Thursday, May 30, 2013

पशू व्यवस्थापनातील दैनंदिनी

आपल्या गोठ्यामध्ये रोज सकाळी व सायंकाळी ठराविक वेळा चक्कर मारणे महत्त्वाचे असते. जनावरांच्या गोठ्यामध्ये वैरण, पेंड, हिरवा चारा यांचे व्यवस्थापन, तसेच निघालेले दूध वासरांना पाजायचे. दूध, भांड्यांची स्वच्छता, इतर सर्व गोष्टींचे व्यवस्थापन यांकडे लक्ष देणे गरजेचे असते. जनावरांच्या गोठ्यामध्ये प्रत्येक गोष्टीची ठराविक वेळ असली पाहिजे व ती पाळली गेली पाहिजे. उदा.ः पाणी पाजण्याची वेळ, वैरण टाकण्याची वेळ, अंबोण ठेवण्याची वेळ, दूध काढण्याची वेळ इत्यादी. 

यामध्ये बदल केल्यास अथवा ठराविक वेळेत न केल्यास जनावरांच्या दूध देण्याच्या उत्पादनावर परिणाम होत असतो, तसेच जनावरांना हाताळताना पशुवृत्ती न दाखविता मायेने काळजी घेतली पाहिजे. जनावरांस मारहाण केल्यास गाईच्या खाण्यावर प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होऊन उत्पादनात घट होते.

जनावरांना खरारा करणे महत्त्वाचे असते. नियमित खरारा केल्यास अंगावरील खराब केस व घाण, धूळ निघून जाईल व रक्ताभिसरण क्रिया व्यवस्थित होते.

उन्हाळ्यात गाईंना नियमित पाण्याने धुणे फार महत्त्वाचे असते. तापमानात वाढ झाल्यामुळे दुधावर, तसेच जनावरांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो.

धार काढण्याच्या ठराविक वेळांमध्ये बदल करू नका. दोन धारांमध्ये ठराविक तासांचे अंतर ठेवा. जनावरे धुतल्यानंतर शक्‍यतो धारा काढा, तसेच गाईंची पूर्ण धार काढा. अर्धवट धार काढल्यास कासेचे रोग होतात.

पशू व्यवस्थापनामध्ये सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणून प्रजनन ओळखले जाते. गाईचा माज ओळखणे हा फार महत्त्वाचा भाग आहे. योग्य वेळी माज ओळखून कृत्रिम रेतनाद्वारे किंवा वळूकडून भरणे फार महत्त्वाचे आहे. गाईंचा माज वेळेत न ओळखल्यास फार मोठे नुकसान होते. त्यासाठी दररोज गोठ्यामध्ये सकाळी चक्कर मारून माजावर आलेल्या गाई 24 तासांच्या आत भरणे महत्त्वाचे असते.

गर्भ तपासणी ः ज्याप्रमाणे माज महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे गर्भ तपासणी करणे फार महत्त्वाचे आहे. गाई भरल्यानंतर ती गाभण आहे किंवा नाही या गोष्टींकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. गाय भरल्याची तारीख लिहून ठेवून अंदाजे दोन महिन्यांनी तपासून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी गोठ्यातील सर्व गाईंची माहिती तपासून पाहणे गरजेचे आहे. अंदाजे विण्याची तारीख काढून त्या गाईंची त्याप्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे.

जनावरांचे आरोग्य ः पशू व्यवस्थापनामध्ये जनावरांचे आरोग्य हे दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे, त्यासाठी जनावरांच्या आरोग्याकडे दररोज लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. रोगप्रतिबंधक लस टोचणे, जनावरांचे रोगनिदान, तसेच जंतनिर्मूलन हे सर्व वेळेवर करणे फार महत्त्वाचे आहे. एखादे जनावर आजारी असल्यास त्वरित औषधोपचार करणे, तसेच आजारी जनावरांना वेगळे ठेवणे फार महत्त्वाचे आहे.

जनावरांच्या वाईट सवयी मोडणे - जनावरांच्या अनेक प्रकारच्या वाईट सवयी असू शकतात. उदा.ः अंग चाटणे, दुसऱ्या गाईचे दूध पिणे, लाथा मारणे व मारामारी करणे इत्यादी सवयी असतात. त्यासाठी या वाईट सवयी बदलणे गरजेचे असते. अन्यथा दूध उत्पादनात घट होऊ शकते, तसेच जनावरे हाताळताना त्रास होऊ शकतो.

जनावरांची विक्री - सर्वसाधारणपणे गोठ्यामध्ये संसर्गजन्य रोगी जनावरे, माजावर येणारी जनावरे, कमी दूध देणारी जनावरे, भाकड काळ जास्त असणारी, जास्त वेत झालेली जनावरे ही आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसतात. त्यासाठी प्रत्येक वर्षी जनावरांची संख्या कमी करणे महत्त्वाचे असते.

स्वच्छ पाणी - दुग्ध व्यवसायात स्वच्छ पाणी हा फार महत्त्वाचा भाग आहे. उन्हाळ्यात थंड पाणी पाजावे. एक लिटर दूध उत्पादनासाठी चार लिटर पाणी लागते.
 
गाई विण्याच्या दोन महिने आधी दूध काढणे बंद करावे, त्यामुळे प्रजनन अवयवांना विश्रांती मिळते आणि गर्भाची वाढ व्यवस्थित होते, तसेच प्रसूतीच्या वेळी लागणारी ऊर्जा शरीरात साठविली जाते.

गहू भुशाचा करा पशुखाद्यासाठी वापर

दरवर्षी गहू मळणीनंतर मोठ्या प्रमाणात गव्हाचा भुसा निघतो. हा भुसा निरुपयोगी, निकृष्ट आहे असे समजून अनेक शेतकरी मळणी झाल्याबरोबर तो पेटवून देतात; मात्र या भुशावर युरिया आणि उसाची मळी किंवा गुळाची प्रक्रिया करून भुशाचा कस वाढविता येतो. त्याचा पशुखाद्यासाठी चांगला उपयोग होतो. कमी खर्चात पशुपालकांना स्वतः घरच्या घरी ही पद्धत अवलंबिता येऊ शकते.

