Tuesday, May 28, 2013

मुक्‍तसंचार गोठा पद्धतीने रामनाथांनी वाढविले दूध उत्पादन...

माहेगाव देशमुख (ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) येथील तरुण शेतकरी रामनाथ त्र्यंबक जाधव यांनी शेतीला पूरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला. दोन जर्सी गाईंपासून हा व्यवसाय हळूहळू वाढवत 25 गायींवर नेला आहे. मुक्त संचार पद्धतीचा गोठा हे त्यांच्या दूध व्यवसायाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. परिसरात अशा पद्धतीचा यशस्वी ठरलेला हा पहिलाच गोठा आहे. काटेकोर व्यवस्थापनामुळे गाईंचे 35 लिटर पासून सुरू केलेले दूध उत्पादन आता दररोज 260 लिटरपर्यंत पोचले आहे. व्यवसाय कसा यशस्वी केला याबाबतचे त्यांचे अनुभव खरोखर सर्व दूध उत्पादकांना फायद्याचे आहेत. दुधाळ जनावरांच्या उत्कृष्ट संगोपनामुळे अह मदनगर जिल्हा परिषदेने त्यांना "आदर्श गोपालक' म्हणून पुरस्कारही दिला आहे.
अमोल बिरारी

बी.ए. पर्यंत शिक्षण घेतलेल्या रामनाथ जाधव यांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. त्यामुळे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी न करता शेतीच करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सात वर्षांपासून ते शेती करत आहेत. शेतीला पूरक जोडधंदा केलाच पाहिजे यावर ते ठाम होते; परंतु जोडधंद्याला दुय्यम स्थान न देता तो पूर्णतः यशस्वी करून त्याला मुख्य व्यवसायाचे स्वरूप द्यावयाचे त्यांनी निश्‍चित केले. नेमका कोणता जोडधंदा करावा या विचाराने जाधव यांनी पोल्ट्री उद्योग, इमूपालन, वराहपालन तसेच दुग्ध व्यवसाय आदी विविध शेतीपूरक व्यवसायांचा संपूर्ण अभ्यास केला. ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली व माहिती घेतली. 

आपल्या व्यवसायाबाबत जाधव यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, की अगदी सुरवातीला मामांकडून एक जर्सी गाय आणली होती. मात्र एका गाईवर भागणार नव्हते. जोडीला दुसरी गाय असावी म्हणून गावच्या सोसायटीतून कर्ज घेऊन आणखी एक जर्सी गाय विकत घेतली. अशाप्रकारे 2005 पासून दोन गाईंवर दूध व्यवसाय सुरू केला. होणाऱ्या दूध उत्पादनातून चार ते पाच महिन्यांत सोसायटीतून घेतलेले कर्ज फेडले. हळूहळू या व्यवसायाचा अनुभव येत गेला. गाईंची संख्या आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला. याकामी दुग्ध व्यवसायासंदर्भात नाबार्डच्या योजनेचा फायदा झाला. त्या योजनेअंतर्गत सोसायटीमधून आणखी कर्ज मिळाले. त्यातून आठ जर्सी गाई विकत घेतल्या. शा एकण दहा गाई झाल्या. व्यवसाय वाढत असल्याने मजुरांची स मस्या उद्‌भवू नये म्हणून मिल्किंग मशिन विकत घेतले. सुरवातीला गाईंना या मशिनची सवय नसल्याने दूध काढताना अडचण आली, परंतु त्यानंतर हा त्रास कमी होत गेला. मशिनमुळे पूर्ण क्षमतेने दूध निघते. शेवटच्या धारांमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते; परंतु पशुपालकांकडून नेमक्‍या त्याच धारा परिपूर्ण काढल्या जात नाहीत. मात्र मशिनने ते शक्‍य झाले. दूध उत्पादनासोबत फॅटमध्येही वाढ झाली. सद्यःस्थितीत एक गाय दोन्ही वेळेला सरासरी वीस लिटर दूध देते. बारामती येथील एका डेअरीला दूध संकलित करून पाठविले जाते. प्रति लिटरला सरासरी 16 रुपये भाव मिळतो. 

दहा गाईंनंतर पुढचा टप्पा गाईंची संख्या वाढवायची होती, परंतु त्यासाठी कर्ज उपलब्ध होणे आवश्‍यक होते. बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी याबाबत बोलणी केली. सुरवातीला त्यांनी पाहू, देऊ असे केले; मात्र जेव्हा त्यांना आपल्याकडील 27 लिटर दूध देणाऱ्या गाईला मिळालेल्या पुरस्काराविषयी सांगितले तेव्हा त्यांनी गोठ्याला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. खात्री पटल्यानंतर कर्ज देण्याचे मंजूर केले. एकूण अकरा लाखांचे कर्ज मिळाले. त्यातून पुन्हा दहा गाई, मिल्किंग मशिन, छोटा जनरेटर विकत घेतला. शेडचा गोठा व मुक्त संचार पद्धतीसाठी "वॉल कंपाउंड' तयार केले. अशाप्रकारे गाईंची एकूण संख्या 20 झाली. 

