस्थापन, वैरण आणि पशुखाद्य नियोजन, वेळेवर जंतनिर्मूलन, खनिज मिश्रण, वेळोवेळी लसीकरण, कृत्रिम रेतन आणि रेडकांचे संगोपन ही दुग्ध व्यवसायातील महत्त्वाची सूत्रे आहेत. 

...असे आहे वासरांचे संगोपन 
आज पशुपालक केवळ दूध देणाऱ्या गाई, म्हशीकडे लक्ष देतो. खरे तर गाभण म्हैस त्याचबरोबरीने जन्मलेल्या रेडकाचेही खाद्य व्यवस्थापन महत्त्वाचे असते. या व्यवस्थापनावरच पुढील काळातील दूध उत्पादनाचे गणित अवलंबून असते. रेडकांच्या संगोपनाबाबत श्री. किल्लेदार सांगतात, की गाभण म्हशीला योग्य प्रमाणात हिरवा आणि सुकलेला चारा दिला पाहिजे, त्यामध्ये एकदल आणि द्विदल चाऱ्याचे संतुलन हवे. तसेच शरीराच्या वाढीसाठी खनिज मिश्रण, पशुखाद्याचाही योग्य पुरवठा हवा. कारण गाभण काळात शेवटचे तीन महिने रेडकाच्या वाढीसाठी महत्त्वाचे असतात. केवळ उसाचे वाढे आणि सुक्‍या वैरणीवर म्हशीचे योग्य पोषण होत नाही. म्हैस विल्यानंतर रेडकाला स्वच्छ करावे, त्याच्या शरीरावरून हात फिरवावा, म्हणजे त्याचे रक्ताभिसरण चांगले होते. महत्त्वाचे म्हणजे अर्ध्या तासाच्या आत रेडकाला सव्वा लिटर चीक पाजलाच पाहिजे. अर्ध्या तासानंतर पाजलेला चीक वासराला पचत नाही. दिवसभरात रेडकाच्या वजनाच्या दहा टक्के चीक तीन वेळा विभागून पाजावा. त्यातूनच वासराची पचनसंस्था सुरळीत राहते. रेडकू जन्मताच अर्ध्या तासाच्या काळात नाळ दोन इंचाने कापून एका इंचावर बांधली जाते आणि त्या ठिकाणी जंतुनाशक लावले जाते. पुढील दिवसात दुधात काही प्रमाणात पाणी मिसळून देतो. परंतु ते पचते की नाही हे पाहावे लागते. रेडकास अकराव्या दिवसापासून मिल्क रिप्लेसर, काफ स्टार्टर सुरू करतो. याचे प्रमाणदेखील रेडकाच्या पचनशक्तीवर ठरवावे. सहा महिन्यांपर्यंत मिल्क रिप्लेसर तर एक वर्षापर्यंत काफ स्टार्टर देण्यात येते. पंधरा ते वीस दिवसांनंतर वजनाच्या प्रमाणात वैरण दिली जाते. चौथ्या महिन्यापासून खनिज मिश्रण देण्यास सुरवात होते आणि एक वर्षानंतर पशुखाद्य सुरू करतो. वाढीच्या काळात सकस हिरवा चारा आणि सुकी वैरण दिली जाते. मिल्क रिप्लेसर, काफ स्टार्टर खनिज मिश्रण आणि पशुखाद्य देताना पशुतज्ज्ञांचा सल्ला आणि आपले व्यवस्थापन हे फार महत्त्वाचे आहे. 

साधारणपणे माझ्याकडे 25 ते 35 महिन्यांच्या काळात रेडी गाभ जाते. जनावरांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी वर्षातून किमान दोन वेळा सर्व म्हशींना जंतनाशक दिले जाते. वेळोवेळी पशू तज्ज्ञांकडून म्हशी, रेडकांची तपासणी आणि वेळापत्रकाप्रमाणे लसीकरणही केले जाते. यामुळे आरोग्य चांगले राहते. कुपोषित म्हशी पुढे गाभण राहण्यात अडचण येते. तेथून पुढे नुकसान होते. 

रेडकांसाठी स्वतंत्र गोठा 
श्री. किल्लेदार यांनी रेडकांच्या संगोपनासाठी स्वतंत्र गोठे तयार केले आहेत. पहिल्या गोठ्यात एक ते तीन महिन्यांच्या रेडकांचे संगोपन होते. दुसऱ्या गोठ्यात तीन ते एक वर्षापर्यंतच्या रेडकांचे संगोपन होते. तिसऱ्या गोठ्यात जी वासरे अशक्‍त आहेत, ज्यांची वाढ कमी आहे, अशा रेडकांचे स्वतंत्र संगोपन केले जाते. रेडकांना फिरण्यासाठी मुक्त संचार गोठा स्वतंत्र बांधण्यात आला आहे. 18 ते 30 महिन्यांपर्यंतची रेडके एका वेगळ्या जागेत मुक्त संचारासाठी सोडण्यात येतात. मुक्त गोठ्यात सोडलेल्या रेडकांचे वजन गोठ्यात बांधून असलेल्या रेडकांपेक्षा दररोज 200 ग्रॅमने वाढलेले दिसून आले आहे. सन 2005 पासून श्री. किल्लेदार रेडकांचे संगोपन करीत आहेत. त्यातून त्यांनी गोठ्यात 70 रेड्या तयार केल्या आहेत. व्यवस्थापनापूर्वी मरतूक जवळपास 40 टक्के होती. पण आता एक टक्काही मरतूक नाही. साधारणपणे 28 ते 38 किलो वजनाच्या रेडकाची पैदास चांगली होते. दररोज किमान 200 ग्रॅमपर्यंत वजन वाढते. पूर्वी रेड्या लवकर माजावर येत नव्हती. आता 26 ते 30 महिन्यांत गाभ राहतात. 