गव्हाच्या भुशात पोषणमूल्ये कमी प्रमाणात असतात; मात्र उसाची मळी अथवा गूळ आणि युरिया भुशाची पोषणमूल्ये वाढविण्यास मदत करतात. ते कसे याची माहिती घेऊ.

युरिया - रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पोटातील उपयुक्त सूक्ष्मजीव प्रथिने नसलेल्या, परंतु नत्र असलेल्या पदार्थांपासून शरीरास लागणारी प्रथिने बनवितात. जनावरांच्या आहारात युरियाचा उपयोग शरीर प्रथिने बनविण्यासाठी होऊ शकतो. युरिया शरीरात गेल्यानंतर त्यावर "युरियेज' या आंत्रसचेकाची क्रिया होऊन त्यापासून अमोनिया तयार होतो व या अमोनियापासून पोटातील सूक्ष्मजीव स्वतःची शरीर प्रथिने तयार करतात. ही तयार झालेली प्रथिने अन्ननलिकेत अमिनो आम्लामध्ये विघटित होतात व जनावरांच्या शरीरवाढीसाठी व प्रजोत्पादनासाठी वापरली जातात. पशुआहारात युरियाच्या दोन टक्‍क्‍यांपर्यंतच उपयोग करता येतो. जास्त वापर केल्यास जनावरांना विषबाधा होऊन जनावर दगावण्याची शक्‍यता असते. तेव्हा युरियाचा वापर पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावा. 
उसाची मळी (मोलॅसिस) - 
साखर शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत मळी तयार होते. मळी म्हणजे साखर, हेमिसेक्‍युलोज आणि क्षार यांचे पाण्यातील तीव्र मिश्रण होय. उसाच्या मळीचा वापर केल्यास असे खाद्य चविष्ट होते व जनावरे आवडीने खातात. याशिवाय मळी खाद्यात ऊर्जा पुरविते, जनावरांच्या पोटातील उपयोगी अशा सूक्ष्म जीवजंतूचे प्रमाण वाढविते व खाद्य पचनास मदत करते, शिवाय खाद्याचा कोरडेपणा कमी करते. पशुखाद्यामध्ये मळीचा उपयोग 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत करता येतो. यापेक्षा जास्त प्रमाण असू नये. जास्त वाटल्यास जनावरांचे पोट दुखणे, अतिसार, लघवीवाटे जास्त मूत्र बाहेर पडणे, पायांना आकडे येणे इत्यादी लक्षणे आढळतात. दुर्लक्ष झाल्यास जनावर दगावण्याची शक्‍यता असते. 

गव्हाच्या भुशावर युरिया आणि उसाची मळी किंवा गूळ यांची प्रक्रिया करून भुशातील पोषणमूल्ये वाढविता येऊ शकतात. उसाची मळी आणि युरिया किंवा कमी प्रतीचा गूळ व युरिया या कमी खर्चाच्या तसेच सहज करता येण्याजोग्या दोन पद्धती आहेत. प्रक्रिया करून गव्हाच्या भुशाचा कस वाढतो.

उसाची मळी आणि युरिया यांचा वापर - 
गव्हाचा भुसा 100 किलो, युरिया दोन किलो, उसाची मळी दहा किलो, मीठ दोन किलो, क्षारांचे मिश्रण एक किलो व 50 लिटर पाणी आणि प्लॅस्टिकचा कागद किंवा पोत्याचा तळवट एवढे साहित्य वापरावे. प्रक्रिया ही सावलीमध्ये करावी. भुशाचा चार इंच जाडीचा थर पसरावा. 50 लिटर पाण्यात युरिया विरघळल्यानंतर त्यात उसाची मळी, मीठ व क्षार टाकून ते मिश्रण चांगले एकजीव करावे. यातील निम्मे मिश्रण भुशाच्या चार इंच जाडीच्या थरावर समप्रमाणात फवारावे. त्यानंतर मिश्रण फवारलेल्या थराला पलटी मारावी आणि उरलेले निम्मे मिश्रण समप्रमाणात फवारावे. सर्व भुसा व्यवस्थित भिजलेला आहे की नाही याची खात्री करावी. भिजलेला भुसा गोळा करून त्याचा ढीग करावा व पोत्याचे तळवट किंवा प्लॅस्टिक कागदाच्या आवरणाखाली हवाबंद स्थितीत दोन ते तीन आठवडे झाकून ठेवावा. युरियातील अमोनिया चाऱ्यामध्ये शोषला जाईल. या प्रक्रियेमुळे गव्हाच्या भुशात सहा ते सात टक्के प्रथिने तयार होतात. तयार झालेला गव्हाचा भुसा प्रति जनावरास तीन ते चार किलो या प्रमाणात खाऊ घालावा.

कमी प्रतीचा गूळ व युरिया यांचा वापर -
या पद्धतीतही चार इंच जाडीचा 100 किलो भुशाचा थर तयार करावा. नंतर पाच किलो खराब प्रतीचा गूळ, एक किलो मीठ, 500 ग्रॅम युरिया, एक किलो खनिज मिश्रण, 50 लिटर पाण्यात विरघळून ते पाणी गव्हाच्या भुशावर समप्रमाणात शिंपडावे व हे मिश्रण एकजीव मिसळून नंतर गाईंना खाऊ घालावे. या पद्धतीने तयार केलेला गव्हाचा भुसा पशुधनासाठी खाद्य म्हणून प्रक्रियेनंतर दोन तासांनंतर खायला घालता येतो. याचे प्रमाण गाई व म्हशीत तीन ते चार किलो प्रति जनावर, प्रति दिन या प्रमाणात ठेवावे. 

 श्री. देशमुख, 9422737089
(लेखक गो-संशोधन व विकास प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.)