मुक्त संचार पद्धतच का? 
दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत जसे जनावरांचे आजार, त्यांचा माज याविषयी सतर्क राहणे आवश्‍यक असते असे जाधव अनुभवातून सांगतात. बंदिस्त गोठ्यात आलेल्या अनुभवातून त्यांना असे दिसले, की दुधाळ जनावरांना थायलेरियासिस, कासदाह, किटोसिस हे मुख्य तीन आजार होतात. बंदिस्त गोठ्यात गोचिडांना लपण्यास भरपूर जागा असते. त्यांच्यामुळे जनावरांना थायलेरियासिस हा रोग होतो. तसेच बंदिस्त गोठ्यात जनावर जेथे उभे राहते तेथे शेण, मल-मूत्र पडत असल्याने ती जागा कायम ओली राहते. त्यावर काडीकचरा पडलेला असतो. त्यावरच जनावरे बसतात. त्यामुळे कासदाह रोग होतो. यातून मुक्तता मिळावी म्हणून मुक्त संचार गोठा पद्धत निवडली. तसेच दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे काही गाई-म्हशी मुका माज दाखवितात. बंदिस्त गोठ्यात ही गोष्ट लक्षात येत नाही; मात्र मुक्त संचार गोठा पद्धतीत अशा गाईला त्वरेने ओळखणे सोपे होते. माजाची लक्षणे लगेच ओळखता येतात आणि माज ओळखता येणे हेच तर दुग्ध व्यवसाय यशस्वी होण्यामागील कारणांपैकी एक गमक आहे. कारण अकरा महिन्यांत गाय वेतावर यायची असेल तर ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. मुक्त गोठा संचार पद्धतीत ही गोष्ट लवकर लक्षात येते. या पद्धती विषयी "ऍग्रोवन'मध्ये लेखाद्वारे माहिती प्रसिद्ध झाली होती. त्या माहितीच्या आधारे नियोजन केले. परिसरात यशस्वी झालेला या पद्धतीचा हा पहिलाच गोठा आहे. कालवडींसाठी स्वतंत्र मुक्त संचार गोठा आहे. त्यामध्ये 15 कालवडी आहेत. वयोमानानुसार त्यांच्या खाद्यांचे नियोजन केले जाते. मुक्‍त संचार गोठा पद्धतीमुळे मजुरा ंच्या समस्येचा त्रास वाचतो. गाईंना व त्यांच्या वासरांना पाणी पाजण्याचा त्रास कमी होतो. मुक्त संचार म्हणजे गाईंना मोकळे फिरावयास मिळते, त्यामुळे त्यांचा भरपूर व्यायाम होतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या पद्धतीच्या गोठ्याला तीन वर्षे पूर्ण झाली, तेव्हापासून ते आजपर्यंत गाईंना कोणत्याही रोगांची बाधा न होता जनावरांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत मिळाली आहे. 

...अशी आहे मुक्त संचार गोठ्याची रचना 
या गोठ्याच्या आवाराचे क्षेत्र 200 फूट लांब आणि 150 फूट रुंद आहे. चारही बाजूने लोखंडी अँगल लावून त्याला तारेची जाळी लावली आहे. या पद्धतीच्या गोठ्यात गाईंना स्वैरपणे वावरता येते. त्यांच्या अंगाला खाज आली तर खरारा करण्यासाठी ब्रश लावले आहेत. पाणी पिण्यासाठी हौद बांधला आहे. गाईंना जेव्हा पाणी प्यायचे असते तेव्हा त्या हौदाकडे जाऊन पाणी पितात. उन्हापासून संरक्षणासाठी कंपाउंडच्या कडेने झाडे लावली आहेत. त्यांचा सावलीसाठी चांगला उपयोग होतो. दुपारच्या वेळी गाई या सावलीत बसून आरामात मनसोक्त रवंथ करतात. या आवारातच गाईंचे दूध काढणे व त्यांना चारा खाण्यासाठी शेडची सोय आहे. हे शेड 56 फूट लांब आणि 22 फूट रुंद आहे. दूध काढायचे वेळी गाई शेडमध्ये येऊन उभ्या राहतात. दूध काढल्यानंतर येथेच गव्हाणीतून गाईंसाठी पशुखाद्य व चारा दिला जातो. या गोठ्यात 25 गाई आरामात उभ्या किंवा बसू शकतात. सकाळी दूध काढून झाले, की आवारात गाई मोकळ्या सोडून दिल्या जातात. उन्हाळ्यात आवारातील मैदानावर पाणी मारले जाते. त्यामुळे गाईंना उन्हाचा फारसा त्रास होत नाही. 

