अलीकडच्या काळात शेती वा पूरक उद्योगांत नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. शेती, जनावरांचा गोठा आदी पूरक उद्योगांबरोबरच उपलब्ध साधनसामग्रीतून जैवइंधन (बायोगॅस)सारखे प्रकल्प वैयक्तिक स्तरावर निर्माण करण्यासाठी आज शासन अनुदान देते; परंतु अनेक अडचणींअभावी हे प्रकल्प शेतकऱ्यांपर्यंत हव्या त्या क्षमतेने पोचू शकत नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील जांभळी (ता. शिरोळ) येथील अभय अण्णासाहेब पाटील - मोटके या तीसवर्षीय बी.कॉम. पदवीधर तरुणाने मात्र ही किमया करण्याचा प्रयत्न केला आहे. वडिलांनी सुरू केलेला जनावरांचा गोठा तर सांभाळलाच; पण त्यातूनही पुन्हा उद्योगनिर्मितीचा उद्देश ठेवला. सुमारे दोनशे वीस गाईंच्या गोठ्याचे यशस्वी व्यवस्थापन करताना दररोज तयार होणाऱ्या शेणाचा पुरेपूर वापर करीत बायोगॅसनिर्मिती प्रकल्पाला चालना दिली. त्या माध्यमातून दररोज दीडशे युनिट ऊर्जेची (विजेची) निर्मिती करणे शक्य झाले आहे. या ऊर्जेचा वापर पाणी खेचण्याचा विद्युत पंप, धारा काढणारे यंत्र आदींसह कडबा कुट्टी यंत्र चालवण्यासाठीही केला आहे. यामुळे दररोजच्या वीज भारनियमनाच्या कटकटीतून अभय याने उद्योगशीलता दाखवणारा मार्ग चोखंदळला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जांभळी (ता. शिरोळ) गावच्या हद्दीत अभय पाटील यांचा भव्य गोठा उभा आहे. सन 2000 या वर्षात अभय यांचे वडील अण्णासाहेब यांनी गोठा उभारला. पाटील यांची घरची सतरा एकर जमीन आहे. दूध व्यवसायाबरोबरच या जमिनीसाठी शेणखतही मिळेल या उद्देशाने गोठ्याची उभारणी झाली. सुरवातीला हरियाना येथून मुऱ्हा जातीच्या म्हशी आणल्या. या वेळी चार गाईही आणल्या. काही दिवस म्हशींच्या गोठ्यापासून फायदा होत होता; परंतु पशुखाद्याच्या वाढत्या किमती व अन्य तांत्रिक कारणांमुळे अण्णासाहेबांनी गाईंच्या संगोपनावरच भर दिला. हळूहळू होलस्टीन फ्रिजियन (एचएफ) जातीच्या गाईंची संख्या वाढत गेली. अण्णासाहेबांबरोबरच 2003 पासून अभय यांनीही गोठा व्यवसायात लक्ष घालण्यास सुरवात केली.
240 गाईंनी सजलाय गोठा
सध्या सुमारे पंचवीस हजार चौरस फूट जागेत हा गोठा आहे. या गोठ्यात दूध देणाऱ्या नव्वद गाई आहेत, तर शंभर गाभण गाई आहेत. पन्नास कालवडी आहेत. प्रति वीस दुधाळ गाईंची देखभाल करण्यासाठी एक मजूर, अशी व्यवस्थापनाची रचना आहे. गोठ्याचे चौदा वेगवेगळे भाग केले आहेत. प्रत्येक भागात सरासरी सतरा गाई आहेत. आठ मजूर यासाठी काम करतात. प्रत्येक भागावर क्रमांक लिहिले आहेत. प्रत्येक जनावरासही रेकॉर्डसाठी क्रमांक दिले आहेत. यामुळे एखादे जनावर आजारी असल्यास, गाभण असल्यास ते तातडीने लक्षात येते. गोठ्याचे शेड सिमेंट पत्र्याचे आहे. हवा खेळती राहावी यासाठी गोठा व पत्र्यांची उंची जास्त ठेवली आहे. गाभण जनावरांना त्रास होऊ नये यासाठी कोब्यावर रबरी पट्ट्या अंथरल्या आहेत.