प्रक्रिया केलेल्या भुशाचे फायदे -1) वाया जाणाऱ्या निकृष्ट भुशाचे पोषण मूल्य वाढून उत्कृष्ट पशुखाद्य मिळते. 2) कुट्टी करण्याची गरज नाही. 3) हिरव्या चाऱ्याला चांगला पर्याय आहे. 4) कडब्याच्या तुलनेत सुमारे तीन टक्के प्रथिने व सहा टक्के पचनीय पदार्थ जनावरांस अतिरिक्त मिळतात. 5) वर्षभर वाळलेला चारा उपलब्ध होतो.

Tuesday, May 28, 2013

मुक्‍तसंचार गोठा पद्धतीने रामनाथांनी वाढविले दूध उत्पादन...

माहेगाव देशमुख (ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) येथील तरुण शेतकरी रामनाथ त्र्यंबक जाधव यांनी शेतीला पूरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला. दोन जर्सी गाईंपासून हा व्यवसाय हळूहळू वाढवत 25 गायींवर नेला आहे. मुक्त संचार पद्धतीचा गोठा हे त्यांच्या दूध व्यवसायाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. परिसरात अशा पद्धतीचा यशस्वी ठरलेला हा पहिलाच गोठा आहे. काटेकोर व्यवस्थापनामुळे गाईंचे 35 लिटर पासून सुरू केलेले दूध उत्पादन आता दररोज 260 लिटरपर्यंत पोचले आहे. व्यवसाय कसा यशस्वी केला याबाबतचे त्यांचे अनुभव खरोखर सर्व दूध उत्पादकांना फायद्याचे आहेत. दुधाळ जनावरांच्या उत्कृष्ट संगोपनामुळे अह मदनगर जिल्हा परिषदेने त्यांना "आदर्श गोपालक' म्हणून पुरस्कारही दिला आहे.
अमोल बिरारी

बी.ए. पर्यंत शिक्षण घेतलेल्या रामनाथ जाधव यांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. त्यामुळे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी न करता शेतीच करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सात वर्षांपासून ते शेती करत आहेत. शेतीला पूरक जोडधंदा केलाच पाहिजे यावर ते ठाम होते; परंतु जोडधंद्याला दुय्यम स्थान न देता तो पूर्णतः यशस्वी करून त्याला मुख्य व्यवसायाचे स्वरूप द्यावयाचे त्यांनी निश्‍चित केले. नेमका कोणता जोडधंदा करावा या विचाराने जाधव यांनी पोल्ट्री उद्योग, इमूपालन, वराहपालन तसेच दुग्ध व्यवसाय आदी विविध शेतीपूरक व्यवसायांचा संपूर्ण अभ्यास केला. ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली व माहिती घेतली. 

आपल्या व्यवसायाबाबत जाधव यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, की अगदी सुरवातीला मामांकडून एक जर्सी गाय आणली होती. मात्र एका गाईवर भागणार नव्हते. जोडीला दुसरी गाय असावी म्हणून गावच्या सोसायटीतून कर्ज घेऊन आणखी एक जर्सी गाय विकत घेतली. अशाप्रकारे 2005 पासून दोन गाईंवर दूध व्यवसाय सुरू केला. होणाऱ्या दूध उत्पादनातून चार ते पाच महिन्यांत सोसायटीतून घेतलेले कर्ज फेडले. हळूहळू या व्यवसायाचा अनुभव येत गेला. गाईंची संख्या आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला. याकामी दुग्ध व्यवसायासंदर्भात नाबार्डच्या योजनेचा फायदा झाला. त्या योजनेअंतर्गत सोसायटीमधून आणखी कर्ज मिळाले. त्यातून आठ जर्सी गाई विकत घेतल्या. शा एकण दहा गाई झाल्या. व्यवसाय वाढत असल्याने मजुरांची स मस्या उद्‌भवू नये म्हणून मिल्किंग मशिन विकत घेतले. सुरवातीला गाईंना या मशिनची सवय नसल्याने दूध काढताना अडचण आली, परंतु त्यानंतर हा त्रास कमी होत गेला. मशिनमुळे पूर्ण क्षमतेने दूध निघते. शेवटच्या धारांमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते; परंतु पशुपालकांकडून नेमक्‍या त्याच धारा परिपूर्ण काढल्या जात नाहीत. मात्र मशिनने ते शक्‍य झाले. दूध उत्पादनासोबत फॅटमध्येही वाढ झाली. सद्यःस्थितीत एक गाय दोन्ही वेळेला सरासरी वीस लिटर दूध देते. बारामती येथील एका डेअरीला दूध संकलित करून पाठविले जाते. प्रति लिटरला सरासरी 16 रुपये भाव मिळतो. 

दहा गाईंनंतर पुढचा टप्पा गाईंची संख्या वाढवायची होती, परंतु त्यासाठी कर्ज उपलब्ध होणे आवश्‍यक होते. बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी याबाबत बोलणी केली. सुरवातीला त्यांनी पाहू, देऊ असे केले; मात्र जेव्हा त्यांना आपल्याकडील 27 लिटर दूध देणाऱ्या गाईला मिळालेल्या पुरस्काराविषयी सांगितले तेव्हा त्यांनी गोठ्याला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. खात्री पटल्यानंतर कर्ज देण्याचे मंजूर केले. एकूण अकरा लाखांचे कर्ज मिळाले. त्यातून पुन्हा दहा गाई, मिल्किंग मशिन, छोटा जनरेटर विकत घेतला. शेडचा गोठा व मुक्त संचार पद्धतीसाठी "वॉल कंपाउंड' तयार केले. अशाप्रकारे गाईंची एकूण संख्या 20 झाली. 