...असे आहे चाऱ्याचे नियोजन 
म्हशींची संख्या मोठी असल्याने श्री. किल्लेदार यांनी बारा एकरावर चारा पिकांची लागवड केली आहे. यामध्ये 
मका (तीन एकर), ज्वारी (पाच एकर), बाजरा (1.5 एकर), लुसर्न गवत (एक एकर), बरसीम (एक एकर) अशी लागवड आहे. त्यामुळे वर्षभर हिरव्या गवताची उपलब्धता राहते. एका म्हशीला दररोज चार ते पाच किलो सुकी वैरण आणि 20 ते 25 किलो ओली वैरण दिली जाते. यामध्ये मका, कडवळ, बाजरी, मारवेल 14 ते 17 किलो आणि लुसर्न, बरसीम, चवळी चारा सहा ते आठ किलो असे प्रमाण ठेवले जाते. पशुखाद्य शरीर पोषणास एक किलो आणि एक लिटर दुधास 350 ते 400 ग्रॅम दिले जाते. खनिज मिश्रण किमान 50 ते 60 ग्रॅम दिले जाते. खनिज मिश्रण आणि पशुखाद्य हे पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच द्यावे. त्यामुळे अतिरिक्त खर्च होणार नाही. 

जनावरांच्या खाद्यात हिंग, जिरे, ओवा, सुंठ, गूळ, धन्याचाही योग्य प्रमाणात वापर केला जातो. दररोज जनावरांना पुरेसे स्वच्छ पाणी पुरविणे आवश्‍यक आहे. जनावरांना चारा कुट्टी करून दिला जातो. 

गोठा व्यवस्थापन 
श्री. किल्लेदार यांनी एकूण चार गोठे बांधले आहेत. दहा गुंठ्यांमध्ये दोन गोठे मुक्त निवारा पद्धतीचे आहेत. तर पाच गुंठ्यांवर बंदिस्त दोन गोठे बांधण्यात आले आहेत. गोठ्यामध्ये योग्य आकाराची गव्हाण आहे. दररोज साफसफाई केली जाते. त्यामुळे जनावरे स्वच्छ राहतात. मुक्त संचार गोठ्याबाबत श्री. किल्लेदार म्हणाले, की या पद्धतीमुळे म्हशी तसेच रेडकांना चांगला व्यायाम मिळतो. फिरल्यामुळे पायांना सूज येत नाही. ताण कमी होतो. म्हशी गरजेनुसार चारा खातात, पाणी पितात. शांतपणे बसून रवंथ करीत राहते. यामुळे दूध उत्पादनात वाढ होतो. कासदाह, गोचिडांचा त्रास, खुरांच्या जखमा होत नाहीत. 
म्हशींना अंग घासण्याची सवय असते. यासाठी गोठ्यात दोन खांब उभे केले आहेत. त्या खांबांना म्हशी अंग घासतात. त्यामुळे त्यांच्या शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहण्यास मदत होते. एका वेतामध्ये एक म्हैस साधारण दोन हजार ते 2500 लिटर दूध देते. दुधाच्या 40 टक्के पशुखाद्य लागते. साधारणपणे 100 रुपयांच्या दूध विक्रीत 40 रुपये वैरणीचा खर्च होतो. बाकीचा सर्व नफा राहतो. 
गोठ्यात उपलब्ध झालेल्या शेणाचा वापर दोन गोबर गॅससाठी केला जातो. गोबर गॅसमधून बाहेर पडणारी स्लरी थेट शेतात सोडण्यात येते. त्याचा पीकवाढीसाठी फायदा झाला आहे. 

किल्लेदारांचा गोठा हे प्रशिक्षण केंद्र 
सन 2009 मध्ये श्री. किल्लेदार यांनी गोकुळ दूध संघाच्या सहकार्याने प्रशिक्षण केंद्र सुरू केले. प्रत्यक्ष गोठ्यातच एका शेतकऱ्याने, शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या भाषेत समजावून सांगणारे प्रशिक्षण केंद्र म्हणून आज किल्लेदारांच्या गोठ्याची ख्याती आहे. या ठिकाणी गोठा व्यवस्थापन, जनावरांचे व्यवस्थापन, वैरण व पशुखाद्य व्यवस्थापन, वासरू संगोपन, मुक्त निवारा पद्धती, वैरण कुट्टी यंत्र, सायलेज (मूरघास) माहिती, धार काढण्याचे यंत्राबाबत माहिती दिली जाते. आदर्श गोठा व्यवस्थापन मार्गदर्शन हा दोन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत 42 हजार पशुपालकांनी श्री. किल्लेदार यांच्याकडे पशुपालनाचे धडे गिरविले आहेत

No comments:

Post a Comment