गोठा व्यवस्थापन
पहाटे सुमारे पाच वाजता शेण काढले जाते. साडेपाचच्या सुमारास धारा काढणी सुरू होते. त्यासाठी दूध काढणी यंत्राचाच वापर केला जातो. प्रत्येक वीस गाईंसाठी दोन यंत्रांची व्यवस्था केली आहे. सुमारे तासाभरात सर्व धारा काढल्या जातात. साडेसहा ते सात या काळात मजुरांना काही काळ विश्रांती, नंतर सात ते आठ या वेळेत जनावरे धुऊन घेतली जातात. आठ ते नऊ या वेळेत जनावरांना खाद्य दिले जाते. दिवसाला प्रति गाईसाठी सुमारे पाच किलो इतकी कोरडी वैरण दिली जाते. मका हस्क एका दिवसाला एका गाईला सुमारे पंधरा किलो इतके दिले जाते. हिरवी वैरण सुमारे वीस किलो दिली जाते. सकाळी तीस ग्रॅम इतके मिनरल मिक्श्चर दिले जाते. दहा लिटर दूध देणाऱ्या प्रति गाईला ते अडीच किलो इतक्या प्रमाणात दिले जाते. इतर गाई व कालवडींनाही पशुखाद्य दिले जाते. सायंकाळीही सकाळप्रमाणेच जवळपास व्यवस्थापन होते. दिवसातून दोनदा जनावरे धुतली जातात. रात्रभर गव्हाणीमध्ये पिण्यासाठी पाणी सोडले जाते.

गोठ्यातील दोनशे चाळीस गाईंपैकी सुमारे नव्वद गाई दूध देणाऱ्या आहेत. त्यांचे दररोज एकूण अकराशे लिटर दूध संकलित होते. हे दूध संघाला घातले जाते. दुधाला प्रति लिटर सरासरी बावीस रुपये भाव मिळतो. निव्वळ दूध विक्रीतून दररोज 24 हजार 200 रुपये मिळतात. यातून दररोज पशुखाद्यासाठी पाच हजार रुपये, ओल्या वैरणीसाठी तीन हजार रुपये, मका हस्कसाठी आठ हजार रुपये, कोरड्या वैरणीसाठी तीन हजार, औषधांसाठी तीनशे, मिनरल मिक्श्चरसाठी आठशे, तर चौदाशे रुपये मजुरीसाठी खर्च होतात. दिवसाला 21 हजार 500 रुपये खर्च होतात. दिवसाला दूध विक्रीतून निव्वळ नफा 2700 रुपये इतका राहतो. याशिवाय दूध संघ लिटरला सत्तर पैसे याप्रमाणे फरक बिल काढते. म्हणजेच 770 रुपये हे फरक बिलाचे होतात. निव्वळ नफा अधिक फरक बिल असा सरासरी 3400 रुपयांचा दैनंदिन नफा पाटील - मोटके यांच्या गोठ्यास होतो. याशिवाय दररोज दोन टन शेणखतही मिळते. बायोगॅस प्रकल्प उभारण्यापूर्वी त्याचा वापर गांडूळ खत निर्मितीसाठी व्हायचा. गरजेनुसार त्याची विक्रीही करण्यात येत होती. हा प्रकल्प उभारल्यापासून मात्र शेणखताचा वापर या प्रकल्पासाठीच केला जातो.