मुक्त संचार पद्धतच का? 
दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत जसे जनावरांचे आजार, त्यांचा माज याविषयी सतर्क राहणे आवश्‍यक असते असे जाधव अनुभवातून सांगतात. बंदिस्त गोठ्यात आलेल्या अनुभवातून त्यांना असे दिसले, की दुधाळ जनावरांना थायलेरियासिस, कासदाह, किटोसिस हे मुख्य तीन आजार होतात. बंदिस्त गोठ्यात गोचिडांना लपण्यास भरपूर जागा असते. त्यांच्यामुळे जनावरांना थायलेरियासिस हा रोग होतो. तसेच बंदिस्त गोठ्यात जनावर जेथे उभे राहते तेथे शेण, मल-मूत्र पडत असल्याने ती जागा कायम ओली राहते. त्यावर काडीकचरा पडलेला असतो. त्यावरच जनावरे बसतात. त्यामुळे कासदाह रोग होतो. यातून मुक्तता मिळावी म्हणून मुक्त संचार गोठा पद्धत निवडली. तसेच दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे काही गाई-म्हशी मुका माज दाखवितात. बंदिस्त गोठ्यात ही गोष्ट लक्षात येत नाही; मात्र मुक्त संचार गोठा पद्धतीत अशा गाईला त्वरेने ओळखणे सोपे होते. माजाची लक्षणे लगेच ओळखता येतात आणि माज ओळखता येणे हेच तर दुग्ध व्यवसाय यशस्वी होण्यामागील कारणांपैकी एक गमक आहे. कारण अकरा महिन्यांत गाय वेतावर यायची असेल तर ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. मुक्त गोठा संचार पद्धतीत ही गोष्ट लवकर लक्षात येते. या पद्धती विषयी "ऍग्रोवन'मध्ये लेखाद्वारे माहिती प्रसिद्ध झाली होती. त्या माहितीच्या आधारे नियोजन केले. परिसरात यशस्वी झालेला या पद्धतीचा हा पहिलाच गोठा आहे. कालवडींसाठी स्वतंत्र मुक्त संचार गोठा आहे. त्यामध्ये 15 कालवडी आहेत. वयोमानानुसार त्यांच्या खाद्यांचे नियोजन केले जाते. मुक्‍त संचार गोठा पद्धतीमुळे मजुरा ंच्या समस्येचा त्रास वाचतो. गाईंना व त्यांच्या वासरांना पाणी पाजण्याचा त्रास कमी होतो. मुक्त संचार म्हणजे गाईंना मोकळे फिरावयास मिळते, त्यामुळे त्यांचा भरपूर व्यायाम होतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या पद्धतीच्या गोठ्याला तीन वर्षे पूर्ण झाली, तेव्हापासून ते आजपर्यंत गाईंना कोणत्याही रोगांची बाधा न होता जनावरांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत मिळाली आहे. 

...अशी आहे मुक्त संचार गोठ्याची रचना 
या गोठ्याच्या आवाराचे क्षेत्र 200 फूट लांब आणि 150 फूट रुंद आहे. चारही बाजूने लोखंडी अँगल लावून त्याला तारेची जाळी लावली आहे. या पद्धतीच्या गोठ्यात गाईंना स्वैरपणे वावरता येते. त्यांच्या अंगाला खाज आली तर खरारा करण्यासाठी ब्रश लावले आहेत. पाणी पिण्यासाठी हौद बांधला आहे. गाईंना जेव्हा पाणी प्यायचे असते तेव्हा त्या हौदाकडे जाऊन पाणी पितात. उन्हापासून संरक्षणासाठी कंपाउंडच्या कडेने झाडे लावली आहेत. त्यांचा सावलीसाठी चांगला उपयोग होतो. दुपारच्या वेळी गाई या सावलीत बसून आरामात मनसोक्त रवंथ करतात. या आवारातच गाईंचे दूध काढणे व त्यांना चारा खाण्यासाठी शेडची सोय आहे. हे शेड 56 फूट लांब आणि 22 फूट रुंद आहे. दूध काढायचे वेळी गाई शेडमध्ये येऊन उभ्या राहतात. दूध काढल्यानंतर येथेच गव्हाणीतून गाईंसाठी पशुखाद्य व चारा दिला जातो. या गोठ्यात 25 गाई आरामात उभ्या किंवा बसू शकतात. सकाळी दूध काढून झाले, की आवारात गाई मोकळ्या सोडून दिल्या जातात. उन्हाळ्यात आवारातील मैदानावर पाणी मारले जाते. त्यामुळे गाईंना उन्हाचा फारसा त्रास होत नाही. 

तुलनेने फायद्याचा 
बंदिस्त गोठ्यात जनावरे सतत बांधून ठेवल्याने त्यांना पर्याप्त हालचाल करायला मिळत नाही. व्यायामाअभावी जनावरे स्थूल होतात, त्यांच्या स्नायूंमधील लवचिकता कमी होते आणि त्यामुळे ती वेगवेगळ्या विकारांना बळी पडतात. याचा परिणाम सांधेदुखी, नख्या वाढणे इ. सारख्या अनेक व्याधींच्या रूपात दिसून येतो. त्या शिवाय या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो, त्यामुळे जनावरे वारंवार आजारी पडतात. तुलनेने मुक्त संचार गोठा फायद्याचा ठरतो. या पद्धतीमध्ये जनावरे कायमस्वरूपी मोकळी असल्या मुळे त्यांच्या स्वभावामध्ये आमूलाग्र बदल घडतो. त्यामुळे त्याच्या पचन संस्थेवर भरपूर चांगला परिणाम होतो. जनावरांच्या दुधात पाच त दहा टक्‍क्‍यांनी वाढ होते. त्यांनी खाल्लेल्या खाद्यापासून मिळणारे उत्पन्न वाढते. या पद्धतीमध्ये जनावरांना मुबलक व्यायाम व मोकळे वातावरण उपलब्ध असल्यामुळे त्यांची रोगप्र तिकारशक्ती वाढते आणि जनावरे सहजासहजी रोगांना बळी पडत नाहीत, त्यामुळे पशुवैद्यकीय खर्चामध्ये कपात होते. जनावरे मोकळी असल्यामुळे ती स्वच्छंदपणे माज दाखवू शकतात, त्यामुळे माजावरील जनावरे ताबडतोब ओळखता येऊन त्यांच्या रेतनाची व्यवस्था करता येते. वासरांना अशा वातावरणात ठेवल्यामुळे त्या ंची वाढ झपाट्याने होते. त्यांची भविष्यातील उत्पादनक्षमता वाढते. 

