Thursday, May 30, 2013

पशू व्यवस्थापनातील दैनंदिनी

आपल्या गोठ्यामध्ये रोज सकाळी व सायंकाळी ठराविक वेळा चक्कर मारणे महत्त्वाचे असते. जनावरांच्या गोठ्यामध्ये वैरण, पेंड, हिरवा चारा यांचे व्यवस्थापन, तसेच निघालेले दूध वासरांना पाजायचे. दूध, भांड्यांची स्वच्छता, इतर सर्व गोष्टींचे व्यवस्थापन यांकडे लक्ष देणे गरजेचे असते. जनावरांच्या गोठ्यामध्ये प्रत्येक गोष्टीची ठराविक वेळ असली पाहिजे व ती पाळली गेली पाहिजे. उदा.ः पाणी पाजण्याची वेळ, वैरण टाकण्याची वेळ, अंबोण ठेवण्याची वेळ, दूध काढण्याची वेळ इत्यादी. 

यामध्ये बदल केल्यास अथवा ठराविक वेळेत न केल्यास जनावरांच्या दूध देण्याच्या उत्पादनावर परिणाम होत असतो, तसेच जनावरांना हाताळताना पशुवृत्ती न दाखविता मायेने काळजी घेतली पाहिजे. जनावरांस मारहाण केल्यास गाईच्या खाण्यावर प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होऊन उत्पादनात घट होते.

जनावरांना खरारा करणे महत्त्वाचे असते. नियमित खरारा केल्यास अंगावरील खराब केस व घाण, धूळ निघून जाईल व रक्ताभिसरण क्रिया व्यवस्थित होते.

उन्हाळ्यात गाईंना नियमित पाण्याने धुणे फार महत्त्वाचे असते. तापमानात वाढ झाल्यामुळे दुधावर, तसेच जनावरांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो.

धार काढण्याच्या ठराविक वेळांमध्ये बदल करू नका. दोन धारांमध्ये ठराविक तासांचे अंतर ठेवा. जनावरे धुतल्यानंतर शक्‍यतो धारा काढा, तसेच गाईंची पूर्ण धार काढा. अर्धवट धार काढल्यास कासेचे रोग होतात.

पशू व्यवस्थापनामध्ये सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणून प्रजनन ओळखले जाते. गाईचा माज ओळखणे हा फार महत्त्वाचा भाग आहे. योग्य वेळी माज ओळखून कृत्रिम रेतनाद्वारे किंवा वळूकडून भरणे फार महत्त्वाचे आहे. गाईंचा माज वेळेत न ओळखल्यास फार मोठे नुकसान होते. त्यासाठी दररोज गोठ्यामध्ये सकाळी चक्कर मारून माजावर आलेल्या गाई 24 तासांच्या आत भरणे महत्त्वाचे असते.

गर्भ तपासणी ः ज्याप्रमाणे माज महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे गर्भ तपासणी करणे फार महत्त्वाचे आहे. गाई भरल्यानंतर ती गाभण आहे किंवा नाही या गोष्टींकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. गाय भरल्याची तारीख लिहून ठेवून अंदाजे दोन महिन्यांनी तपासून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी गोठ्यातील सर्व गाईंची माहिती तपासून पाहणे गरजेचे आहे. अंदाजे विण्याची तारीख काढून त्या गाईंची त्याप्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे.

जनावरांचे आरोग्य ः पशू व्यवस्थापनामध्ये जनावरांचे आरोग्य हे दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे, त्यासाठी जनावरांच्या आरोग्याकडे दररोज लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. रोगप्रतिबंधक लस टोचणे, जनावरांचे रोगनिदान, तसेच जंतनिर्मूलन हे सर्व वेळेवर करणे फार महत्त्वाचे आहे. एखादे जनावर आजारी असल्यास त्वरित औषधोपचार करणे, तसेच आजारी जनावरांना वेगळे ठेवणे फार महत्त्वाचे आहे.

जनावरांच्या वाईट सवयी मोडणे - जनावरांच्या अनेक प्रकारच्या वाईट सवयी असू शकतात. उदा.ः अंग चाटणे, दुसऱ्या गाईचे दूध पिणे, लाथा मारणे व मारामारी करणे इत्यादी सवयी असतात. त्यासाठी या वाईट सवयी बदलणे गरजेचे असते. अन्यथा दूध उत्पादनात घट होऊ शकते, तसेच जनावरे हाताळताना त्रास होऊ शकतो.

जनावरांची विक्री - सर्वसाधारणपणे गोठ्यामध्ये संसर्गजन्य रोगी जनावरे, माजावर येणारी जनावरे, कमी दूध देणारी जनावरे, भाकड काळ जास्त असणारी, जास्त वेत झालेली जनावरे ही आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसतात. त्यासाठी प्रत्येक वर्षी जनावरांची संख्या कमी करणे महत्त्वाचे असते.

स्वच्छ पाणी - दुग्ध व्यवसायात स्वच्छ पाणी हा फार महत्त्वाचा भाग आहे. उन्हाळ्यात थंड पाणी पाजावे. एक लिटर दूध उत्पादनासाठी चार लिटर पाणी लागते.
 
गाई विण्याच्या दोन महिने आधी दूध काढणे बंद करावे, त्यामुळे प्रजनन अवयवांना विश्रांती मिळते आणि गर्भाची वाढ व्यवस्थित होते, तसेच प्रसूतीच्या वेळी लागणारी ऊर्जा शरीरात साठविली जाते.

No comments:

Post a Comment