वर्षाला सुमारे तीस ते पस्तीस कालवडी तयार
गोठ्यात वर्षाला सुमारे सत्तर गाईंचा वेत होतो. त्यामध्ये सुमारे तीस ते पस्तीस कालवडी तयार होतात. खोंडे इतर शेतकऱ्यांना पाळण्यास दिली जातात. घरचीच जनावरे तयार करण्यावर अभय यांनी भर दिला आहे. गाय व्यायल्यानंतर वासरास बारा दिवस सुमारे तीन लिटर निव्वळ दूध दिले जाते. तिसऱ्या आठवड्यापासून काफ स्टार्टर व मिल्क रिप्लेसर दिले जाते. चौथ्या आठवड्यापासून हिरवी वैरण दिली जाते. दर शनिवारी संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी येऊन गोठ्यास भेट देऊन जातात. गरज वाटल्यास नामवंत तज्ज्ञांनाही बोलावून त्यांचा सल्ला घेतला जातो. अभय गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायात असल्याने जनावरांच्या किरकोळ व्याधी त्यांना समजायला लागल्या आहेत. मजुरांकडून खात्री करून घेऊन ते औषधे जनावरांना देतात. जिल्हा परिषदेनेही गोठ्याची दखल घेऊन "आदर्श गोठा' पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.
गरजेतूनच झाला बायोगॅस संकल्पनेचा उदय
या भागात गेल्या काही वर्षांपासून वीज भारनियमनाचे प्रमाण अधिक वाढले आहे. सातत्याने वीज जात असल्याने अनेकांनी जनरेटरची सोय केली आहे. गोठ्याचा व्याप मोठा असल्याने अभय यांनीही जनरेटरची सोय केली होती; मात्र त्या अनुषंगाने डिझेलचा खर्च जास्त होत होता. यावर पर्याय शोधण्यासाठी त्यांनी सातत्याने विचार केला. त्या संपर्कातून त्यांना पुण्याच्या एका संस्थेचा पत्ता मिळाला. तेथे जाऊन त्यांनी प्रात्यक्षिक प्रकल्प पाहिला. तो पसंत पडल्यानंतर आपल्या भागात त्याच्या उभारणीचे काम सुरू केले.
अशी आहे बायोगॅस प्रकल्पाची रचना
अभय यांच्या गोठ्यातून दररोज सुमारे दोन टन शेणखत तयार होते. मजुरांमार्फत छोट्या हातगाडीमार्फत हे शेणखत गोळा केले जाते. ते प्रथम चौकोनी आकाराच्या शेणकुंडीत टाकले जाते. आठ बाय बारा बाय आठ फूट क्षेत्रफळ असलेली ही शेणकुंडी आहे. या शेणकुंडीत गोठा धुतलेले पाणी सोडले जाते. शेणकुंडीत मड पंपाच्या साहाय्याने पाणी व शेणाचे मिश्रण केले जाते. पन्नास टक्के शेण व तितकेच पाणी असे मिश्रण तयार होते. तयार झालेले मिश्रण बारा इंच पाइपमधून जवळच असलेल्या बायोगॅस डायजेस्टरमध्ये सोडले जाते. एकतीस फूट व्यास व पंचवीस फूट खोली असे सिमेंटचे बांधकाम असलेले हे डायजेस्टर आहे. या डायजेस्टरमध्ये गॅस तयार होतो. हा गॅस दीड इंची पीव्हीसी पाइपमधून रबरी गॅस बलूनमध्ये जातो. सुमारे पंचावन्न घनमीटर आकाराचा हा बलून आहे. या बलूनमधून हा गॅस पाणी असलेल्या दोन लोखंडी टाक्यांत जातो. तेथे हायड्रोजन सल्फाईड (----एच.टू.एस.) पाण्यात विरघळतो. तो गॅस थेट बायोगॅस इंजिनला (बायोगॅसवर चालणारा जनरेटर) येतो. व्हॉल्व्हच्या साहाय्याने हा जनरेटर चालू - बंद करता येतो. या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेला जनरेटर हा पंधरा केव्ही क्षमतेचा आहे. बायोगॅस तयार झाल्यानंतर तयार झालेली स्लरी शेजारील खड्ड्यात जाते. काही काळ वाळविल्यानंतर त्याचा शेतीसाठी वापर करता येतो.