मानसिक तणाव दूर करण्यासाठी "एफएम' 
माणसांमध्ये जसा मानसिक ताण असतो. तसाच जनावरांमध्ये देखील असतो. तो कमी करण्याचा हा एक उपाय आहे. दूध काढण्यापूर्वी गाईंना मधुर संगीत ऐकविले तर गाईंना सिग्नल दिल्यासारखे होते. त्यातून मानसिक ताण दूर होऊन त्यांचे लक्ष विचलित होत नाही. सकाळी दूध काढण्याच्या आधी सहा वाजता रेडिओवरील एफएम केंद्र चालू केले जाते. सकाळच्या भक्तिसंगीताचे स्वर कानी पडताच गाई उठून शेडमध्ये आपापल्या जागेवर येऊन उभ्या राहतात. त्यानंतर त्यांच्या गळ्यात साखळी लावली जाते आणि मिल्किंग मशिन लावून दूध काढणी होते. दूध काढणीपासून चारा खाईपर्यंत संगीत सुरूच असते. संध्याकाळी दूध काढणीच्या आधी साडेचार वाजता एफएम सुरू केल्यानंतर गाई जागेवर येऊन उभ्या राहतात. संध्याकाळी साडेसहा ते सात वाजता दूध काढले जाते. 

चारा वेळेतच दिला जातो
दोन मिल्किंग मशिन आहेत त्यामुळे एका वेळी दोन गाईंचे दूध काढले जाते. एक गाईचे दूध काढायला साधारणतः पाच ते सहा मिनिटे लागतात. सध्या 25 गाईंपैकी 18 गाई दूध देतात. मिल्किंग मशिन विजेवर चालते. त्यामुळे वीज गेल्यावर जनरेटरचा वापर केला जातो. गाईंचे दूध काढून झाल्यावर त्यांना पशुखाद्य दिले जाते. त्यानंतर एका वेळची वैरण गव्हाणीतून दिली जाते. त्यात कडबा कुट्टी, यशवंत गवताची कुट्टी यांचा स मावेश असतो. चारा खाऊन झाल्यावर सकाळी साडेदहा-अकरा वाजल्यानंतर ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गाईंना आवारात मोकळे सोडले जाते. सकाळी साडेसात व संध्याकाळी साडेसात या दोन वेळेतच चारा दिला जातो. जेणेकरून गाई रवंथ चांगला करतात. चारा देण्याच्या वेळेत सहसा बदल केला जात नाही. कारण त्याचा दुधावर परिणाम होतो. संध्याकाळचे दूध काढून झाल्यावर गाईंना पशुखाद्य आणि वैरण दिली जाते. त्यानंतर पुन्हा सकाळ होईपर्यंत मोकळे सोडले जाते. मुक्त संचार गोठा पद्धतीमध्ये आवारात 25 गाई सोडल्यावर त्या एकमेकांना मारत नाहीत का? असा प्रश्‍न शेतकऱ्यांकडून नेहमी विचारला जातो. त्यावर बोलताना जाधव म्हणाले, की जनावरांना एकमेकांची फारशी ओळख नसते. सुरवातीला काही गाई हमरीतुमरीवर येतात, परंतु अर्धा- एक तासानंतर त्या शांत होतात. त्यानंतर अशी समस्या येत नाही. 

रवंथ जितका जास्त तितके दूध जास्त 
दोन वेळाच चारा दिला तर जनावरांना मधल्या वेळेत रवंथ करायला भरपूर वेळ मिळतो. दुधाळ जनावरे जितका रवंथ करतात तितके दूध उत्पादन चांगले मिळते. दिवसभरात नेहमी चारा दिल्याने जनावरांना अपचन होण्याची शक्‍यता जास्त असते. तसेच नेहमी नेहमी चारा खायला दिल्याने दुधाळ जनावरांना रवंथ करायला वेळच मिळत नाही. तेव्हा ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्यावी. 

चाऱ्याचे नियोजन 
जाधव यांनी चाऱ्यासाठी लसूणघास, यशवंत, मारवेल चारा पिकांची लागवड केली आहे. वर्षभर गाईंना हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून यशवंत गवताला ठिबक सिंचन केले आहे. लसूण घास तसेच मारवेलला स्प्रिंकलर केले आहे. प्रति दिवस एका गाईला चाऱ्यासाठी 95 ते 100 रुपये खर्च येतो. गव्हाचा भुसा पशुखाद्यात मिसळून दिला जातो. एका दिवसात एका गाईला वाळलेला आणि हिरवा मिळून पंधरा किलो चारा दिला जातो. दोन वेळेसच चारा देण्याचे नियोजन असल्याने इतर चारा कमी लागतो. चाऱ्याची नासाडी होत नाही. 

पशुखाद्याचे नियोजन
पशुखाद्यावर महिन्याला साडेसतरा ते अठरा हजार रुपये खर्च होतात. यासाठी एक टेक्‍निक वापरत असल्याचे जाधव सांगतात. गहू, मका, सोयाबीन काढल्यानंतर जो भुसा, कुटार शिल्लक राहते, त्याचा वापर पशुखाद्यात मिसळून केला जातो. तसेच गहू, मका, सोयाबीन यांच्या काढणीनंतर त्यातून जो बारीक किंवा थोडासा खराब झालेला माल निघतो, त्याचा भरडा करून त्याचा वापर पशुखाद्यात केला जातो. भरडा करण्यासाठी गिरणी घेतली आहे. त्यामुळे अशा रॉ मटेरिअलचा वापर चांगल्याप्रकारे होतो. सध्या पशुखाद्याचा दर 1500 रुपये प्र ति क्‍विंटल आहे. पशुखाद्य व्यतिरिक्त मीठ, खायचा सोडा आणि मिनरल मिक्‍शर मिसळून दिले जाते. त्यासाठी एक टॅंक केला आहे. एका गाईला अडीच किलो पशुखाद्य आणि अडीच किलो भरडा मिसळून दोन्ही वेळेला दिला जातो.