तुलनेने फायद्याचा 
बंदिस्त गोठ्यात जनावरे सतत बांधून ठेवल्याने त्यांना पर्याप्त हालचाल करायला मिळत नाही. व्यायामाअभावी जनावरे स्थूल होतात, त्यांच्या स्नायूंमधील लवचिकता कमी होते आणि त्यामुळे ती वेगवेगळ्या विकारांना बळी पडतात. याचा परिणाम सांधेदुखी, नख्या वाढणे इ. सारख्या अनेक व्याधींच्या रूपात दिसून येतो. त्या शिवाय या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो, त्यामुळे जनावरे वारंवार आजारी पडतात. तुलनेने मुक्त संचार गोठा फायद्याचा ठरतो. या पद्धतीमध्ये जनावरे कायमस्वरूपी मोकळी असल्या मुळे त्यांच्या स्वभावामध्ये आमूलाग्र बदल घडतो. त्यामुळे त्याच्या पचन संस्थेवर भरपूर चांगला परिणाम होतो. जनावरांच्या दुधात पाच त दहा टक्‍क्‍यांनी वाढ होते. त्यांनी खाल्लेल्या खाद्यापासून मिळणारे उत्पन्न वाढते. या पद्धतीमध्ये जनावरांना मुबलक व्यायाम व मोकळे वातावरण उपलब्ध असल्यामुळे त्यांची रोगप्र तिकारशक्ती वाढते आणि जनावरे सहजासहजी रोगांना बळी पडत नाहीत, त्यामुळे पशुवैद्यकीय खर्चामध्ये कपात होते. जनावरे मोकळी असल्यामुळे ती स्वच्छंदपणे माज दाखवू शकतात, त्यामुळे माजावरील जनावरे ताबडतोब ओळखता येऊन त्यांच्या रेतनाची व्यवस्था करता येते. वासरांना अशा वातावरणात ठेवल्यामुळे त्या ंची वाढ झपाट्याने होते. त्यांची भविष्यातील उत्पादनक्षमता वाढते. 

मानसिक तणाव दूर करण्यासाठी "एफएम' 
माणसांमध्ये जसा मानसिक ताण असतो. तसाच जनावरांमध्ये देखील असतो. तो कमी करण्याचा हा एक उपाय आहे. दूध काढण्यापूर्वी गाईंना मधुर संगीत ऐकविले तर गाईंना सिग्नल दिल्यासारखे होते. त्यातून मानसिक ताण दूर होऊन त्यांचे लक्ष विचलित होत नाही. सकाळी दूध काढण्याच्या आधी सहा वाजता रेडिओवरील एफएम केंद्र चालू केले जाते. सकाळच्या भक्तिसंगीताचे स्वर कानी पडताच गाई उठून शेडमध्ये आपापल्या जागेवर येऊन उभ्या राहतात. त्यानंतर त्यांच्या गळ्यात साखळी लावली जाते आणि मिल्किंग मशिन लावून दूध काढणी होते. दूध काढणीपासून चारा खाईपर्यंत संगीत सुरूच असते. संध्याकाळी दूध काढणीच्या आधी साडेचार वाजता एफएम सुरू केल्यानंतर गाई जागेवर येऊन उभ्या राहतात. संध्याकाळी साडेसहा ते सात वाजता दूध काढले जाते. 

चारा वेळेतच दिला जातो
दोन मिल्किंग मशिन आहेत त्यामुळे एका वेळी दोन गाईंचे दूध काढले जाते. एक गाईचे दूध काढायला साधारणतः पाच ते सहा मिनिटे लागतात. सध्या 25 गाईंपैकी 18 गाई दूध देतात. मिल्किंग मशिन विजेवर चालते. त्यामुळे वीज गेल्यावर जनरेटरचा वापर केला जातो. गाईंचे दूध काढून झाल्यावर त्यांना पशुखाद्य दिले जाते. त्यानंतर एका वेळची वैरण गव्हाणीतून दिली जाते. त्यात कडबा कुट्टी, यशवंत गवताची कुट्टी यांचा स मावेश असतो. चारा खाऊन झाल्यावर सकाळी साडेदहा-अकरा वाजल्यानंतर ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गाईंना आवारात मोकळे सोडले जाते. सकाळी साडेसात व संध्याकाळी साडेसात या दोन वेळेतच चारा दिला जातो. जेणेकरून गाई रवंथ चांगला करतात. चारा देण्याच्या वेळेत सहसा बदल केला जात नाही. कारण त्याचा दुधावर परिणाम होतो. संध्याकाळचे दूध काढून झाल्यावर गाईंना पशुखाद्य आणि वैरण दिली जाते. त्यानंतर पुन्हा सकाळ होईपर्यंत मोकळे सोडले जाते. मुक्त संचार गोठा पद्धतीमध्ये आवारात 25 गाई सोडल्यावर त्या एकमेकांना मारत नाहीत का? असा प्रश्‍न शेतकऱ्यांकडून नेहमी विचारला जातो. त्यावर बोलताना जाधव म्हणाले, की जनावरांना एकमेकांची फारशी ओळख नसते. सुरवातीला काही गाई हमरीतुमरीवर येतात, परंतु अर्धा- एक तासानंतर त्या शांत होतात. त्यानंतर अशी समस्या येत नाही. 