दररोज दीडशे युनिट विजेची निर्मिती
या बायोगॅस प्रकल्पासाठी सुमारे पंचवीस लाख रुपयांचा खर्च आला आहे. केंद्र सरकारचे चार लाख ऐंशी हजार रुपयांचे अनुदान यासाठी मिळाले आहे. या प्रकल्पात दररोज दोन टन शेणखतापासून सुमारे दीडशे युनिट विजेची निर्मिती होते. तयार होणारा गॅस थेट या जनरेटरला पुरवला जातो. या जनरेटरद्वारे विद्युत उपकरणे चालविली जातात. पाणी खेचण्यासाठीची दहा अश्वशक्तीची विद्युत मोटर सुमारे पंधरा तास अखंडपणे चालू राहते. तयार झालेल्या ऊर्जेच्या माध्यमातून चार अश्वशक्तीचे दूध काढण्याचे यंत्र, साडेसात अश्वशक्तीचे कडबा कुट्टी यंत्र, दहा अश्वशक्तीचा विद्युत पाणी उपसा पंप चालविला आहे. गोठ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी गोठ्याशेजारीच मजुरांची घरे आहेत. या घरांतील स्वयंपाकासाठी लागणारा गॅसही येथूनच पुरविला जातो. यामुळे येथील प्रत्येक कुटुंबाला गॅसला महिन्याला येणारा सुमारे चारशे रुपयांचा खर्चही वाचला आहे. बायोगॅस शिवाय दररोज सुमारे बाराशे किलो जैविक सेंद्रिय खतही तयार होत आहे.
भविष्यात असे प्रयोग होणे गरजेचे
हा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी लाइट नसल्याने जनरेटरसाठी डिझेलचा दररोज सुमारे पंचवीस लिटर खर्च येत होता. आता या खर्चात बचत झाली आहे. एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष बायोगॅस निर्मितीस प्रारंभ झाला. अभय आपले अनुभव सांगताना म्हणाले, की प्रकल्प निर्मितीसाठी खर्च जादा वाटत असला तरी भविष्यातील संभाव्य फायदे भरपूर आहेत. प्रति दिन पंचवीस लिटर डिझेलची बचत होत आहे. म्हणजेच वर्षाला नऊ हजार शंभर लिटर तेलाची बचत होणार आहे. याचाच अर्थ वर्षाला तीन लाख वीस हजार रुपयांचा खर्च वाचू शकेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून वर्षाला जैविक सेंद्रिय खताची निर्मिती सुमारे तीनशे टन इतकी होऊ शकते. याची किंमत अंदाजे साडेचार लाख रुपयांपर्यंत होऊ शकते. गॅस तयार झाल्यानंतर उरलेली रबडी पंपाच्या साहाय्याने पिकांना दिल्यामुळे पिकांना खत मिळतेच, शिवाय मजुरांचीही बचत होऊ शकते. या प्रकल्पाच्या आधारे वीजभारनियमनावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकल्पातून गरजेनुसार ऊर्जेचा वापर करणे शक्य झाले आहे.
भविष्यात आणखी सुधारणेसाठी प्रयत्न अभय म्हणाले, की सध्या बलूनची जितकी क्षमता आहे, तितकाच गॅस बलूनमध्ये राहू शकतो. तयार झालेला अतिरिक्त गॅस साठवू शकत नाही. अतिरिक्त गॅस साठवून तो वाहनांसाठी वापरता येणे कसे शक्य होईल, याचा अभ्यास सध्या सुरू आहे. सध्या गॅस तयार झाल्यानंतर शेणखताची रबडी शिल्लक राहते, ती वाळण्यासाठी काही काळ लागतो. हे टाळण्यासाठी आम्ही सेपरेटर यंत्र घेणार आहोत. त्याची परदेशातून मागणी केली आहे. साधारणतः संत्र्यापासून रस व चोथा वेगळे करणाऱ्या यंत्राच्या कार्यपद्धतीशी साधर्म्य साधणारे हे यंत्र आहे. हे यंत्र उपलब्ध झाल्यास त्याद्वारे एका बाजूला शुद्ध कोरडे शेणखत, तर दुसऱ्या बाजूला जैविक द्रवरूप सेंद्रिय खताची निर्मिती होऊ शकते. हे यंत्र लवकरच आम्ही घेणार असल्याचेही अभय यांनी सांगितले.
संपर्क -
अभय अण्णासाहेब पाटील - मोटके - 9822211125
जांभळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
No comments:
Post a Comment