गाईचा दिवसाचा आहार 
नवीन व्यालेली गाय असेल तर ती किती लिटर दूध देते त्यावर खाद्याचे नियोजन ठरविले जाते. गाय नुकतीच व्याल्यानंतर सहा ते सात किलो पशुखाद्य दिले जाते. साधारणतः एका गाईला दोन्ही वेळेला सहा किलो पशुखाद्य दिले जाते. तसेच महिन्यातून आठ दिवस गूळ दिला जातो. त्यामुळे जनावरांतील कॅल्शिअमची कमतरता भरून निघते, हाडे ठिसूळ होत नाहीत. एवढे करून एखाद्या गाईच्या पचन क्रियेवर परिणाम झालाच तर त्यासाठी तेल पाजले जाते. त्यामुळे पोट साफ होते. गॅसेसचा त्रास राहत नाही. पोटात बिघाड झालेला बरा होतो.
- रामनाथ जाधव, 7588543216, 9763751952

गोठ्यातील शेणाद्वारे होतेय दररोज दीडशे युनिट विजेची निर्मिती

कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाचा पथदर्शक प्रयोग 
अलीकडच्या काळात शेती वा पूरक उद्योगांत नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. शेती, जनावरांचा गोठा आदी पूरक उद्योगांबरोबरच उपलब्ध साधनसामग्रीतून जैवइंधन (बायोगॅस)सारखे प्रकल्प वैयक्तिक स्तरावर निर्माण करण्यासाठी आज शासन अनुदान देते; परंतु अनेक अडचणींअभावी हे प्रकल्प शेतकऱ्यांपर्यंत हव्या त्या क्षमतेने पोचू शकत नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील जांभळी (ता. शिरोळ) येथील अभय अण्णासाहेब पाटील - मोटके या तीसवर्षीय बी.कॉम. पदवीधर तरुणाने मात्र ही किमया करण्याचा प्रयत्न केला आहे. वडिलांनी सुरू केलेला जनावरांचा गोठा तर सांभाळलाच; पण त्यातूनही पुन्हा उद्योगनिर्मितीचा उद्देश ठेवला. सुमारे दोनशे वीस गाईंच्या गोठ्याचे यशस्वी व्यवस्थापन करताना दररोज तयार होणाऱ्या शेणाचा पुरेपूर वापर करीत बायोगॅसनिर्मिती प्रकल्पाला चालना दिली. त्या माध्यमातून दररोज दीडशे युनिट ऊर्जेची (विजेची) निर्मिती करणे शक्‍य झाले आहे. या ऊर्जेचा वापर पाणी खेचण्याचा विद्युत पंप, धारा काढणारे यंत्र आदींसह कडबा कुट्टी यंत्र चालवण्यासाठीही केला आहे. यामुळे दररोजच्या वीज भारनियमनाच्या कटकटीतून अभय याने उद्योगशीलता दाखवणारा मार्ग चोखंदळला आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील जांभळी (ता. शिरोळ) गावच्या हद्दीत अभय पाटील यांचा भव्य गोठा उभा आहे. सन 2000 या वर्षात अभय यांचे वडील अण्णासाहेब यांनी गोठा उभारला. पाटील यांची घरची सतरा एकर जमीन आहे. दूध व्यवसायाबरोबरच या जमिनीसाठी शेणखतही मिळेल या उद्देशाने गोठ्याची उभारणी झाली. सुरवातीला हरियाना येथून मुऱ्हा जातीच्या म्हशी आणल्या. या वेळी चार गाईही आणल्या. काही दिवस म्हशींच्या गोठ्यापासून फायदा होत होता; परंतु पशुखाद्याच्या वाढत्या किमती व अन्य तांत्रिक कारणांमुळे अण्णासाहेबांनी गाईंच्या संगोपनावरच भर दिला. हळूहळू होलस्टीन फ्रिजियन (एचएफ) जातीच्या गाईंची संख्या वाढत गेली. अण्णासाहेबांबरोबरच 2003 पासून अभय यांनीही गोठा व्यवसायात लक्ष घालण्यास सुरवात केली. 

240 गाईंनी सजलाय गोठा 
सध्या सुमारे पंचवीस हजार चौरस फूट जागेत हा गोठा आहे. या गोठ्यात दूध देणाऱ्या नव्वद गाई आहेत, तर शंभर गाभण गाई आहेत. पन्नास कालवडी आहेत. प्रति वीस दुधाळ गाईंची देखभाल करण्यासाठी एक मजूर, अशी व्यवस्थापनाची रचना आहे. गोठ्याचे चौदा वेगवेगळे भाग केले आहेत. प्रत्येक भागात सरासरी सतरा गाई आहेत. आठ मजूर यासाठी काम करतात. प्रत्येक भागावर क्रमांक लिहिले आहेत. प्रत्येक जनावरासही रेकॉर्डसाठी क्रमांक दिले आहेत. यामुळे एखादे जनावर आजारी असल्यास, गाभण असल्यास ते तातडीने लक्षात येते. गोठ्याचे शेड सिमेंट पत्र्याचे आहे. हवा खेळती राहावी यासाठी गोठा व पत्र्यांची उंची जास्त ठेवली आहे. गाभण जनावरांना त्रास होऊ नये यासाठी कोब्यावर रबरी पट्ट्या अंथरल्या आहेत. 