रवंथ जितका जास्त तितके दूध जास्त 
दोन वेळाच चारा दिला तर जनावरांना मधल्या वेळेत रवंथ करायला भरपूर वेळ मिळतो. दुधाळ जनावरे जितका रवंथ करतात तितके दूध उत्पादन चांगले मिळते. दिवसभरात नेहमी चारा दिल्याने जनावरांना अपचन होण्याची शक्‍यता जास्त असते. तसेच नेहमी नेहमी चारा खायला दिल्याने दुधाळ जनावरांना रवंथ करायला वेळच मिळत नाही. तेव्हा ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्यावी. 

चाऱ्याचे नियोजन 
जाधव यांनी चाऱ्यासाठी लसूणघास, यशवंत, मारवेल चारा पिकांची लागवड केली आहे. वर्षभर गाईंना हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून यशवंत गवताला ठिबक सिंचन केले आहे. लसूण घास तसेच मारवेलला स्प्रिंकलर केले आहे. प्रति दिवस एका गाईला चाऱ्यासाठी 95 ते 100 रुपये खर्च येतो. गव्हाचा भुसा पशुखाद्यात मिसळून दिला जातो. एका दिवसात एका गाईला वाळलेला आणि हिरवा मिळून पंधरा किलो चारा दिला जातो. दोन वेळेसच चारा देण्याचे नियोजन असल्याने इतर चारा कमी लागतो. चाऱ्याची नासाडी होत नाही. 

पशुखाद्याचे नियोजन
पशुखाद्यावर महिन्याला साडेसतरा ते अठरा हजार रुपये खर्च होतात. यासाठी एक टेक्‍निक वापरत असल्याचे जाधव सांगतात. गहू, मका, सोयाबीन काढल्यानंतर जो भुसा, कुटार शिल्लक राहते, त्याचा वापर पशुखाद्यात मिसळून केला जातो. तसेच गहू, मका, सोयाबीन यांच्या काढणीनंतर त्यातून जो बारीक किंवा थोडासा खराब झालेला माल निघतो, त्याचा भरडा करून त्याचा वापर पशुखाद्यात केला जातो. भरडा करण्यासाठी गिरणी घेतली आहे. त्यामुळे अशा रॉ मटेरिअलचा वापर चांगल्याप्रकारे होतो. सध्या पशुखाद्याचा दर 1500 रुपये प्र ति क्‍विंटल आहे. पशुखाद्य व्यतिरिक्त मीठ, खायचा सोडा आणि मिनरल मिक्‍शर मिसळून दिले जाते. त्यासाठी एक टॅंक केला आहे. एका गाईला अडीच किलो पशुखाद्य आणि अडीच किलो भरडा मिसळून दोन्ही वेळेला दिला जातो.

गाईचा दिवसाचा आहार 
नवीन व्यालेली गाय असेल तर ती किती लिटर दूध देते त्यावर खाद्याचे नियोजन ठरविले जाते. गाय नुकतीच व्याल्यानंतर सहा ते सात किलो पशुखाद्य दिले जाते. साधारणतः एका गाईला दोन्ही वेळेला सहा किलो पशुखाद्य दिले जाते. तसेच महिन्यातून आठ दिवस गूळ दिला जातो. त्यामुळे जनावरांतील कॅल्शिअमची कमतरता भरून निघते, हाडे ठिसूळ होत नाहीत. एवढे करून एखाद्या गाईच्या पचन क्रियेवर परिणाम झालाच तर त्यासाठी तेल पाजले जाते. त्यामुळे पोट साफ होते. गॅसेसचा त्रास राहत नाही. पोटात बिघाड झालेला बरा होतो.
- रामनाथ जाधव, 7588543216, 9763751952

No comments:

Post a Comment