गोठा व्यवस्थापन 
पहाटे सुमारे पाच वाजता शेण काढले जाते. साडेपाचच्या सुमारास धारा काढणी सुरू होते. त्यासाठी दूध काढणी यंत्राचाच वापर केला जातो. प्रत्येक वीस गाईंसाठी दोन यंत्रांची व्यवस्था केली आहे. सुमारे तासाभरात सर्व धारा काढल्या जातात. साडेसहा ते सात या काळात मजुरांना काही काळ विश्रांती, नंतर सात ते आठ या वेळेत जनावरे धुऊन घेतली जातात. आठ ते नऊ या वेळेत जनावरांना खाद्य दिले जाते. दिवसाला प्रति गाईसाठी सुमारे पाच किलो इतकी कोरडी वैरण दिली जाते. मका हस्क एका दिवसाला एका गाईला सुमारे पंधरा किलो इतके दिले जाते. हिरवी वैरण सुमारे वीस किलो दिली जाते. सकाळी तीस ग्रॅम इतके मिनरल मिक्‍श्चर दिले जाते. दहा लिटर दूध देणाऱ्या प्रति गाईला ते अडीच किलो इतक्‍या प्रमाणात दिले जाते. इतर गाई व कालवडींनाही पशुखाद्य दिले जाते. सायंकाळीही सकाळप्रमाणेच जवळपास व्यवस्थापन होते. दिवसातून दोनदा जनावरे धुतली जातात. रात्रभर गव्हाणीमध्ये पिण्यासाठी पाणी सोडले जाते. 

असे आहे अर्थकारण 
गोठ्यातील दोनशे चाळीस गाईंपैकी सुमारे नव्वद गाई दूध देणाऱ्या आहेत. त्यांचे दररोज एकूण अकराशे लिटर दूध संकलित होते. हे दूध संघाला घातले जाते. दुधाला प्रति लिटर सरासरी बावीस रुपये भाव मिळतो. निव्वळ दूध विक्रीतून दररोज 24 हजार 200 रुपये मिळतात. यातून दररोज पशुखाद्यासाठी पाच हजार रुपये, ओल्या वैरणीसाठी तीन हजार रुपये, मका हस्कसाठी आठ हजार रुपये, कोरड्या वैरणीसाठी तीन हजार, औषधांसाठी तीनशे, मिनरल मिक्‍श्चरसाठी आठशे, तर चौदाशे रुपये मजुरीसाठी खर्च होतात. दिवसाला 21 हजार 500 रुपये खर्च होतात. दिवसाला दूध विक्रीतून निव्वळ नफा 2700 रुपये इतका राहतो. याशिवाय दूध संघ लिटरला सत्तर पैसे याप्रमाणे फरक बिल काढते. म्हणजेच 770 रुपये हे फरक बिलाचे होतात. निव्वळ नफा अधिक फरक बिल असा सरासरी 3400 रुपयांचा दैनंदिन नफा पाटील - मोटके यांच्या गोठ्यास होतो. याशिवाय दररोज दोन टन शेणखतही मिळते. बायोगॅस प्रकल्प उभारण्यापूर्वी त्याचा वापर गांडूळ खत निर्मितीसाठी व्हायचा. गरजेनुसार त्याची विक्रीही करण्यात येत होती. हा प्रकल्प उभारल्यापासून मात्र शेणखताचा वापर या प्रकल्पासाठीच केला जातो. 


वर्षाला सुमारे तीस ते पस्तीस कालवडी तयार 
गोठ्यात वर्षाला सुमारे सत्तर गाईंचा वेत होतो. त्यामध्ये सुमारे तीस ते पस्तीस कालवडी तयार होतात. खोंडे इतर शेतकऱ्यांना पाळण्यास दिली जातात. घरचीच जनावरे तयार करण्यावर अभय यांनी भर दिला आहे. गाय व्यायल्यानंतर वासरास बारा दिवस सुमारे तीन लिटर निव्वळ दूध दिले जाते. तिसऱ्या आठवड्यापासून काफ स्टार्टर व मिल्क रिप्लेसर दिले जाते. चौथ्या आठवड्यापासून हिरवी वैरण दिली जाते. दर शनिवारी संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी येऊन गोठ्यास भेट देऊन जातात. गरज वाटल्यास नामवंत तज्ज्ञांनाही बोलावून त्यांचा सल्ला घेतला जातो. अभय गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायात असल्याने जनावरांच्या किरकोळ व्याधी त्यांना समजायला लागल्या आहेत. मजुरांकडून खात्री करून घेऊन ते औषधे जनावरांना देतात. जिल्हा परिषदेनेही गोठ्याची दखल घेऊन "आदर्श गोठा' पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. 

गरजेतूनच झाला बायोगॅस संकल्पनेचा उदय 
या भागात गेल्या काही वर्षांपासून वीज भारनियमनाचे प्रमाण अधिक वाढले आहे. सातत्याने वीज जात असल्याने अनेकांनी जनरेटरची सोय केली आहे. गोठ्याचा व्याप मोठा असल्याने अभय यांनीही जनरेटरची सोय केली होती; मात्र त्या अनुषंगाने डिझेलचा खर्च जास्त होत होता. यावर पर्याय शोधण्यासाठी त्यांनी सातत्याने विचार केला. त्या संपर्कातून त्यांना पुण्याच्या एका संस्थेचा पत्ता मिळाला. तेथे जाऊन त्यांनी प्रात्यक्षिक प्रकल्प पाहिला. तो पसंत पडल्यानंतर आपल्या भागात त्याच्या उभारणीचे काम सुरू केले. 


अशी आहे बायोगॅस प्रकल्पाची रचना 
अभय यांच्या गोठ्यातून दररोज सुमारे दोन टन शेणखत तयार होते. मजुरांमार्फत छोट्या हातगाडीमार्फत हे शेणखत गोळा केले जाते. ते प्रथम चौकोनी आकाराच्या शेणकुंडीत टाकले जाते. आठ बाय बारा बाय आठ फूट क्षेत्रफळ असलेली ही शेणकुंडी आहे. या शेणकुंडीत गोठा धुतलेले पाणी सोडले जाते. शेणकुंडीत मड पंपाच्या साहाय्याने पाणी व शेणाचे मिश्रण केले जाते. पन्नास टक्के शेण व तितकेच पाणी असे मिश्रण तयार होते. तयार झालेले मिश्रण बारा इंच पाइपमधून जवळच असलेल्या बायोगॅस डायजेस्टरमध्ये सोडले जाते. एकतीस फूट व्यास व पंचवीस फूट खोली असे सिमेंटचे बांधकाम असलेले हे डायजेस्टर आहे. या डायजेस्टरमध्ये गॅस तयार होतो. हा गॅस दीड इंची पीव्हीसी पाइपमधून रबरी गॅस बलूनमध्ये जातो. सुमारे पंचावन्न घनमीटर आकाराचा हा बलून आहे. या बलूनमधून हा गॅस पाणी असलेल्या दोन लोखंडी टाक्‍यांत जातो. तेथे हायड्रोजन सल्फाईड (----एच.टू.एस.) पाण्यात विरघळतो. तो गॅस थेट बायोगॅस इंजिनला (बायोगॅसवर चालणारा जनरेटर) येतो. व्हॉल्व्हच्या साहाय्याने हा जनरेटर चालू - बंद करता येतो. या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेला जनरेटर हा पंधरा केव्ही क्षमतेचा आहे. बायोगॅस तयार झाल्यानंतर तयार झालेली स्लरी शेजारील खड्ड्यात जाते. काही काळ वाळविल्यानंतर त्याचा शेतीसाठी वापर करता येतो. 

दररोज दीडशे युनिट विजेची निर्मिती 
या बायोगॅस प्रकल्पासाठी सुमारे पंचवीस लाख रुपयांचा खर्च आला आहे. केंद्र सरकारचे चार लाख ऐंशी हजार रुपयांचे अनुदान यासाठी मिळाले आहे. या प्रकल्पात दररोज दोन टन शेणखतापासून सुमारे दीडशे युनिट विजेची निर्मिती होते. तयार होणारा गॅस थेट या जनरेटरला पुरवला जातो. या जनरेटरद्वारे विद्युत उपकरणे चालविली जातात. पाणी खेचण्यासाठीची दहा अश्‍वशक्तीची विद्युत मोटर सुमारे पंधरा तास अखंडपणे चालू राहते. तयार झालेल्या ऊर्जेच्या माध्यमातून चार अश्‍वशक्तीचे दूध काढण्याचे यंत्र, साडेसात अश्‍वशक्तीचे कडबा कुट्टी यंत्र, दहा अश्‍वशक्तीचा विद्युत पाणी उपसा पंप चालविला आहे. गोठ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी गोठ्याशेजारीच मजुरांची घरे आहेत. या घरांतील स्वयंपाकासाठी लागणारा गॅसही येथूनच पुरविला जातो. यामुळे येथील प्रत्येक कुटुंबाला गॅसला महिन्याला येणारा सुमारे चारशे रुपयांचा खर्चही वाचला आहे. बायोगॅस शिवाय दररोज सुमारे बाराशे किलो जैविक सेंद्रिय खतही तयार होत आहे. 

भविष्यात असे प्रयोग होणे गरजेचे 
हा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी लाइट नसल्याने जनरेटरसाठी डिझेलचा दररोज सुमारे पंचवीस लिटर खर्च येत होता. आता या खर्चात बचत झाली आहे. एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष बायोगॅस निर्मितीस प्रारंभ झाला. अभय आपले अनुभव सांगताना म्हणाले, की प्रकल्प निर्मितीसाठी खर्च जादा वाटत असला तरी भविष्यातील संभाव्य फायदे भरपूर आहेत. प्रति दिन पंचवीस लिटर डिझेलची बचत होत आहे. म्हणजेच वर्षाला नऊ हजार शंभर लिटर तेलाची बचत होणार आहे. याचाच अर्थ वर्षाला तीन लाख वीस हजार रुपयांचा खर्च वाचू शकेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून वर्षाला जैविक सेंद्रिय खताची निर्मिती सुमारे तीनशे टन इतकी होऊ शकते. याची किंमत अंदाजे साडेचार लाख रुपयांपर्यंत होऊ शकते. गॅस तयार झाल्यानंतर उरलेली रबडी पंपाच्या साहाय्याने पिकांना दिल्यामुळे पिकांना खत मिळतेच, शिवाय मजुरांचीही बचत होऊ शकते. या प्रकल्पाच्या आधारे वीजभारनियमनावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकल्पातून गरजेनुसार ऊर्जेचा वापर करणे शक्‍य झाले आहे. 

भविष्यात आणखी सुधारणेसाठी प्रयत्न अभय म्हणाले, की सध्या बलूनची जितकी क्षमता आहे, तितकाच गॅस बलूनमध्ये राहू शकतो. तयार झालेला अतिरिक्त गॅस साठवू शकत नाही. अतिरिक्त गॅस साठवून तो वाहनांसाठी वापरता येणे कसे शक्‍य होईल, याचा अभ्यास सध्या सुरू आहे. सध्या गॅस तयार झाल्यानंतर शेणखताची रबडी शिल्लक राहते, ती वाळण्यासाठी काही काळ लागतो. हे टाळण्यासाठी आम्ही सेपरेटर यंत्र घेणार आहोत. त्याची परदेशातून मागणी केली आहे. साधारणतः संत्र्यापासून रस व चोथा वेगळे करणाऱ्या यंत्राच्या कार्यपद्धतीशी साधर्म्य साधणारे हे यंत्र आहे. हे यंत्र उपलब्ध झाल्यास त्याद्वारे एका बाजूला शुद्ध कोरडे शेणखत, तर दुसऱ्या बाजूला जैविक द्रवरूप सेंद्रिय खताची निर्मिती होऊ शकते. हे यंत्र लवकरच आम्ही घेणार असल्याचेही अभय यांनी सांगितले. 

संपर्क - 
अभय अण्णासाहेब पाटील - मोटके - 9822211125 
जांभळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर